Wednesday, 29 December 2021

हरगड

हरगड 

"काय सांगता, ३८० किल्ले झालेत" मी अचंबित होऊन पहाटे साधारण ४. १५ च्या सुमारास गाडीत ओरडलो. ३ आठवडे ठरवत असलेला ट्रेक पार पडत होता. ट्रेक करी गॅंग मधली दोन आणि मी आणि बीडी असे चार लोक शेवटी जमली. मारुती आमचा सारथी बनला आणि २५ डिसेंबर ला पहाटे ४ ला आम्ही हरगड, सालोटा, मांगी तुंगी आणि न्हावी गड अशा मोहिमेस निघालो. 

हेमंत मांडके, या ट्रेक करी ग्रुप मधला एक चांगला मित्र झाला आहे. IT मध्ये काम करणारा आणि काम ट्रेकिंग करता येईल म्हणून करणारा अत्यंत उत्साही इसम आमच्या बरोबर होता. त्याचा भाऊ इतिहास या विषावर, महाराजांवर छान कार्यक्रम करतो. हेमंत सुद्धा छान गोष्टी सांगतो, त्यामुळे ३ दिवस आणि ८०० कि मी खूप पटकन गेले. 

जोशी काका, IIT M Tech, आणि फक्त ६० वर्षाचे तरुण यांच्या बरोबर आम्ही निघालो होतो. ३८० किल्ले यांनी सर केले आहेत. नुसते सर नाही तर प्रत्येक किल्ल्याचे मॅपिंग केले आहे. खालचे गाव, वर जायला लागणारा वेळ, रस्ता, उंची आणि वर पाहावयास काय काय आहे आणि कुठे, हे सर्व गेले २२ ते २४ वर्ष ते सातत्यानं करत आले आहेत. 

ओळख करून देण्याचे कारण इतकेच की यांचा उल्लेख पुढे बरेच वेळा येणार आहे. 

नाशिक च्या पुढे सुमारे ९० कि मी वर सटाणा नावाचे गाव आहे. तिथून ताहाराबाद आणि पुढे मुल्हेरवाडी. नाशिक हुन जातांना डावीकडे बरेच किल्ले दिसतात. सातमाळ रांग. अचला, अहिवंत, ढोलप, कांचन, कोळधेर, राजधेर, इंद्राई, चांदवड, असे बरेच किल्ले नजरेस पडत, सटाणा येते. हे सर्व किल्ले जोशी काकांचे सर झाले आहेत. एकच म्हणजे हरगड हा किल्ला राहिला आहे त्यामुळे इथे आलो. 

साधारण ११ च्या सुमारास ३७० कि मी प्रवास करून आम्ही मुल्हेर मोरा चे डावीकडे आणि हरगड चे उजवीकडे दर्शन घेत वर जायला सुरु केले. पहिला टप्पा हा मुल्हेरमाची. तिथे  बाप्पाचे सुंदर मंदिर आहे. पुढे अजून एका देवीचे जुने मंदिर दिसते. डावी कडे मुल्हेर ला जायचा रस्ता आणि उजवीकडे हरगड. 

७ तासांच्या प्रवासात खूप गप्पा झाल्या. राजकारण, हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. इथंभूत शिव्या आणि तिरस्कार करत आनंद घेत गप्पा रंगात होत्या. इतिहास, त्यात मध्ये मध्ये काही पुरावे दाखवत विषयाला वळण देत होता. जोशी काका त्यांनी तिथल्या केलेल्या ट्रेक चे किस्से सांगत होते. 

दोन तीन दरवाजे पार करून हरगड च्या पायथ्याशी पोचता. तिथून मळलेल्या वाटेनी हरगड च्या सुंदर पाहिऱ्या लागतात. वर प्रमुख दरवाजा दृष्टीस पडतो आणि त्यानंतर परत काही पाहिऱ्या चढून गडावर पोचता. गडमाथा मस्त प्रशस्त आहे. १२ च्या उन्हात आम्ही वर जात होतो. प्रमुख दरवाजा लागला आणि तिथेच काहीसा वेळ आम्ही शांत पणे विसावलो. जोशी काकांच्या नावाचा जयजयकार झाला. नाशिक आणि आजूबाजूचा त्यांचा शेवटचा किल्ला सर झाला. आम्हालाच त्याचा जास्त आनंद. कौतुक. मनात आले की बस यांच्या सारखे सातत्याने ट्रेकिंग करत राहायचे. थांबायचे नाही. माझे सुमारे ८० + किल्ले झाले असतील. कदाचित ९०. पण अजून ३०० बाकी आहेत आणि हे टार्गेट भारी आहे. गडमाथ्यावर समोर एक शंकराचे मंदिर आहे आणि त्याच्या डावीकडे खाली एक तलाव. मागच्या बाजूला काही वाड्याचे अवशेष पण आहेत. किल्ला बघायला तास दीड तास सहज जातो. किल्ल्यावर एक अशक्य मोठी तोफ आहे. प्रचंड मोठी आहे. ही इथे कशी आणली असेल, का इथंच घडवली असेल हे प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाहीत. गडावरुन मुल्हेर माची, मोरागड, न्हावीगड, मांगी तुंगी आणि साल्हेर चे छान दर्शन होते. 


