Saturday, 23 October 2021

Surrendering to the mighty Nanda Devi



नंदा देवी - आमची गोष्ट 
"सरजी उठो, उठो बादल हट गये है" गंगाराम च्या आवाजानी मी आणि चेतन ताड किनी जागे झालो आणि टेन्ट च्या लावलेल्या झिप उघडण्याची तडफड चालू केली. 
कागभूसंडी, गोमुख तपोवन, ओम पर्वत छोटा कैलास कुठे जायचे आहे लवकर बोला. एक येणाऱ्यांचा ग्रुप तयार केला होता. ट्रेक आला की चर्चा आलीच. त्यामुळे भांडण पण आलेच. मित्र आणि भांडण हे म्हणजे कुलूप किल्ली सारखे असते. एक नसेल तर दुसऱ्याला मजाच उरत नाही. दोन वर्ष झाली पोरांना Goecha La करून आणि मला  आणि चेतन ला जाता आले नव्हते. नंतर मी एप्रिल मध्ये अचानक सिक्कीम च्या त्या भागात ट्रेक करून आलो. पण चड्डी ला जमले नव्हते. त्यामुळे त्याचा येण्याचा अट्टाहास होताच. पिंटू नी आधीच मी येतो हे जाहीर केले होते. तेव्हा मी म्हणालो की मुन्सीयारी या ठिकाणी आपण जाऊ. उत्तराखंड मध्ये एक सुंदर असे गाव आहे. ट्रेक करतांना मला ट्रेक कंपनी बरोबर जायला अजिबात आवडत नाही. नियम आणि अटी आल्या की माझं पटत नाही. त्यामुळे सर्व ट्रेक हे आम्ही आमचे ठरवून आणि माणूस शोधून करत आलो आहोत. खर्च म्हणाल तर थोडासा कमी येतो पण त्यापेक्षा मनाला येईल तसे आणि तिथे जाता येता येते, राहता येते. ग्रुप किती का मोठा असेना आम्हीच प्लांनिंग करतो आणि जातो. 


मुन्सीयारी 

मुन्सीयारी म्हणजे Kumaon भागातील जणू मनाली आहे. उत्तराखंड च्या मी तर प्रेमात पडलोय. Garhwal भागात देव देवतांनी गर्दी केली आहे. महादेवानी आणि विष्णूनी लोकांना जमेल आणि पोचू शकतील अशा ठिकाणी आपली घरे थाटली आहेत. पण Kumaon region  मध्ये तसे नाही. शंभो इथे वर वर जाऊन बसला आहे आणि त्याचे दर्शन हवे असेल तर तिथे जाण्याची आणि पोचण्याची त्याची इच्छा आणि आपली शारीरिक आणि मानसिक ताकद याचा त्रिवेणी संगम जोवर होत नाही तोवर हरी हरी करत बसायचे. तर मुन्सीयारी ला मनाली का म्हणतो त्याचे कारण म्हणजे इथूनच असंख्य ट्रेक सुरु होतात. मनाली इतके commercial नसून निसर्ग सौंदर्य मात्र तितकेच अथवा अधिकच असेल. इथे लोकांची गर्दी नाही. शक्यतो ट्रेक करणारी नाही तर आजू बाजूच्या शहरातून UP च्या नंबर प्लेट असलेल्या गाडीतून येणारी लोक जास्त दिसली. पुण्याहून तिथे पोचायला २ दिवस जातात. पोचेपोचे पर्यन्त हाडं खिळखिळी होतात. म्हहिस मध्ये पु लं म्हणतात तसे, हाडांचा हिशोब अजून जुळवतोय. 
ग्रुप वरची चर्चा झाली आणि नंदा देवी ईस्ट बेस कॅम्प ला जायचे ठरले. निगडे चा पाय मोडला होता त्यामुळे तो गळाला आणि भूषण ला दुसरी कडे जायचे होते त्यामुळे त्याने नांगी टाकली. त्याचा विषय म्हणजे रंगा बरोबर १५ दिवस राहणे शक्य नाही. वगरे वगरे. जो जे वांछील ........ त्यामुळे मी पिंटू आणि चड्डी असे तीन भाऊ तयारीला लागलो. मागच्या ट्रेक मध्ये थंडीमुळे आणि पिंटू चे ग्लोव्हस मी Camp Fire  मध्ये चुकून हाथ घालून जाळले होते त्यामुळे मला नवीन gloves  पिंटू ला आणावे लागले आणि मी पण घेतले. इथे तापमान म्हणाल तर फार विशेष थंडी नव्हती. वारा चांगलाच होता. १५ deg  C - O deg C मध्ये खेळ चालू होता दिवस रात्री चा. 
चला तर मग आमची गोष्टी ऐकायला. नंदा आणि सुनंदा देवी चे दर्शन घ्यायला. 
पुणे दिल्ली विमानाचे तिकीट पहिले काढले. स्वस्त मिळाले मला. माहित नसल्याने मी पुणे डेहराडून चे तिकीट काढून टाकले होते. कोणी नाही आलं तर एकटाच जाणार होतो. त्यामुळे कुठे काय कसे फारसा मी विचार  केला नव्हता. पुणे - दिल्ली By  Air, दिल्ली - काठगोदाम By  ट्रेन आणि नंतर काठगोदाम ते मुन्सीयारी बोलेरो मधून असा मस्त प्रवास आहे. शेवटचे २८० कि मी फक्त घाट आहे, एकीकडे उंच पर्वत आणि एकीकडे दरी. 
विमानातून उतरून आम्ही प्रथमेश वैद्य नावाच्या मित्र कडे गेलो. ८ तास काढायचे होते. तिथे पोचलो तेव्हा त्यांनी मस्त पेय पानाची सोय केली होती. झक्कास दिल्ली जेवण म्हणजे कबाब, चिकन आणि रोगनजोश चेपले आणि एक छान झोप काढून आम्ही तिथून निघालो. पाठीवर साधारण १४ किलो चे ओझे आणि एक छोटी सॅक असे उचलून OLA  मध्ये बसलो आणि स्टेशन वर पोचलो. बरेच दिवसांनी ट्रेन चा प्रवास घडत होता. नीट नेटकं आणि Clean रेल्वे स्टेशन पाहून मला माझा देशाचे कौतुक वाटले. सुंदर waiting  room. ट्रेन मध्ये एकदाचे बसलो. TC जो ट्रेन मध्ये मुख्याध्यापकाचे काम बजावत असतो, उगाच रुबाबाबत वावरत होता. त्याचे पाय चेपून आम्ही upgrade  मिळवले आणि first class मध्ये जाऊन निपचित पडलो. 











'गंगाराम' - या कथेतील एक मूळ पात्र म्हणायला हरकत नाही. काळा  का गोरा नं माहित असलेला इसम मला इंटरनेट वर काही ब्लॉग वाचतांना मिळाला. गेले २० वर्ष ट्रेक करवत असलेला हा गडी, खूप लोकांनी recommend  केलेला दिसत होता. त्याला एका सकाळी मी फोन केला आणि विचारणा केली. Base कॅम्प ट्रेक साठी तो लगेच तयार झाला. गंगाराम हा आमचा guide झाला. साधारण ५'२" उंची,  पहाडी रंग, आणि चेहऱ्यावर सदैव मिश्किल हास्य, तुटक तुटक हिंदी ज्याला पहाडी भाषेचा हेल, track pant, T shirt आणि कानटोपी घातलेला हा गंगाराम. मुन्सीयारी मध्ये याचे छान घर आहे. दोन मुले आणि सौ असा परिवार आहे. एकंदरीत त्याचा कडे बघता समाधानी माणूस आहे याची जाणीव झाल्या शिवाय राहत नाही. 


