Monday, 7 November 2022

कोंकण दिवा - The Watch Tower


कोंकण दिवा - The Watch Tower 

कधी थांबतो असे झालेला पाऊस एकदाचा थांबला. या वर्षी एकंदरीतच विचित्र हवामान अनुभवायला मिळाले. बाबा भिडे पूल पाण्याखाली आणि वर इतके वेळा गेला, की पुणेकरांचे पाऊसाचे ते पण परिमाण काहीसे नष्ट झाले. आकाश कंदिलाला वर छत्री वगरे जोक्स इकडे तिकडे जाऊ येऊ लागले आणि अचानक पाऊस थांबला. दिवाळी आली आणि पुण्यनगरी परत काहीशी 'पूर्वीचे पुणे' या सदरात गेली. बाहेरची लोकं आपापल्या घरी दिवाळी साठी गेली. थंडीची चाहूल एकीकडे आणि डोगर दर्यांची हाक दुसरीकडे. मागील आठवड्यात शिंदोळा नावाचा न ऐकलेला किल्ला झाला. इतके हरवलो आणि पावसानी पण वाट नष्ट केली होती की वर पर्यन्त काही पोहचू नाही शकलो. त्यामुळे त्याचे लिखाण गड सर केल्यावरच. 

PC - Parag Mahajan


रायगड, सर्वांच्या आवडता गड. महाराज्यांचा आवडता गड. चहुबाजूनी अनेक डोंगर रांगांनी सौरक्षण केलेला गड. या गडाच्या उत्तरेला एक उंच छोटासा टूमदार असा किल्ला आहे. त्याला watch tower म्हणत. कावळे खिंड घाटमार्ग  आणि रायगड यावर नजर ठेवण्यासाठी याची स्थापना केली होती. पुण्यापासून ७८ km, पानशेत मार्गे रस्ता संपतो तिथे घोळ नावाचे गाव लागते. घोळ पासून गारजाईवाडी साधारण १-१.५ km आहे आणि आता तिथंपर्यंत गाडी जाते. पायथ्याशी गाडी लावता येते. सर्व प्रथम तिथे गावातून एक वाटाड्या घ्या आणि मगच जंगलात शिरा. नाही तर ट्रेक वगरे काही होणार नाही. वाट सापडणे अशक्य आहे. पावसाळ्या मुळे सर्व वाटा झाडांमध्ये लपल्या आहेत. काही वाहून गेल्या आहेत. 



मी, पिंटू, बिडी, उप्या आणि पर्या अशी ५ टाळकी सकाळी ५. १५ ला भेटलो आणि निघालो. वारजे पर्यन्त पोचलो ना पोचलो तर डावीकडे पोरांना गरम पोह्याचा वास आला. ५. ४५ am ला सकाळी पोहे, साबुदाणा वडा आणि चहा उरकून पानशेत च्या दिशेनी प्रवास चालू केला. खडकवासला आणि तिथे उगवलेली चौपाटी, आजूबाजूला बुट्ट्याची  घाण, आपण पूर्वी ज्याला कणीस म्हणत होतो, आणि इतर खंडीभर कचरा सर्व अजून झोपलेला होते. आकाशात केशरी रंग दिसायला लागला. पानशेत धरणाच्या backwater ला पोचलो तेव्हा डावीकडून सूर्योदय होतांना दिसत होता. थंडी मुळे धुके पाण्यावर तरंगत होते. त्यात तो रंग मिसळत होता. अशक्य वातावरण होते. आम्ही सर्व गाडी कडेला घेऊन याचा अनुभव घेतला आणि मोकळे झालो. थंडी होती ना. रस्ता MTDC पासून ८ KM पर्यन्त चांगला आहे. त्यानंतर २० KM कच्चा आहे. घोळ गावाच्या अलीकडे पाटी आहे. तिथे डावीकडे वळून १ ते १. ५ km वर गारजाईवाडी हे गाव लागते. रस्ता इथे संपतो. 

गावात जाऊन आम्ही थोडी चौकशी करता पांडुरंग मामा आमच्या बरोबर वाट दाखवायला येण्याचे काबुल झाले. साधारण साठी मधला तरतरीत आणि ताठ जवान. एक काठी, एक कोयता, चप्पल आणि अंगावर एक कापड घेऊन मोती आणि सोनू नावाच्या दोन कुत्रांना हाक मारून आमच्या बरोबर निघाला. त्याच्या पाठोपाठ आम्ही ५ जण निघालो. इथून किल्ला कुठे आहे याची काहीही जाणीव नव्हती. दिसत पण नव्हता. घनदाट जंगलात शिरल्यावर सूर्याची किरणे पण खाली पोचू शकत नव्हती. पटापट पाऊले उचलत आम्ही जात होतो. एका खिंडीत पोचलो आणि समोर कोंकणदिव्याचे दर्शन झाले. लांबवर किल्ला दिसायला लागला होता. मस्त वाटले. 