काही काळ इकडे तिकडे करून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. 

वर जात असतांना एक दोन वेळा माझा पाय घसरला. मी बूट तपासून पाहिले तेव्हा झिजलेले दिसले. माझा आत्मविश्वास थंडावला होता. पुढील सर्व ट्रेक हे असेच करायचे या विचारांनी मी त्रासलो. हरगड छान किल्ला आहे. मुल्हेर आणि मोरा हेमंत आणि जोशी काकांचा कधीच झाला होता. त्यामुळे मला इथे परत येणे आहे. हरगड चे दर्शन परत घडणे आहे. लवकरच. 







































Sunday, 14 November 2021

जोर - आर्थर सीट - क्षेत्र - जोर


 

जोर - आर्थर सीट - क्षेत्र - जोर 

नंदा देवी हुन परत येऊन सुमारे एक महिना झाला. इथे, म्हणजे पुण्य नगरीत थंडी पडायला लागली होती. हिमालयातील ट्रेकिंग season बंद झाला असला तरी आता सहयाद्री मधला चालू झाला आहे. त्यामुळे गड किल्ल्यांवर गर्दी पण वाढू लागली आहे. सचिन जोशी नावाच्या एका मित्रांनी 'पायलट ट्रेककरी' नावाचा एक ग्रुप केला आहे. त्याच्यावर नुकताच मी पण ऍड झालो. त्यांच्या बरोबर माझा  हा तिसरा ट्रेक. Dr जोशी असे म्हणाले पाहिजे. अत्यंत छान ट्रेकर, इतिहास अभ्यासक आणि माहिती चा भांडार. धबधबा वाहतो तशा गोष्टी आणि पुराव्या सकट इतिहास वाहतो. त्याच्या बरोबर ट्रेक करायची मजा वेगळीच. त्याला सहज म्हणालो की तू तर 'हरी तात्या' आहेस. तर चटकन म्हणाला मी अभ्यासक आहे, हरी तात्यांसारखा मी मानसिक त्यात गुंतत नाही. 

तर सचिन नी हा एक हटके ट्रेक काढला.  जोर - आर्थर सीट - क्षेत्र - जोर. 


डॉ सचिन जोशी 
(p c - हेमंत मांडके)

ग्रुप वर चर्चा चालू झाली आणि १४ लोकं जमले. ३ गाड्या करून, व्यवस्तीत कोण कुणाला घेऊन कुठे भेटून पुढे जायचे, सर्व ठरले. जोर हे गाव साधारण वाई पासून ३४ km वर आहे. प्रथम धोम धरण उजवीकडे ठेऊन आणि नंतर बलकवाडी धरण डावीकडे कडे ठेऊन रस्ता संपेल तोवर जात राहिले की जोर गावी येऊन धडकाल. गेल्या पावसाळ्यात इथे प्रचंड पाऊस पडून रस्ते वाहून गेलेले दिसले. खालच्या कृष्णेला आलेल्या पुरात नदी लगद राहणाऱ्या गावकऱ्यांना जल समाधी मिळाली होती. वरून दरडी कोसळताना जणू भूकंप होतो आहे असा भास होतो असे बाळासाहेब जाधव जे आमचे वाटाड्या होते त्यांनी सांगितले. 

७. १५ ला आम्ही कात्रज हुन निघालो आणि जोर गावी पोचे पर्यन्त सुमारे १० वाजले असतील. तिथे जाधव भेटले आणि सचिन नी दुसऱ्या दिवशी चे नियोजन केले. आधी जाधव यायला तयार नव्हते कारण रस्ते सर्व वाहून गेले होते. त्यामुळे फक्त क्षेत्र ला पोचायचे, आर्थर ला चक्कर मारून परत त्याच वाटे उतरायचे असा प्लॅन होता. पण सर्व ट्रेक करी गॅंग नी लावून धरले आणि जाधव यायला तयार झाले. गावातल्या कुंभळजाई मंदिरात रात्र काढायची ठरली. मंदिराच्या समोरील बाजूस गाड्या लावून आणि तिथेच काही लोकांनी टेन्ट उभे करून जेवणाचे डबे उघडले. मंदिरात बसून सर्वांनी ताव मारला. बटाटा भाजी, डाळ, घेवडा, सँडविच, पराठे आणि दही भात छान चटणी सकट. 