मी आणि गंगाराम 
गंगाराम - ९०४५५४३१६० / ९५६८१६३०५३ / ९४५६५४२७५३



काठगोदाम च्या ऐवजी आम्ही हल्द्वानी स्टेशन ला उतरलो कारण गंगा नी आमची गाडी ची सोय तिथून केली होती. बोलेरो मध्ये बसून आमचा पुढचा प्रवास सुरु झाला. १० लोक कोंबलेल्या त्या गाडीत २८० कि मी जायला १२ तास लागले असतील. शेवटचे १५ कि मी उरले असतांना गाडी मोडली. कशी तरी कडेला घेऊन आम्ही पुढे काय याची प्रतीक्षा करत उभे होतो. मग मी आणि पिंटू आणि काही इतर प्रवासी चालत पुढे निघालो. कारण तिथे फोन ला range नव्हती त्यामुळे मदत मागवणे अशक्य होते. चालत चालत रिमजीम पाऊसात त्या निर्मनुष्य निसर्गात मी तर सर्वच विसरून जातो. अचानक मागून siren  वाजला. एक ऍम्ब्युलन्स येतांना दिसली. पुढे एक डॉक्टर आणि ड्राइवर होते. डॉक्टर मॅडम ला request करून मी पिंटू आणि दोन सहप्रवासी ऍम्ब्युलन्स मध्ये शिरलो. ड्राइवर म्हणाला "ये ऐसे ही आना, लेट के अनेकी नौबत ना आये". मग मागे चर्चा थोडी की आज नाही तर उद्या यायचेच आहे वगरे. "होनी को कोण टाळ शकता है भाई" मराठी हिंदी मध्ये मी म्हणालो. त्या ऍम्ब्युलन्स नी मला आणि पिंटू ला आमच्या ठरलेल्या हॉटेल पाशी सोडले. मुन्सीयारी मध्ये शिरायच्या आधी Hotel Balaraj Inn नावाचे चांगले हॉटेल आहे. ऍम्ब्युलन्स मधून उतरलो आणि एका इसमानी अत्यंत उत्साहात पुढे येऊन shake  hand  केला. मी पण केला. मला वाटलं हॉटेल चा माणूस असेल आणि सामान घ्यायला आला असेल. त्याला मी विचारले की "गंगाराम करके एक आदमी मालूम है क्या" चाऱ्यावर असलेल्या पेक्षा अजून मोठे हास्य आणून त्यांनी उत्तर दिले, सर I am Gangaram. त्या क्षणाला त्यांनी आम्हाला जिंकून टाकले. मला आणि पिंटू ला त्यांनी एक एक करून मिठी मारली आणि आम्ही आमच्या रूम मध्ये सुखावलो. चड्डी अजून मोडलेल्या गाडीत अडकला होता हे क्षण भर विसरून अंघोळ करून आलो. अर्थात दुसरी गाडी पाठवली होतीच. त्या दिवशी पूर्ण वेळ पाऊस पडत होता. ढगांनी सर्व मुन्सीयरीवर आणि आजू बाजूच्या डोगरांवर पांघरून घातलं होते. त्यामुळे काहीहि दिवस नव्हते. आम्ही तिघे दोन घास खालले, गंगाराम शी उद्याची चौकशी केली आणि गादी वजा पांघरून असे काही तरी अंगावर घेऊन गाड झोपी गेलो. 
पहाटे पहाटे पिंटू नी जोरजोरात आरोळ्या मारायला सुरुवात केली. घोरण्याच्या प्रॉब्लेम मुळे आम्ही तिघांनी तीन वेगळ्या खोल्या घेतल्या होत्या. आता नक्की कोण जास्त घोरते आणि कोण नाही हे सांगणे खरच कठीण आहे कारण जो घोरत असतो तो झोपलेला असतो आणि जागा असतो तो आरोप करत असतो. नसतो तो ते आरोप फेटाळून लावत असतो. हा वाद कायमचाच सर्व कडे. पिंटू चा आवाज ऐकून मी आणि चेतन पटकन बाहेरील बाल्कनीमध्ये धावत गेलो. नुकतीच सकाळ होत होती आणि सूर्य पण नुकताच जागा होत होता. रात्री ढगांनी ओढलेली चादर त्याच्या प्रकाशाने झटकून टाकली होती. वातावरण स्वच्छ झालं होतं आणि आकाश निरभ्र. आम्हाला प्रथमच हिमालया ने दर्शन दिले. पंच चुली नावाची पर्वतरांग आमच्या डोळ्यासमोर उभी होती. त्या विलोभनीय दृष्या कडे बघून डोळ्याचे पारणे फिटले. हिमालयात आल्याची तेव्हा पहिली जाणीव झाली. पांडव जेव्हा स्वर्गात गेले त्याच्या आधी इथे त्यांनी स्वयंपाक केला म्हणून त्याचं नाव पंच चुली असे  ठेवण्यात आले.

 
पटापट आवरून पुढच्या दहा दिवसातली शेवटची आंघोळ करून आम्ही तिघे जण सॅक भरल्या आणि त्या हॉटेलच्या बाहेर आणून ठेवल्या. गंगाराम आमची वाट पाहत बाहेर उभा होता. त्याच्याबरोबर धर्मेंद्र आणि मनोज कुमार नावाचे अजून दोन गडी शेजारी होते. आमच्या बरोबर आमचे पोर्टर म्हणून येणार होते. साधारण 28 ते 30 या वयोगटातले हे दोन तरुण तरतरीत आणि तगडे होते. त्यांनी दोघांनी चपळाईने आमच्या खांद्यावरच्या सॅक उचलल्या आणि आलेल्या बोलेरो वरती टाकल्या. 




उत्तराखंडमध्ये आजकाल कुठल्याही नॅशनल फॉरेस्ट मध्ये किंवा  inner  circuit, मध्ये जायचे असेल तर तिथल्या परमिशन घेणे गरजेचे असते. या परमिशन आर्मीच्या किंवा तिथल्या लोकल अथोरिटी चा किंवा बॉर्डर सेक्युरिटी फॉर्सेस वतीने आपल्याला मिळू शकतात. परमिशन ची तयारी थोडीशी आधीच करावी लागते कारण त्याच्याबरोबर आधार कार्ड तीन फोटो इतर  काही डॉक्युमेंट्स व एक पत्र ज्याच्या मध्ये तुम्ही कोण चाललाय कुठे चाललाय आणि जाण्याची आणि येण्याची जबाबदारी सर्व तुमच्यावरती असेल असे लिहून त्यांना द्यावे लागते. सुदैवाने गंगाराम ने काम आधीच केले असल्याने आम्ही तिथल्या  बॉर्डर सिक्युरिटी च्या ऑफिस मध्ये जाऊन पेपर सबमिट करून, सही शिक्का मिळवून दहा वाजता मुंसियारी मधून पुढच्या प्रवासाला निघालो. 20 किलोमीटर चा बोलेरो चा प्रवास करून आम्ही नीलम नावाच्या गावी पोहोचलो.



वरील गाडी वर फोन नंबर आहे. 

प्रवास हा मिन्सिंग टॉप पर्यंत पूर्ण चढ आणि त्यानंतर तीन ते साडेतीन किलोमीटरचा उतार असा होता. पहिल्याच दिवशी अडीच ते तीन सिंहगड असे साधारण चढण होते. पुढच्या सर्व ब्लॉग मध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशीची थोडीफार तुलना  सिंहगड शी केलेली जाणवेल. आमच्यासाठी म्हणजेच सर्व पुणेकरांसाठी सिंहगड हे नुसतं आदराचं स्थान नसून ट्रेकिंग चे एक परिमाण आहे. आम्ही पुणेकर उंची फुटात किंवा मीटर मध्ये मोजत नसून सिंहगड मध्ये मोजतो. 