PC Upendra 



Pandurang mama


खिड ओलांडून डावीकडून परत आम्ही जंगलात शिरलो. मी पुढे चालत होतो. अचानक पांडुरंगाने आपल्या चपला हाती घेतल्या आणि तो चालू लागला. मला काही कळले नाही असे का केले असावे पण मी न बोलता त्याच्या मागे जात राहिलो. १०० मी नाही चाललो तर समोर दगडात कोरलेलं एक मंदिर दिसले. तिथे जाऊन नमस्कार केला आणि मग लक्षात आले की त्यांनी चप्पल का काढली. पुढे काही पाऊले तसेच गेलो आणि त्यांनी परत चप्पल घातली. हा जो आपला अजब देश आहे ना, मला वाटते तो फक्त एकाच कारणाने चालतो आहे. श्रद्धा. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण नितांत श्रद्धा असल्यानी आयुष्याला कसे एक वळण मिळते. त्याच त्या मार्गावर पिढ्यान पिढ्या जात असतात आणि त्या श्रद्धेचे अभिमानात परिवर्तन होते. अशा छोट्या गावात ती एक रीत बनून जाते. मोठ्या शहरात त्याच श्रद्धेचा बाजार होऊन जातो. 

गडाच्या पायथ्याशी एका पठारावर पोचलो तेव्हा खाली कोकणचे दर्शन घडले. कोंकणदिव्या च्या मागे रायगड होता. पण इथून महाड दिसत होते. लांबवर असे काही तरी पांडुरंग मामा म्हणाले खरे. कावळे घाट परिसर दिसला. दुसरी वाट सांदोशी गावातून आहे. कावळे घाट मार्गे ती वाट इथेच येऊन मिळते. जरा लांबची वाट आहे. क्षणभर विश्रांती घेऊन गड चढायला सुरु केले. परत जंगलात नाहीसे झालो. आता मात्र पुढील चढाई अंगावर येणारी आहे. २०० - ३०० मी असेल कदाचित पण जबरी आहे. म्हणजे समोर चालणाऱ्यांचे पाय दिसतात, डोळ्याच्या लेवल ला. इथे स्टॅमिना नक्कीच कळतो. पण न काही थकता आम्ही वर पोचलो. मला, उप्या ला आणि पराग ला चिवाभंजन ची आठवण झाली. उत्तरे पासून तिथे पोचे पर्यन्त ६ ते ७ तास असाच चढ होता. 







वर एका गुहेपाशी पोचलो आणि निवांत बसलो. सर्वांनी आपापली पोटली उघडली आणि त्यातून खाण्याचे काही ना काही तरी काढले. सँडविच, चिक्की, अंडी, शंकपाळे असे बरेच काही निघाले आणि संपले. डोंगरमाथा इथून १० min आहे. पण रस्ता थोडासा कठीण आहे. वर जातांना नक्कीच काळजी घेणे गरजेचे आहे. उतरतांना तर खूप सावकाश उतरावे. गुहे पाशी काही पाण्याचे टाके आहे आणि ते पाणी पिण्या योग्य आहे. गडमाथा छोटासा आहे. वर पोचलो आणि जय शिवाजी जय भवानी च्या आरोळ्या ठोकल्या. प्रचंड आनंद होतो. कसे काय हे लिहिणे अशक्य आहे कारण शब्दत तो अनुभव अत्यंत तोटका होईल. समोर रायगड, लांब वर तोरणा, लिंगाणा आणि कावळे घाटाचे सुंदर दृश्य दिसते. तिथे बसून गप्पा झाल्या. लांबवर दिसणाऱ्या किल्ल्याचे दुर्बिणीतून बघणे झाले. फोटो झाले. आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. सावधपणे उतरत उतरत आम्ही परत पठारावर पोचलो. तिथून गाडी गाठली, आवरा आवर करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. 

PC Upendra Walunjkar


PC Upendra Walunjkar




PC Hrishikesh Patil

PC Hrishikesh Patil

PC Hrishikesh Patil



सर्वांना मरणांतिक भूक लागली होती. पानशेत च्या इथे पुरुषोत्तम पूजा नावाचा अजब ढाबा शोधून काढला होता बिडी नी. तिथे गेलो आणि पोटभर भाकरी भाजी पिठलं खाऊन निघालो. गाडीत बसलो तेव्हा पराग शेजारी बसून कधीच घोरायला लागला होता. त्याच्या साथीला उपेंद्र आणि बिडी. मधून मधून सर्वांना हाक मारून उठवत होतो. पुण्यात पोचायला ४. ४५ झाले. खूप सुंदर असा ट्रेक झाला. वातावरणातील मजा म्हणा, नाही तर परत ट्रेकिंग चालू झाल्याचा आनंद. जो भी है उत्तम है. 


महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...