माणिकगड
रतनगड कळसुबाई झाल्यावर बराच काळ गेला होता. कामामुळे म्हणा नाही तर इतर कारणांनी काही weekend तसेच गेले. पप्या आणि शिरीष पाताळगंगा MIDC मध्ये काही कामा निमित्तानी जाणार असे कळले आणि हा ट्रेक पार पडला. २ ची त्यांची मीटिंग आहे, त्यामुळे सकाळी ६ ला निघून पाताळगंगा MIDC च्या मागे आहे तो माणिकगड करून टाकू. २ ला बरोबर वेळेवर मीटिंग ला. चूक. भली मोठी.
पुणे मुंबई रस्त्यावर अनेक किल्ले आहेत. पाताळगंगा MIDC ला जातांना उजवीकडे डावीकडे प्रबळगड, कर्नाळा, इर्शाळगड असे सुंदर किल्ले आहेत. कलावंतीण आहे. तिथूनच पुढे गेल्यावर डावीकडे एक न दिसणारा, लपलेला आणि तसा फार प्रसिद्ध नसलेला माणिकगड किल्ला उभा आहे. खूप उंच आहे. वडवली गावापर्यन्त ST जाते. तेच ते पायथ्याचे गाव. जातांना श्रीकृष्ण लोणावळा येथे खादाडी करून साधारण ९.३० च्या सुमारास गडाच्या पायथ्याशी पोचलो. गाडी लावून तिथे एका गवळ्याला विचारून निघालो. त्यांनी निघतांना सांगितले की पुढे एक वस्ती लागेल, तिथे वाटाड्या घ्या आणि मग वर जा. आम्ही ते विसरलो.
१....... सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे, या किल्ल्यावर जातांना वाटाड्या घ्या नाही तर भोगा. रस्ता मिळत नाही. सापडत नाही. आम्ही हरवलो आणि हरवत हरवत वर पोचलो. दोन टेकड्या आहेत समोर आणि त्या मागे माणिकगड आहे. या दोन्ही टेकड्याच्या उजवीकडून रस्ता पठारावर जातो. तिथून खरा किल्ला दिसतो. गावापासून किल्ल्याच्या माथ्यावर पोचायला २.५ तास सहज लागतात.
२....... उन्हाळ्यात हा ट्रेक शक्यतो करू नका आणि केला तर मात्र पाणी भरपूर जवळ ठेवा. वर काही पाण्याचे टाके आहेत पण पाणी पिण्या सारखे नाही.
मी आणि पप्या गप्पा मारत मारत रस्ता शोधत पुढे चाललो होतो. ऊन वाढत चाललं होतं. जमीन तापत चालली होती. FALL ज्याला म्हणातात त्याप्रमणे पूर्ण जमीन रंगीबेरंगी पानांनी सारवली होती. सुंदर दृश्य. याचे सौंदर्य इतके की सर्व पाऊलवाटा झाकलेल्या.
त्यामुळे दिशा एकच होती. गडाच्या दिशेनी. दोन टेकड्यांच्या वर पोचून मोठ्या पठारावर पोचलो आणि रस्ता मिळाला. मारुती चे मंदिर दिसले आणि हुश्श् झालं. तिथून गडाचे दर्शन सुंदर होते. पूर्ण वळसा मारून गडावर जायचा रस्ता आहे. तटबंदी काहीशी उरली आहे. हा एक watch tower असावा. वर गेल्यावर काही टाक्या आहेत, माहादेव मंदिर आहे आणि वाड्याचे अवशेष आहेत. या किल्ल्यावर आम्ही सोडून कोणीच नव्हते. आमच्या सारखे वेडे आम्हीच. पाणी संपले आणि उतरतांना १ च्या सुमारास जो काही त्रास झाला आहे की ब्रम्हांड आठवले. ट्रेक पूर्ण झाला, एक काम होते MIDC मध्ये, ते झाले आणि पुण्याला परत पोचलो.
वरील काही उत्तम फोटो हे शिरीष आणि पुरुजीत न काढलेले आहे.
ट्रेक नक्की करावा पण दोन तीन गोष्टींची खबरदार घेणे गरजेचे आहे.