मेंन सिंग टॉप च्या अलीकडे एक ते दीड किलोमीटर डावीकडे पाटी आढळली. 'आगे खतरनाक रास्ता है' असे लिहिले होते. खरं तर पाटी  कडे पाठ करून आम्ही दोन क्षण विश्रांती साठी बसलो होतो. पिंटू चे लक्ष त्या कडे गेले आणि त्याच्या पायातील त्राण जायला सुरुवात झाली. हावभाव बदलताना जेव्हा आम्ही बघतो तेव्हा एकीकडे खूप त्याची काळजी वाटते आणि दुसरीकडे हसू आवरत नाही. कारण त्यावेळी पिंटू त्याच्या तोंडातून अर्वाच्च शिव्या आणि काहीही ज्याचा कशाशी काहीही संबंध नाही असे चमत्कारिक काही तरी बोलत असतो. खरंतर या पाटी पासून टॉप पर्यंत रस्ता खरंच खूप अवघड आहे. एकीकडे साधारण हजार 2000 फुटाची दरी आणि दुसऱ्या बाजूला उंच पर्वत आणि वाट साधारणतः आठ ते नऊ इंच इतकीच, पाऊल ठेवायला पुरेल एवढीच. पिंटूला उंचीची प्रचंड भीती वाटते. तरीही तो या ट्रेकला आणि अशा अनेक ट्रेकला आमच्या बरोबर येतो चिडचिड करतो पण ट्रेक मात्र पूर्ण करतो. 




संध्याकाळी 5 च्या सुमारास आम्ही बबल धार नावाच्या एका छोट्याशा गावात पोचलो. अर्थात गाव म्हणजे पाच ते दहा झोपड्यांच्या वरती तिथे काही दृष्टीस पडले नाही. अशाच एका छोट्याशा  झोपडीमध्ये आमची पाठ टेकायची सोय झाली. या Home Stay मध्ये दोन्ही बाजूला अखंड प्लॅटफॉर्म तयार केलेला असतो. तिथेच समोर ताट वाटी ठेवायला एक कट्टा तयार केलेला दिसतो. जेवण झालं की मागे जाऊन पडायचे. त्या दिवशी या छोट्याश्या घरात खूप गर्दी होती. समोरील बाजूला साधारण २० गावकरी आडोश्याला आले होते. सर्व वरून खाली उतरत होते. Migration  हा नवा concept, इथला, आज कानावर पडला. त्या दिवशी थोडीशी लोकल ज्याला म्हणतात, म्हणजे Homemade  Rice Wine  पियालो. मनाली मध्ये लुंगडी, इथे चांग अजून सिक्कीम मध्ये अजून काही अशी बरीच नवे आहेत. रात्री डाळ भात आणि कुठलीशी  भाजी खाऊन आम्ही ट्रेक चा पहिला दिवस संपवला. रात्र भर प्रचंड पाऊस चालू होते. पत्र्यावर ताशा वाजवत तांडव करीत होता. एका गावकऱ्यानी दारापाशी त्याची एक बकरी बांधून ठेवली होती. रात्री शु करायला जातांना ती मध्ये मध्ये यायची, सर्वांच्याच. मधूनच आवाज काढायची. तिला खोकला झाला होता. खोटं नाही सांगत.  ३ नाही वाजले तर गावकरी उठून जायच्या तयारीला लागले. त्यामुळे इथे झोप विशेष काही झालीच नाही. ही जागा जंगलात होती. इथे 'बिछू' नावाची एक भयंकर झाडाची जात आहे. सकाळच्या कामाला गेलो असतांना त्याच एका बिछू नी पायाला स्पर्श केला. नंतर चे १५ मी मी बॉम्ब मारत होतो. काय जादू आहे माहित नाही पण खूप खाज सुटत होती आणि जाळ लागला होता पायांना. बरं तर बरं अजून कुठे टेकला नाही तो 'बिछू'.  





त्यादिवशी गरम गरम पराठे आणि लोणचे हपसून, थोडासा चहा पिऊन आम्ही बबलधार हुन पुढे निघालो. 
गौरीगंगा नदीच्या काठानी आमचा प्रवास या नदीच्या उगमापर्यन्त जाणार होता. नदीचा आवाज आमचा सोबती झाला होता. ओथंबून वाहणारी ही गौरीगंगा प्रथम दृष्टीस पडली. पुढचे ८ ते ९ दिवस आम्ही हिचे अनेक रंग पहिले. हिच्या अनेक मानसिक स्थिती पहिल्या. कधी शांत तर कधी दगडांना चिरून सळसळत पुढे जातांना हिला पहिले. दर वेळी जेव्हा अनुभवासारखे छोटे छोटे झरे हिच्यात सामावत तशी तशी हिला मोठी होतांना पहिली. आपल्यासारखीच ही असा एक विचार मनाला चाटून गेला. हिच्या सारखे न थांबणे, न थकणे, न निराश होणे जमले तर अजून काय हवय. आज पण कधी तरी स्वप्नात येते ती, आणि त्या आवाजांनी जाग येते. 
बबलधार हुन खाली उतरलो आणि रडगाडी नावाच्या ठिकाणी पोचलो. हँगिंग ब्रिज पार करून स्युनी च्या दिशेनी वाटचाल केली. 






हे स्युनी म्हणजे 'बिछू' चे महेर. जिकडे तिकडे उगवले आहे. काँग्रेस सारखे. म्हणजे गवताविषयी बोलतोय. 



आजचा पल्ला १२ कि मी चा असेल. संपूर्ण चढाई चा - नहार देवी पर्यन्त. दिवस सुंदर होता. सूर्य बाहेर आला होता आणि त्यामुळे गरम होत होते. या रत्यावर असंख्य वेळा आम्हाला छोटे झरे पार करावे लागले. निमुळत्या रस्तयावर घसरड्या दगडांवर पाय ठेऊन, बूट ओले होत नाहीत याची खबरदारी घेऊन आम्ही पुढे चालत होतो. एक दोन वेळा चुकीच्या दगडावर पाय ठेवल्याने सर्वांचेच बूट पाण्यात गेले असतील. आता दगडावर पाय हे literally घेणे गरजेचे आहे, इथे तरी. चुकीच्या दगडांवर पाय सर्वांचाच पडत असतो आणि त्यातून आपण शिकत असतो. इथे चुकीचे पाऊल पडले तर खाली आपला शव आणायला पण कोणी उतरेल असे मला वाटत नाही. स्युनी ला आम्ही रमतगमत पोचलो. पायांना पण आता कळले होते की चालणे आहे. त्यामुळे ते पण मस्त साथ देत होते. एकीकडे ORS चा भडीमार चालू होता आणि त्यामुळे cramps आले नाहीत. स्युनी ला पोचलो आणि चहा झाला. फार वेळ न थांबता आम्ही बुगडियार नावाच्या गावाकडे जायला निघालो. उजवीकडे गौरीगंगेला ठेऊन आम्ही वर वर सरकत होतो. 

बुगडियार ला आम्हाला पहिला चेक पोस्ट लागला. ITBP चा पोस्ट. इंडियन तिबेटी बॉर्डर पोलीस. इथे साधारण २५ ते ३० जवान असतील. आत जातांना त्यांनी सर्व प्रश्न विचारले आणि माहिती लिहून घेतली. त्या जवानांशी थोड्याशा गप्पा झाल्या. पाणी पियालो आणि तिथून निघालो. 





जाता येता जय हिंद हे शब्द म्हणतांना उगाच आपलेच उर भरून येत होते. पण १० दिवसात जितक्या वेळा आम्ही जय हिंद म्हणले असेल तितक्या वेळेला वर्ष भारत म्हणालो नसू. पण आता परत आलो तरी तीच सवय ठेवणार आहे. नमस्कार म्हणण्या पेक्षा जय हिंद म्हणायचे. काय हरकत आहे. 
समोरच्या घरा बाहेर धर्मेंद्र आणि मनोज चे सामान दिसले. त्या घरात आम्ही शिरलो आणि जेवायची सोय करायला सांगितली. जेवण म्हणजे फक्त डाळ भात मिळते. आणि कुठली तरी भाजी. मॅग्गी द्या म्हणाले तर नकली चिनी माल चिपकवतात ज्याची चव अत्यंत भिकार असते. आईनी खाराची मिरची दर वेळी प्रम्हाणे दिली होती. मिरची असली की भात, पराठे अजून काही जे मिळेल त्याच्या बरोबर ok लागते. या वेळी नकली मॅग्गी मध्ये मिरची घालून चव आणली. इथे पोचे पर्यन्त थोडेसे दमलो होतो. भात खालला आणि तशीच पाठ टेकली आणि १० min डुलकी काढली. आमच्या तिघांच्या आणि गंगाराम च्या गप्पा चालू होत्या. दर ठिकाणी जात असतांना तिथल्या काही गमती तो सांगत असे. तिथले काही वैशिष्ठ्य असेल तर त्याचा उल्लेख करत असे. गंगाराम चा गेल्या वर्षातील हा पहिलाच ट्रेक होता. १ वर्षांनी आम्ही तिघे base कॅम्पला जाणारे पहिलेच होतो. 