(p c किरण  )

११.३० च्या सुमारास बाहेर   शेकोटी पेटली आणि सर्व जण गोल करून  बसले. गप्पा चालू झाल्या. वाद विवाद पेक्षा जास्त संवाद चालू झाला. रामायण महाभारत पासून ते काल पर्यन्त, गोष्टींचे घड्याळ सैरा वैरा पळत होते. सचिन खूप सुंदर बोलत होता. त्याच्या गोष्टी आणि माहिती ऐकणे म्हणजे या ट्रेक चे एक महत्वाचे आकर्षण होय. त्या काय ते ऐकायला तिथेच यावे लागेल. त्याच्या बरोबर ट्रेक करावे लागतील. 


सकाळ सकाळ माझे माहेर पांढरी च्या गजरानी जाग आली. आवरा आवारी करून चहा पिऊन आम्ही सर्व आमच्या पहिल्या टप्प्या च्या दिशेनी निघालो. 'बहिरीची घुमटी'. साधारण ५ km  वर चालून आणि अनेक झरे ओलांडून बहिरीची घुमटी च्या पायाशी पोचता. रस्ता वाटाड्या नसेल तर सापडणे अशक्य आहे. जातांना कधी जोशी काकांशी गप्पा तर कधी फाटक काकांशी चर्चा. सचिन आजूबाजूला असेल तर त्याच्या मेमरी स्टिक मधून काय डाउनलोड करता येते आहे ते ऐकायचे. भूषण ढेरे या ट्रेक ला आला होता. पटकन मिसळून पण गेला. आमच्या ग्रुप मध्ये त्यालाच आम्ही हरी तात्या म्हणायचो. कधी हेमंत बरोबर तर कधी साठे बरोबर, कधी राजेश शी अध्यात्मिक चर्चा करत तर कधी अजून कोणाशी काही तरी गप्पा मारत. एकंदरीत सर्व जण 'बहिरीची घुमटी ' ला पोचले. तिथून समोर आर्थर सीट उंच दिसते, पलीकडे चंद्रगड, मंगळगड, रायरेश्वर पठार आणि मोहनगड चे दर्शन होते. उंच उंच डोंगरांच्या अनेक पाठोपाठ रांगा बघतांना भारी वाटते. चेतन नी मारझोरिन चे तर मी घरून असे चटणी सँडविच  आणले होते. इथे बसून सर्वांनी सँडविच हाणले, चिवडा खालला आणि आर्थर सीट च्या दिशेनी निघालो. 







बहिरीची घुमटी







आत्ता पर्यन्त सर्व वाट ही घनदाट जंगलातील. जावळी चे जंगल. पावसानी वाट संपली होती आणि जाधव सुद्धा या वाटेनी खूप दिवसांनी येत होते. वाट काढत, हातावर काट्यांचे वार झेलत, पायांवर जळवा लागलेल्या झटकत आम्ही पुढे जात होतो. इथे पर्यन्त चढ बेताचा आहे. पण बहिरीची घुमटी पासून ते आर्थर सीट पर्यन्त मात्र छातीवर चा चढ आहे. वर जात असतांना समोरच्याचे बूट तुमच्या डोळ्या समोर असतात. वाट घसरडी आहे आणि अत्यंत कठीण. काही ठिकाणी दोन्ही बाजूला दऱ्या आहेत. view पॉईंट च्या अगदी खाली एक रॉक patch आहे. तिथे climbing  करून तुम्ही आर्थर सीट ला पोचता. डोक्यावर एक कट्टा नजरेस पडतो. 







शनिवार होता आणि आर्थर सीट म्हणजे 'पटेल पॉईंट' आहे भारतातील. त्यामुळे निर्मनुष्य वातावरणातून मंडई मध्ये अचानक पोचलो होतो. समोर ये जा करणाऱ्यांचे चेहेरे अत्यंत अचंबित होत होते जेव्हा अचानक दरीतून त्या दगडी भिंती मागून एक एक जण वर डोके काढीत होता. आम्हाला ते चेहेरा पाहून मजा येत होती हे खरे. १० km ची पायपीट करून आम्ही वर पोचलो होतो. प्रत्येकाचे स्मार्ट घड्याळ वेगवेगळी अंतरे दाखवत होते. त्यामुळे खरे किती आहे हे सांगणे तसे कठीण आहे. 

चहा पिऊन क्षेत्र महाबळेश्वर ला आम्ही सर्व निघालो. काही बोलेरो करून गेले तर काही चालत. कृष्णाई मंदिरात जाऊन दर्शन घेऊन तिथल्याच मागच्या वाटेनी आम्ही परत जोर गावात उतरायला सुरुवात केली. १.५ तास लागला असेल, साधारण ४. ३० च्या सुमारास परत आम्ही देवळात पोचलो. 







फारच सुंदर असा ट्रेक झाला. महाबळेहस्वर च्या एका बाजूला ही तोबा गर्दी. हजारो लोकांनी केलेला ट्रॅफिक जॅम. जिकडे तिकडे केलेली घाण. आणि दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल, निर्मनुष्य, शांत निसर्ग. पुण्यापासून इतके जवळ पण याचा अनुभव घ्यायला इतकी वर्ष लागली याची खंत....... पण आज तो  अनुभव आला याचा परमानंद. 








महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...