पांडवगड
सातारा जिल्ह्यातील वाई जवळपास अनेक किल्ले उभे आहेत. त्यात वैराटगड, केंजळगड, कमळगड, रायरेश्वर पठार आणि पांडवगड एकमेकांकडे पाहत धोम धरणाच्या काठाशी सापडतील. अर्थात वैराटगड जरा पुढे आहे. मागच्या वेळी हनुमान जयंतीला चंद्रोदय कुर्डुगडामागुन झालेला आम्ही सर्वांनी पहिला होता. जणू शंकराच्या पिंडीमागून गंगा. ती मंतरलेली रात्र आम्ही सर्व मित्रांनी एकत्र अनुभवली होती. या वर्षी पांडवगड चा योग आला आणि मी पप्या BD Chetan आणि पिंटू THAR मधून दुपारचे निघालो. ऊन रणरणतं होते हे सांगायला नको. पण मला आनंद की ट्रेकिंग परत चालू झाले. बराच मोठा break होता तसे म्हणायला गेलो तर.
वाई हुन गणपती मंदिर डावीकडे ठेऊन धोम धरणा कडे रस्ता जातो. तो रस्ता पुढे केंजळ रायरेश्वर ला जातो. वाई हुन साधारण ८ ते १० कि मी वर उजवीकडे मेणवली नावाच्या गावाचा रस्ता जातो. हेच ते पायथ्याचे गाव. गुंडेवाडी नावाचे दुसरे गाव आहे पलीकडच्या बाजूला आणि तिथून पण किल्ल्यावर जाता येते. THAR घेऊन पोचलो आणि एक सुंदर, खूप मोठं आणि सळसळणारं, लांब पारंब्यांचे झाड शोधले आणि गाडी तिथे लावून टाकली.
भरपूर पाणी होतं त्यामुळे तशी काही काळजी नव्हती. मागच्या वेळी मी आणि पप्या माणिकगड केला तेव्हा शिकलो होतो चांगलाच धडा. मळलेली वाट आहे. किल्ला डावीकडे ठेऊन सरळ चालत राहा. तुम्हाला लांबवरून काही भगव्या खुणा दिसतील . रस्ता तोच घ्या. सोंडेवर वगरे जाऊ नका उगाच दमछाक होते. सरळ लांब वर तुम्हाला एक खिंड दिसेल आणि तिथे एक मंदिर. मंदिराच्या मागून मळलेली वाट आहे जी थेट तुम्हाला गडावर नेते.
मेटावर पोचायला आम्हाला तास भर गेला. खूप ऊन होतं आणि आम्ही थांबत थांबत जात होतो. गड मोठा आहे आणि चढायला बराच आहे. मेटावर पोचलो तेव्हा ४ वाजले होते. तिथे काही वस्ती आहे, एक विहीर आहे आणि एक मंदिर आहे. भैरोबाचे. तिथून किल्ल्यावर पोचायला ३० मी लागतात.
किल्ल्यावर पोचलात की एक पडके प्रवेशद्वार आहे. तिथून माचीवर प्रवेश होतो. गोल चक्कर मारून बालेकिल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे. डावीकडे सुंदर मारुती मंदिर आहे. मंदिरासमोर चुन्याचे घाणे आहे. पप्या आणि पिंटू नी काही निष्फळ प्रयत्न केले चक्र फिरवायचे. मंदिरात निवांत बसलो. ५. ३० ला काही झालं तरी उतरायचे असे ठरले त्यामुळे घाई घाईनी उरलेला किल्ला बघायला सुरु केला.
Two Ps
बजरंगबली च्या मंदिरात निवांत एक क्षण
बालेकिल्ल्यावर बरेच काही अवशेष पहिला मिळतील. पांडजाई देवीचे एक पडके मंदिर आहे. त्यामागे शंकराचे पडलेले मंदिर आहे. काही मुर्त्या इथे आढळतील. थोडे पुढे एक पाण्याचे टाके आहे. सुकलेले आहे. बालेकिल्ल्यावर येताना खाली खूप सुंदर टाक्या आहेत. ७ ते ८ टाक्या आहेत. तिथे पुढे तो प्रसिद्ध पारशाचा बंगला आहे. बरेच काही ऐकले होते या किल्ल्या बद्दल. परवानगी लागते,तो येऊ देत नाही, कुत्री सोडतो वगरे वगरे .... असे काहीच नाही. किल्ल्यावर आम्ही सोडून कोणीच नव्हते मात्र. शांत निवांत वाटत होते.
इतिहास
चालुक्र्यांच्या राज्र्यांनतर शिलाहारांनी पन्हाळा - कोल्हापूर दख्खन या भागावर राज्य चालविले. १९९१ - १९९२ मध्ये सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधला, असे पुरावे आढळतात. हा किल्ला प्रथम आदीलशाहीत होता. ७ ऑक्टोंबर १६७३ मध्ये मराठ्यांनी तो जिंकला. पुढे १७०१ औरंगजेबाने हा किल्ला घेतला. त्यानंतर शाहु महाराजांनी किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला इ.स १८१८ मध्ये इगजांनी पांडवगड आपल्या ताब्यात आणला. ref - trekshitiz
ट्रेक छान झाला. उन्हाचा तसा फार त्रास कोणाला झाला नाही. तिथून निघून मांढरदेवी घाटातून भोर ला पोचलो. निवडणूका जवळ आल्या होत्या त्यामुळे विषय चालूच होते. इकडून तिकडून विविध चर्चा आणि हसणे हसवणे चालू होते. खूप महिन्यांनी मी परत जागेवर आल्याचे जाणवले, मलाच. मानसिक शांतता असली की कोणाचे बोलणे टोचत नाही. कालच पौर्णिमा झाली होती त्यामुळे चंद्रोदय झाला तेव्हा सर्व जण त्या तांबूस गोऱ्या दिसणाऱ्या चंद्राकडे बघून खुश झालो. पुढच्या ट्रेक ची चर्चा चालू होईलच. जय बजरंगबली.
फोटो contribution - चेतन, पिंटू आणि मी.