जशी गौरीगंगेच्या या काठावर गावे होती तशीच पलीकडे पण. तिथे जायला यायला Wire  Rope  नी बांधलेल्या पिंजऱ्यातून बसून पार करायची सोय होती. जाता जाता अनेक गावकरी मुन्सीयारी च्या दिशेनी जातांना दिसत होते. त्यांच्या बरोबर लहान मोठे, वृद्ध, गाई, बकऱ्या, कुत्री आणि इतर संसार असे सर्व होते. समोरून हे लोक आणि मागून पाठीवर ४० lit  चे २ drums घेऊन तेल नेणारी खेचरं मधून मधून वाट अडवत होती. ८ km चा प्रवास झाला होता आणि ४ ते ५ राहिले होते. १ वाजून गेला होता आणि वातावरणातील बदल जाणवू लागत होता. थोडा पाऊस चालू झाला. मी माझा तंदरीत पुढे चालत होतो. डोक्यात खूप विचार येत असतात. हजारो. या विचारांपासून पळून जायला मी इथे येतो. पहिले काही दिवस ते काही केल्या सोडत नाहीत पण नंतर नंतर त्यांनी नाही सोडले तरी मी त्यांना मात्र सोडून पुढे जातो. घरची आठवण आणि काळजी, हे मात्र मला आता होत नाही. मुले मोठी झाली म्हणून असेल अथवा अजून काही तरी. नहारदेवी च्या अलीकडे मला आठवत आहे एका ठिकाणी गौरीगंगा दगड चिरत उसळत निमुळत्या जागेतून वाट काढत येते आहे. तिथे वर जाऊन मी शांत बसलो होतो. ते रौद्र रूप पाहत. आपण किती चिल्लर आहोत आणि आपला अहंकार, राग, द्वेष अथवा मी पण याला इथे किती किंमत शून्य आहे याची जाणीव नक्कीच होते. Its an humbling experience. Over confidence is crushed to pieces. There is no place for ego here. Unless you are ready to surrender, there is no place for you in the Himalayas. 






नहारदेवीचे मंदिर वरती दिसत होते. मागून चड्डी आणि पिंटू ला येतांना पाहून मी पुढे निघालो. दोघे जण फोटो काढण्यात मग्न झाले होते. जात येत असतांना आमच्या गप्पा चालू होत्या LLPH as usual. Love  Liberty अँड the pursuit ऑफ happiness. शेवटचा चढ अंगावरचा होता. खूप मागून एक जवान येतांना दिसला. तो वर पोचला होता. आधीच. त्यांनी चहा पाजला. तो सकाळी नीलम मधून निघाला आणि रात्री पर्यन्त मिलाम ला पोचायचे होते. म्हणजे ५५ ते ६० Km चा प्रवास तो एका दिवसात करणार होता. फिटनेस अशक्य त्याचा. पुढचे ३ महिने त्याची ड्युटी मिलाम ला होती. या ड्युटी बद्दल च्या पुढे पुढे खूप गप्पा झाल्या. वर कोपऱ्यावरील एका घराबाहेर मी पोरांची वाट पाहत थांबलो. बूट काढून मोकळा झालो. 




बुगडियार ला का स्युनीला मला वाटते की गंगा नी जुगाड करून मिलिटरी रम मिळवली होती. त्यामुळे थंडीची सोय इथे झाली होती. एका स्वतंत्र खोलीमध्ये आमची तिघांची सोय झाली. दुपार ३.३० ला पोचलो आणि सॅक नीटनेटक्या ठेऊन कपडे बदल झाले. कोणी इकडे तर कोणी तिकडे हरवले. आजूबाजूच्या लोकांशी गप्पा मारण्यात वेळ जात होता. एकीकडे निसर्गाचा live light अँड sound show चालूच होता. त्यादिवशी रात्री आम्ही ७ - ७.३० ला झोपी गेलो असू. थोडेसे दमलो होतो. ट्रेक चा दुसरा दिवस पण उत्तम गेला. 
दर ठिकाणी आम्ही थांबू तिथे काही विडिओ काढले आहेत आणि आम्ही बोललो आहोत. त्याचा एकत्रित एक विडिओ करणे चड्डी आणि पिंटू ने मनावर घेतले आहे. 





ह्या माणसाकडे आम्ही राहिलो होतो. छान ताजी भाजी मिळाली. 

सर्वात चांगली गम्मत इथे म्हणजे सकाळी डबा टाकायला चक्क संडास मिळाला. चला एक दिवस सुटका झाली. लवकर उठून तिथला हिशोब करून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. २०० मी वर नहारदेवी चे मंदिर आहे. तिथे नमस्कार केला आणि काही वेळ थांबलो. या मंदीच्या वरती एक नाग आहे, दगडात कोरलेला. हे नंतर कळले पण नहारदेवी च्या पुढे सरपटणारा एकही प्राणी नाही दिसला. नागाचा तिथंच दगड करून नहारदेवीनी त्याला तिथे थोपवले आहे अशी कथा आहे. खरं पण हेच आहे असा अनुभव आला. साधारण ३ km चालून गेल्यावर लापसा नावाचे गाव आहे. दुरून इथे आम्हाला एक JCB दिसला. रस्त्याचे काम जोरात चालू झाले आहे. मिलम पासून ते इथे पर्यन्त रस्ता झाला आहे. डोंगर cutting जोरात चालू आहे. निसर्गाला खरवडून त्याचे लचके तोंडाने चालू आहे. आत्ता पर्यन्त नहारदेवी पर्यन्त रस्ता झाला पण असेल इतक्या वेगानी काम चालू आहे. चीन बॉर्डर जवळ आहे आणि त्यामुळे इथे हे करायलाच लागणार आहे. सुरक्षा महत्वाची. 





Road  Construction  करणारे लोकांचे कौतुक आहे पण. अशक्य आहे इथे रस्ता करणे पण तरी केला आहे. आम्ही रस्त्याला लागलो आणि पुढे साधारण १२ km रस्ता सोडला नाही. काही ठिकाणी शॉर्ट कट मारत आणि गप्पा गाणी म्हणत निवांत काम चालू होता. चढण होतच पण रस्त्यावर. वारा प्रचंड वाहत होता आणि आम्हाला हलवत होता. थंड वारा त्यामुळे कान झाकून घेतले होते. चड्डी चे नुकतेच कानाचे operation झाले होते. मी आणि पिंटू नी त्यावर खूप भाष्य केले आणि त्याची थट्टा उडवली होती. बरेच वेळा त्याला ऐकू येत नसे आणि त्यामुळे बरेच वेळा बरेच काही बोलून मोकळे झालो असू. एका कानाला हाथ लावत तो काय काय करायचा आणि मुद्दा होऊन गेला तरी त्याला कळायचे नाही. चालायचेच. त्रास झाला नाही आणि फार त्यांनी दिला नाही हे चांगले झाले. त्यांनी म्हणजे कानानी. चालून चालून असंख्य वळणे गोल फिरून दूर वर एक गाव नजरेस पडले. ते होते रिलकोट. इथे ITBP चे दुसरे चेक पोस्ट लागले. आत गेलो तेव्हा यादव नावाच्या एका जवानाने आमचे स्वागत केले. बसायला जागा दिली आणि आमची माहिती लिहून घेतली. इकडच्या तिकडच्या गप्पा खूप झाल्या. ३० वर्ष त्यांची सर्विस झाली होती. त्याची आई आजारी होती आणि ब्रेन हॅमरेज झाले होते. फोन नाही की काही नाही, इथे range  नाही. कसे बसे WiFi ची सोय फक्त कामासाठी म्हणून इथे आहे. 
विमानात बसलो तेव्हा कोल्हापूर चा एक माणूस माझा शेजारी बसला होता. अगदी विमान उडे पर्यन्त त्याचे व्हिडीओ कॉल चालू होते. Sweetheart नावानी स्टोर केलेला नंबर सारखा लावत होता. मग कॉल चालू झाला की अस्सल कोल्हापूरी भाषेत तो त्याच्या sweetheart शी बोलत होता. मग एका लहान मुलाशी. मी शेजारी बसून सर्व खेळ निवांत पाहत होतो. चेतन माझा सीट पाशी येऊन काही तरी मराठीतून बोलला आणि हे माझा शेजारील माणसानी ऐकले. विमान उडायची वेळ झाली आणि त्याचा विडिओ कॉल एकदाचा शांत झाला. माझा कडे बघून म्हणाला की कधी कधी नको वाटते ही नोकरी पण देश मध्ये येतो आणि मी निघतो. दोन क्षण मी शांत झालो. लक्षात आले की कॉल का चालू होता. काश्मीर मध्ये बॉर्डर वर त्याला आणि त्याच्या सारख्या अजून जवानांना नेण्यासाठी चार्टर दिल्ली ला वाट पाहत होते. त्याला सलाम करून तोंडातून अवाक्षर न काढता मी बसलो. समोरून एक माणूस आला आणि मला म्हणाला की ही माझी सीट आहे. तिकीट पहिले तर मी चुकीच्या सीट वर बसलो होतो. मागे गेलो तरी मनातून आमचे संवाद आणि त्याचा विडिओ कॉल काही जात नव्हता. 
यादवजींशी बोलून परत तोच तो अनुभव आला. भारतामध्ये १८ वर्ष पूर्ण झाली की प्रत्येकाला देशासाठी १ वर्ष द्यायलाच पाहिजे हा नियम करायला हवा. फुकटचे मिळालेले स्वातंत्र्य, सुरक्षा याची किंमत नाही कोणाला. १ महिना बॉर्डर वर पाठवायचे आणि कष्ट करायला लावायचे. 



यादवजी चेतन आणि पिंटू 






रिलकोट ला एका सुंदर टुमदार घराच्या आवारात शिरलो. बसायला जागा नव्हती. तिथली माउली लाल रंगाचा जाड डोरा आणि दाभण घेऊन जमिनीवर बसली होती. तिचा नवरा समोरील छोट्या कट्यावर दोन्ही गुढगे एकत्र जवळ करून बसला होता. गंगा आत शिरला आणि पहाडी भाषेत संवाद साधून वर असलेल्या खोलीत आमची रात्रीची सोय केली. माउली शिवणकाम करीत होत्या. डाव्या कोपऱ्यात काही दिवसांपूर्वी कापलेल्या बकरी चे मुंडके होते. जमिनीवर छोटे मासाचे तुकडे वाळत होते. मागच्या बाजूला दोरीवर मोठे मासाचे तुकडे वाळत होते. 



त्या बाई, आता इथे त्यांना माउली नाही म्हणणार, एक एक मावसाचा तुकडा नीट उचलत आणि दाभण त्यात घुसवून फुल ओवतात तसे ओवून त्याचा हार करीत होती. थंडी जवळ आली आणि बर्फ पडायला सुरुवात झाली की इथल्या लोकांचे हे जगण्याचे खाद्य होय. एकंदरीत हे सर्व पाहून आणि गप्पा मारून आम्ही खोलीत गेलो आणि निपचित पडलो. चालणे १५ Km च्या वर झाले होते. नेहमीची आवराआवर करून मी नदीच्या काठाशी निघून गेलो. शांतपणे तिथे १ तास काढला असेल. साधना म्हणा ध्यान म्हणा बुवाबाजी म्हणा नाही तर काहीही, तिथे जे काही डोळे मिटल्यावर होते त्याचा अनुभव इथे लिहिणे मला शक्य नाही. १ तास कसा गेला मला कळले नाही. सूर्यास्त झाला होता. लोकांनी आपापले टॉर्च काढून दिवे लावले होते. "सूर्यास्त पहाडी मस्त" हा concept  गंगा नी पहिल्याच दिवशी सांगितलं होता. त्या रात्री आम्ही तिघे आणि गंगा मनोज आणि धर्मपाजी असा मस्त गोल केला. आपापले ग्लास भरले आणि गप्पा रंगल्या. गंगा अत्यंत मिश्किल आणि मृदुभाषी होता. त्याला विचारले आम्ही की सर्वात भयंकर असा अनुभव तुला कुठला आला आहे ? त्यांनी शांत पणे उत्तर दिले की दो साल पहिले १२ लोगोंको वही उपर छोड के वापस आना पडा. दोन वर्षा पूर्वी झालेल्या expedition  मध्ये तो पण होता आणि base camp  पर्यन्त त्याची जवाबदारी होती. त्या नंतर शेर्पा १२ लोकांना summit  पर्यन्त नेणार होते. Avalanche - आणि त्यात सर्व लोकं गाढली गेली. ११ शव सापडली. एक अजून तिथेच हरवले आहे. आम्ही तिघे सर्व गोष्ट ऐकत होतो. त्या झोपडी मध्ये वर एक टेन्ट लॅम्प टांगलेला होता. त्याचा प्रकाश, मध्ये ठेवलेल्या काजू बदाम आणि लावलेल्या पोह्यांवर पडत होता. अधून मधून एक एक घास खाणं चालू होते. एक गोष्ट झाली की दुसरी असा संवाद चालू होता. ७.३० / ८ च्या सुमारास धरम आणि मनोज खाली उतरून हॉटेल मध्ये गेले. हॉटेल म्हणजे छोटी टपरी. तिथून पाले भाजी आणि पराठे घेऊन आले. छान जेवण झाले, मग रव्याचे दाण्याचे लाडू झाले. चड्डी चिडचिड करून झोपून गेला. काही तरी छोटे वाद झाले होते. मी आणि पिंटू शतपाउली करायला बाहेर पडलो. घरा समोरील रस्त्यानी गप्पा मारत होतो. निरभ्र आकाश लाखो चांदण्यांनी सजलेलं. मोबाइल एक app चालू करून विविध चांदण्या, ग्रह आणि इतर हे गंगा आणि दोघांना आम्ही सांगत बसलो. पिंटू आणि मी बाहेरच्या रस्त्यावर जाऊन चक्क जमिनीवर आडवे झोपलो. वर बघत बघत थंडी मध्ये आणि किट्ट अंधारात त्या ब्रह्मांडात हरवून गेलो. तेव्हा मला जाणवलं की 'विचार' नावाच्या भुताला मी कधीच मागे टाकून पुढे आलो होतो. त्यावेळी माझा डोक्यात कुठलाच आणि कोणाचाच विचार नव्हता. 





पहाटे चा गजर झाला. आम्ही दोन दिवस नंदा सुनंदा च्या दर्शना पासून लांब होतो. आजचा पल्ला बुरफू असा होता. सकाळीच भात भाजी खाऊन आम्ही ट्रेक चालू केला. यादवजी आणि इतर काही जवान साधारण ७५ बकर्यांना हाकत बुरफू च्या दिशेनी आम्हाला जातांना दिसले. गंगा म्हणाला तोच तो रस्ता. पायाला सवय झाली होती आणि आमचा चालायचा वेग पण भारी झाला होता. ८ / १० Km  किरकोळ वाटत होते. एक अशक्य चढ घसरत घसरत चढून आम्ही जुन्या रिलकोट पाशी पोचलो. ५ / ७ पडक्या झोपड्या एका कड्याच्या काठाशी उभ्या होत्या. फक्त सांगायला की इथे पूर्वी अन्न शिजत असे. 






गौरीगंगा (खरं तर या नदीचे नाव गोरीगंगा आहे, पण गौरीगंगा छान वाटते म्हणायला त्यामुळे मी गौरीगंगा म्हणतोय - नावात काय आहे anyway) कधी शेजारी तर कधी १००० फूट खाली असे चालूच होते. ८ km वगरे ट्रेक केला आणि बुरफू नावाच्या गावी पोचलो. जिथे थांबलो तिथे ७५ बकऱ्या बसून भ्या भ्या आवाज काढत वाट पाहत होत्या. ६ / ८ जवान वरील खानावळी मध्ये जेवत होते. आम्ही तिघे तिथे पोचलो आणि पूल ओलांडून वरच्या टेकडीवर राहायचे आहे असे गंगा नी सांगितले. साधारण १ वाजला असेल. पिंटू म्हणाला मला की ट्रेक काहीच झाला नाही आज. काहीच दमलो नाहीये तर पुढे जाण्याविषयी काय वाटते. तिघांची चर्चा होत असे. प्रत्येक निर्णय घेण्याआधी साधारण लॉजिक आणि रिस्क assessment वापरून चर्चा करून  पुढे जायचो. गंगा ला विचारले आणि पुढे जायचा निर्णय घेतला. मला वाटते हा निर्णय या ट्रेक मधील सर्वात मोठा निर्णय ठरला असावा. जवानांचे जेवण झाले. बाहेर येऊन गप्पा झाल्या. इथून एक रस्ता मिलम ला जातो आणि एक घनघर ला. घनघर हे Base Camp च्या आधीचे शेवटचे गाव. मिलम ला इंडियन आर्मी चा मोठा कॅम्प आहे. तिथून २ दिवसांवर चीन बॉर्डर आहे. थंडीची तयारी म्हणून ७५ बकऱ्या जवान बरोबर घेऊन जात होते. आधी भेटलेली ४० lit  चे दोन डब्बे घेतलेली खेचरे पण सर्व fuel  घेऊन तितेच निघाले होते. चीन ची घाणेरडी जमिनींची चिंधीचोरी गेल्या काही महिन्यात खूप वाढली आहे. या आणि यांच्या सारख्या खरकट्या आणि भिकार शेजाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मिलम मध्ये चांगलीच सोय आहे. जय हिंद म्हणालो आणि तिथून पुढे जायचे ठरले. ६ Km  वर घनघर ला जाऊन मुक्काम करायचा आणि सकाळ सकाळ नंदादेवी चे दर्शन घ्यायचे ठरले. तिथे पोचायला दोन रस्ते आहेत. एक नदी काठ धरायचा आणि डावी कडे खडा चढ चढून गावाच्या रस्त्याला लागायचे. नाही तर वर वर डोंगरावरूनच सरळ चालत गावी पोचायचे. इथे जरा अंदाज चुकला. पाऊसामुळे रस्ते वाहून गेले होते. जिथून पाणी खाली येते आणि नदीला मिळते, आणि जिथे जिथे दरडी कोसळून डोंगराचा भाग नाहीसा झाला आहे, तिथे तिथे दऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे त्या दऱ्या साधारण १०० - ४०० फूट खोल उतरायच्या आणि परत चढायच्या अशा पद्धतीने पार करायला लागणार होत्या. आमच्या कडे सेफ्टी साठी काहीच नव्हते. माझा कडे सवयीप्रम्हणे सॅक मध्ये दोन छोटे रोप होते इतकच. पाय घसरला तर मात्र मृत्यू. सावकाश सावकाश आम्ही पहिली घळ पार केली. मग दुसरी केली आणि मग तिसरी साठी तयारी. तिसरी घळ उतरायला न रस्ता होता ना चढायला. दुपारचे ४ वाजून गेले होते. अंधार पडायला फार वेळ नव्हता. मी आणि गंगा वाट शोधायला अजून अजून वर जाऊ लागलो. घळीच्या मुळाशी गेलो तर कदाचित काही तरी मार्ग निघेल असे वाटत होते. पण तसे काही झाले नाही. वर खाली करण्यात १ तास गेला. परत नदी काठच्या रस्त्याला जायचे आणि परत वर यायचे म्हणजे ४ तास गेले असते. ते शक्य नव्हते. मागे फिरायचे तर परत ज्या घळी पार केल्या आहेत त्यांच्याशी परत लढाई. मार्ग एकच होता. गंगा नी पिंटू चा हाथ धरून एक एक पाऊल सावधपणे टाकत खाली सोडले. मी वरून घळीच्या समोरील बाजूस वर कसे चढता येईल याचा अंदाज घेत होतो. म्हणाले आता आर या पार. खाली उतरलो आणि शेवटच्या पौईन्ट ला मोठा दगड पायाखालून घसरला. सुदैवानी माझे लक्ष उतारण्याकडे नसून वर चढण्याकडे लागून राहिले होते त्यामुळे या घसरण्याचा माझा वर काही परिणाम झाला नाही. मी पिंटू ला म्हणालो चल माझा बरोबर आणि खाली उभा राहा. मी वर जातो. तोवर चड्डी पण खाली आला होता. जसा जसा मी वर जात होतो, तशी तशी रिस्क वाढत होती. छोट्या झाडांच्या मुळा मध्ये पाय रोवून आणि काठीचा आधार घेत, मी वर सरकत होतो. ७० फूट वर पोचलो आणि १० फूट उरले होते. तिथे मात्र पुढे जायला काही वाट नव्हती. पायाखाली दगड हलायला सुरुवात झाली होती. हातातील दोन्ही काठ्या मी वर भिकावून दिल्या. एका दगडावर हातानी घट्ट दाब दिला आणि तिथे स्थिर झालो. मला अवचितगड आठवला. मी आणि पिंटू रस्ता नाही मिळत म्हणून सरळ सोंडेवरून वर चढलो होतो. अर्धवट मध्ये अडकलो तेव्हा मी पिंटू ला म्हणाल्याचे आठवते की गेलो तर घरच्यांची काळजी घे. इथे तेच झाले होते. चड्डी शेवटी उतरला होता आणि त्यामुळे रस्ताची  रेकी करत असतांना तो तिथे होते. मी अडकलेलो पाहून चड्डी खालून ओरडला की नाना उजवीडे जा, तिथे रस्ता सापडेल. गंगा खालीच सर्व बघत होतो. मी उजवीकडे जाण्यासाठी पाय उचलला आणि खालचा दगड खाली कोसळलेला. मातीत पाय रोवून मी जोरात push  केलं आणि वरच्या बाजूला पोचलो. गंगा वर आला आणि हळू हळू याच रस्त्यानी दोघांना वर आणले. आम्ही घळ पार केली. मोठे संकट टळले. इथे मला फक्त आणि फक्त ती शंभो ची शक्ती दिसते. इथे मला वाटतं की तो बरोबर आहे, बाप्पा काळजी घेतो आहे. नाही तर हे शक्य नाही. 




पुढचे काही Km सहज चालत आम्ही ओसाड अशा घनघर मध्ये पोचलो. सर्व गावं शांत होती. घरं रिकामी. आणि रस्ते म्हणजे भूलभुलैया. या वरूनच गंगा नी एक गोष्ट सांगितली होती की नवे लग्न झाले आणि गावात मुलगी आली की हमखास हरवायची. त्यामुळे प्रत्येक गावात एक खांब असायचा आणि उंचावर. तिथे जाऊन announcement व्हायची की अशी एक बाई हरवली आहे. नवविवाहित आहे तर आपापल्या बायकोला नेण्यासाठी इथे यावे. असो. तर शेवटी आम्ही नंदादेवी च्या जवळ पास पोचलो. एक घर, वर जमिनीवर पसरलेलं गवत, खालच्या बाजूला स्वयंपाकघर आणि वर ४ छोट्या खोल्या. अशा आलिशान घरामध्ये आमची राहायची सोया झाली.  आजचा प्रवास मात्र खूप कठीण झाला. आम्ही जिथे राहत होतो तिथेच मागे नंदादेवीचे सुंदर मंदिर होते. मंदिरामागून base camp ला जाण्याची वाट दिवस होती. ढगांनी परत गर्दी करायला सुरुवात केली होती. त्यामुळे नंदादेवी चे आज काही दर्शन होऊ शकले नाही. आमच्या समोर च्या बाजूस पाचू नावाचे गाव आणि मग मिलम. हे सांगायचे कारण उद्या कळेल तुम्हाला. 










त्रिशूल, हरदेओल, नंदा गोंड, नंदा पाल, कलंका असे उंच उंच हिमपर्वता मध्ये आम्ही राहत होतो. इथे राहायचे म्हणून बुरफू मधूनच शिधा, कुकर, एक भांडे आणि असली maggie घेऊन आलो. रात्री साठी पुऱ्या आणि भाजी बांधून घेतले होते. धरम आणि मनोज आमच्या नंतर निघाले १ तासांनी पुऱ्या घेऊन आणि आमच्या बरोबर पोचले. ते खालच्या वाटेनी आले होते. ती वाट पण काही सोपी नाही पण वाट आहे इतकच. बाहेर कट्ट्यावर बसून थोड्या गप्पा झाल्या आणि जेवण करून आम्ही झोपी गेलो. 

भल्या पहाटे बाहेर काही तरी गप्पा चालू आहेत असे ऐकण्यात येताच जागा झालो. मला वाटले अजून कुठलातरी ग्रुप पोचला आहे. बाहेर जाऊन पहिले तर जवानांची एक तुकडी तिथे पोचली होती. विचारणा केली तेव्हा ते म्हणाले की Base  Camp  पर्यन्त चक्कर मारायची आहे म्हणून निघालो आहोत. ३० एक जवान आमचे दात घासून होई पर्यन्त दिसेनासे झाले होते. जेव्हा आम्ही अर्धी वाट कापली होती तेव्हा हे परतीच्या वाटेवर अर्ध्याहून जास्त पुढे आले होते. 
इथून base  camp  पर्यन्तची वाट जरा अव्हागड आहे. खतरनाक म्हणा. साधारण एक तास वर गेल्यावर पिंटू च्या पायातील त्राण गेला, तो शिव्या घालायला लागला आणि त्याचा व्हर्टिगो किक इन झाला. १० min  समजावयाचा मी खूप प्रयत्न केला. फक्त ५ Km अंतर उरले होते. पिंटू म्हणाला की मी आलो तर अडचण होईल आणि तुम्ही पण पुढे नाही जाऊ शकणार. त्याचा स्टॅमिना दांडगा आहे पण व्हर्टिगो त्याला खच्ची करून सोडतो. इतका आला हेच खूप मोठे आहे. गंगा म्हणाला पुढे नको न्यायला त्याला कारण काय काय असेल पुढे हे माहित नाही. पिंटू चे डोळे भरून आले. मी आणि चेतन पण निराश झालो. पिंटू ला परत जायला लागणार - त्याला नंदा देवीचे दर्शन होणार नाही या कल्पनेनी खूप वाईट वाटले. मनोज ला बरोबर घेऊन पिंटू बुरफू कडे परत निघाला. मी चेतन गंगा आणि धरम आम्ही पुढे निघालो. १ च्या सुमारास Base Camp ला पोचलो. आनंदाश्रू वाहू लागले. इथे पर्यन्त पोचवले याचे देवाकडे आभार मानले. 
Nanda Devi East Base Camp - Another tick mark on the list of things to do. The overwhelming emotions and uncontrollable happiness of just reaching here is the moment to cherish in life. I am happy as if I have climbed the summit. For me it was the same. There it was Nanda Devi right in front of us but hidden behind the clouds. 
हा पूर्ण दिवस आम्ही प्रतीक्षेत काढला की कधी आम्हाला ते सौन्दर्य बघायला मिळेल. पण इथे श्रद्धा आणि सबुरी हे दोन शब्द म्हणजे शेवटचे असतात. आपल्या हातात काहीही नाही. मी आणि गंगा पाण्याच्या शोधात पुढे गेलो. खूप पुढे गेलो. तिथून ग्लासीआर ची सुरुवात होते तिथे पर्यन्त गेलो. त्याच्या पुढे जायला परवानगी नाहीये. परत तिथे मी एकटाच थांबलो आणि ध्यान केले. अशक्यच. आत्ता पण विचार केला तर अंगावर काटा येतो. छान वाटते पण. 

वाट बघत बघत रात्री शेकोटी पाशी बसून खिचडी खालली. बकऱ्यांच्या पिल्लाना ठेवायला तिथे एक खूप लहान  दगडी झोपडी आहे. त्यात गंगा आणि धर्मेंद्र राहिले. मी आणि चेतन टेन्ट उभे करून त्यात झोपलो. इथे थंडी चांगलीच होती. शून्याच्या खाली तापमान असेल. Sleeping Bag मध्ये शिरलो आणि झोपी गेलो. रात्री मध्ये दर काही वेळानी जाग यायची आणि टेन्ट ची zip खाली करून ढग हटले का बघत राहायचो. काहीच chance दिसत नव्हता. बाकी सर्व क्लिअर होता, फक्त नंदादेवी सोडून. परत झोपून जायचो. 

सकाळी ५.३० च्या सुमारास "सरजी उठो, उठो बादल हट गये है" गंगाराम च्या आवाजानी मी आणि चेतन ताड किनी जागे झालो आणि टेन्ट च्या लावलेल्या झिप उघडण्याची तडफड चालू केली. टेन्ट उघडले, आणि जणू स्वर्गाचे दार उघडल्याचा भास झाला. चड्डी ला दोन क्षण नंदादेवी चे peak  दिसत होते हे काळतच नव्हते. म्हणाले तेच ते, ढग नाही तीच ती नंदादेवी. नंदा सुनंदा आणि नंदा कोट यांचे विराट स्वरूप डोळ्या समोर उभे होते. असे कधीच कुठेच बघितले नसते. हेच ते ब्रह्म का हा प्रश्न मनात आल्या शिवाय राहत नाही. शिवाचे हेच ते घर. 
उन्हं वर येऊ लागली तसे एक एका शिखरावर सोनेरी कळस झळकायला लागला. आम्ही डोळे भरून ते सर्व दृश्य बघत होतो. असंख्य फोटो काढून ते कुठे तरी साठवायचा प्रयत्न करत होतो. पण ते काहीच शक्य नाही. पिंटू ची खूप आठवण आली. हा अनुभव घेतांना तो इथे हवा होता हे राहून राहून वाटत होते. मनापासून साष्टांग नमस्कार घातला आणि 'त्याचे' आभार मानून आम्ही तिथून निघालो. 













उतरतांना माझा मनात एकच विचार होता की बुरफू ला पोचल्यावर पिंटू ला तोंड कसे द्यायचे. असे पण ठरले होते की पिंटू पुढे मार्तोली नावाच्या गावी जाऊन आमची वाट पाहिल. काय आहे काही नाही काहीच माहिती नव्हते. 
 
Base Camp  सोडला आणि आम्ही परत धनगर च्या दिशेनी निघालो. वाटेत एका ठिकाणी चौघे विश्रांती साठी बसलो होतो. धर्मेंद्र बिडी मारत बसला होता. इथून पुढे काय करायचे वगरे चर्चा चालू होती. साधारण २५ फूट अंतरावरच्या झाडी मध्ये हालचाल दिसली आणि धर्मेंद्र "भालू भालू" म्हणून मोठानी ओरडला. आम्ही सर्व ताडकन उठलो आणि बोंबाबोंब करायला लागलो. साधारण ५ sec  मध्ये सोमोरून ८ फूट उंच काळे कभिन्न आसवल  समोर आले. भीतीदायक पण amazing  looking  creature. आमच्या आवाजांनी त्याची पण तारांबळ उडाली. अचानक आम्ही सोमोर पाहून  तो पण गडबडून गेला. पटकन मागे फिरून झाडांमध्ये शिराला. त्या असवलानी पाठ फिरवली आणि त्याच्या मागे त्याची दोन पिल्लं दृष्टीस पडली. टून टून उड्या मारत ती दोघे पण आई मागे गेली आणि झाडांमध्ये हरवून गेली. धनगर पर्यन्त पूर्ण उरलेली वाट गंगा डबा वाजवत खाली आला. आम्ही जिथे काल रात्री राहिलो होतो तिथे असवलानी येऊन साफसफाई केली होती. 
Geo tagging चालू होते आणि धनगर मध्ये आर्मी ची लोकं engineering विंग ची पोचली होती. त्यांच्याशी संवाद साधून बुरफू च्या दिशेनी आम्ही जोरात निघालो. येतांना नदी काठ ची वाट पकडली आणि बुरफू ला पोचलो. तिथे पोचलो तेव्हा समोरून पिंटू प्रकट झाला. नक्की काय बोलावे काय नाही हे कळेनासे झाले होते. त्याच्या चेहऱ्यावरील हास्य पहिले आणि आमचा जीव भांड्यात पडला. त्यांनी येऊन घट्ट मिठी मारली आणि म्हणाला काळजी करू नका. माझे नुसते नंदा देवी नाही तर त्रिशूल आणि मिलाम पीक चे पण छान दर्शन झाले. हे ऐकून लै भारी वाटले. तिथे बसलो आणि पिंटू त्याची आणि आम्ही आमची गोष्ट सांगायला लागला. तुम्हाला आठवते का पाचू चा उल्लेख केला होता मी, जे नदीच्या पलीकडे आहे, सकाळ सकाळ त्या दिवशी पिंटू बारफू वरून पळत पाचूला पोचला होता. मिलाम च्या थोडेसे अलीकडे. तिथून पूर्ण नंदादेवी,  नंदकोट,त्रिशूल, मिलाम  पीक असे सर्व पाहून तो परत बारफू ला पोचला होता. आम्ही धनगर हुन परत येत असतांना दुसऱ्याबाजूला जे दोन लोकं दिसली होती ते  पिंटू आणि मनोज होते. चला पिंटू नी पण तो अनुभव घेतला आणि खूप फोटो काढले याचे समाधान वाटले. 

येतांना जिथे राहिलो तिथे जातांना राहायचे नाही हा नियम. येतांना सर्व माझं ऐकायचे आणि जातांना सर्व तुमचे हा गंगा चा  नियम. मार्तोली गंगा चे गाव आणि बुरफूहून तिथे जायचे ठरले. परत ७५ deg चा अंगावरचा चढ चढून मार्तोली ला पोचलो. हे गाव या सर्व ट्रेक मधले माझे सर्वात आवडते गाव ठरले. डोंगरावर, सर्व बाजूनी कडा, आणि जवळपास कुठलाही उंच डोंगर नसल्यानी दूर दूर वर दृष्टी जाऊ शकत होती. इथून अजून काही mountain  peaks चे दर्शन झाले. This was the night for celebrations. एका सुंदर अशा हॉटेल मध्ये आम्ही राहिलो. रात्री धर्मेंद्र आणि मनोज नी लाकडे आणली आणि camp fire  चालू झाले. गाणी चालू झाली. गंगा चा चुलत भाऊ तिथेच राहत असे. तो पण आला आणि त्यांनी पहाडी गायन केले. ट्रेक छान झाला म्हणून आम्ही सर्वांचे आभार मानले. धर्मेंद्र आणि मनोज नी पहाडी मस्त हे या रात्री खूपच मनावर घेतले होते. थोडे फार आम्ही पण :-). हसत खेळत कधी जाऊन झोपलो मला माझेच कळले नाही. 
परतीचा प्रवास नेहमी खूप कंटाळवाणा असतो असा अनुभव आहे. पण इथे असे काहीच नव्हते. परत येतांना पण नवनवीन गमती जमती चालू होत्या. मार्तोली मध्ये एका छोट्याशा टेकडीवर एक मंदिर आहे आणि View पॉईंट आहे. सकाळ सकाळ पिंटू तिथे जाऊन आला. सूर्योदयाचे सुंदर फोटो त्यांनी तिथले काढले आहेत. 
आज खरंतर इथेच राहायचा प्लॅन होता. पण राजू जो तिथल्या हॉटेल चा चालक होता अत्यंत माजुरडा. त्यामुळे तिथून आम्ही पळ काढला. थेट रिलकोट ला पोचलो. सुदैवानी तिथे ट्रक मिळाली आणि ४ Km चालणे वाचले. त्रिलोक नावाचा ड्राइवर हा धर्मेंद्र चा भाचा होता. मिलाम पासून ते लास्पा   पर्यन्त हा दररोज वर खाली करायचा. मिलिटरी ची ट्रक ही आणि रोड च्या कामासाठी त्याचा वापर होत असे. त्रिलोक अत्यंत talented ड्राइवर होता. ट्रक मध्ये मागे बसून हाडे खिळखिळी झाली होती पण चालण्यापेक्षा हे बरे होते. लास्पा ला मुक्काम केला टेन्ट मधेच आणि सकाळी लवकर उठून बुगडियार ला निघालो. तिथे पोचलो तेव्हा बबलधार ला जायचा प्लॅन कॅन्सल करून PWD guest house मध्ये राहायची सोया झाली. उत्तम जेवण करून गप्पा मारून आम्ही झोपून गेलो. 
ट्रेक चा शेवटचा दिवस आला होता. बुगडियार हुन आम्ही निलम ला पोचणार होतो. परतीच्या वाटेवर मेंसींग टॉप उतरतांना पिंटू परत थरकापलेला दिसत होता. पण आता त्याची खूप हसून मजा घेतली . ट्रेक झाला होता. गंगा चा हात पकडून पकडून तो उतरत होता. मध्येच वाटेत चड्डी थांबला तर त्याला शिव्या देत होता .... अचानक "nana i am never going to be a part of any of your plans in the future - you FO." असे म्हणून पुढे गेला. हे त्याचे खेळ पाहून पॉट धरून हसायला येते. मी आणि चड्डी हसलो पण. 
हिमालयातील माझा हा ६ वा ट्रेक, प्रवास. या वर्षी दोन झाले. इथून निघतांना परत कधी याला मिळेल याचाच प्लॅन चालू होतो. मुन्सीयरी मध्ये पोचलो आणि निगडे चा फोन आला. की केदारबाबा दर्शन छान झाले आणि महत्वाचे म्हणजे पानपटीया कोल ट्रेक साठी मस्त माणूस भेटला आहे. म्हणालं त्याला मी विचारच करत होतो की पुण्यात जाऊन there needs to be something to look forward to. You gave me the answer. 

काही वेळेला खूप प्लॅन करून न होणाऱ्या गोष्टी अचानक न प्लॅन करता होऊन जातात. मी नाही फारसा प्लांनिंग करत. ठरले एकदा की मग जे जमेल ते नक्की प्लॅन करतो. या वेळी पण हेच झाले. न प्लॅन करता ट्रेक planned  ट्रेक पेक्षा भारी झाली. पिंटू आणि चेतन आले त्यामुळे अजून मजा आली. येऊन आठवडा झाला तरी आम्ही अजून तिघे तिकडेच आहोत. 

And then, I thought of the tears in my eyes when I reached the base camp. They were of all the small moments, the challenges, the twists and turns on the journey towards reaching the base camp and not just about the base camp. Till the next time ..... 


   









































 

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...