हरगड
"काय सांगता, ३८० किल्ले झालेत" मी अचंबित होऊन पहाटे साधारण ४. १५ च्या सुमारास गाडीत ओरडलो. ३ आठवडे ठरवत असलेला ट्रेक पार पडत होता. ट्रेक करी गॅंग मधली दोन आणि मी आणि बीडी असे चार लोक शेवटी जमली. मारुती आमचा सारथी बनला आणि २५ डिसेंबर ला पहाटे ४ ला आम्ही हरगड, सालोटा, मांगी तुंगी आणि न्हावी गड अशा मोहिमेस निघालो.
हेमंत मांडके, या ट्रेक करी ग्रुप मधला एक चांगला मित्र झाला आहे. IT मध्ये काम करणारा आणि काम ट्रेकिंग करता येईल म्हणून करणारा अत्यंत उत्साही इसम आमच्या बरोबर होता. त्याचा भाऊ इतिहास या विषावर, महाराजांवर छान कार्यक्रम करतो. हेमंत सुद्धा छान गोष्टी सांगतो, त्यामुळे ३ दिवस आणि ८०० कि मी खूप पटकन गेले.
जोशी काका, IIT M Tech, आणि फक्त ६० वर्षाचे तरुण यांच्या बरोबर आम्ही निघालो होतो. ३८० किल्ले यांनी सर केले आहेत. नुसते सर नाही तर प्रत्येक किल्ल्याचे मॅपिंग केले आहे. खालचे गाव, वर जायला लागणारा वेळ, रस्ता, उंची आणि वर पाहावयास काय काय आहे आणि कुठे, हे सर्व गेले २२ ते २४ वर्ष ते सातत्यानं करत आले आहेत.
ओळख करून देण्याचे कारण इतकेच की यांचा उल्लेख पुढे बरेच वेळा येणार आहे.
नाशिक च्या पुढे सुमारे ९० कि मी वर सटाणा नावाचे गाव आहे. तिथून ताहाराबाद आणि पुढे मुल्हेरवाडी. नाशिक हुन जातांना डावीकडे बरेच किल्ले दिसतात. सातमाळ रांग. अचला, अहिवंत, ढोलप, कांचन, कोळधेर, राजधेर, इंद्राई, चांदवड, असे बरेच किल्ले नजरेस पडत, सटाणा येते. हे सर्व किल्ले जोशी काकांचे सर झाले आहेत. एकच म्हणजे हरगड हा किल्ला राहिला आहे त्यामुळे इथे आलो.
साधारण ११ च्या सुमारास ३७० कि मी प्रवास करून आम्ही मुल्हेर मोरा चे डावीकडे आणि हरगड चे उजवीकडे दर्शन घेत वर जायला सुरु केले. पहिला टप्पा हा मुल्हेरमाची. तिथे बाप्पाचे सुंदर मंदिर आहे. पुढे अजून एका देवीचे जुने मंदिर दिसते. डावी कडे मुल्हेर ला जायचा रस्ता आणि उजवीकडे हरगड.
७ तासांच्या प्रवासात खूप गप्पा झाल्या. राजकारण, हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. इथंभूत शिव्या आणि तिरस्कार करत आनंद घेत गप्पा रंगात होत्या. इतिहास, त्यात मध्ये मध्ये काही पुरावे दाखवत विषयाला वळण देत होता. जोशी काका त्यांनी तिथल्या केलेल्या ट्रेक चे किस्से सांगत होते.
दोन तीन दरवाजे पार करून हरगड च्या पायथ्याशी पोचता. तिथून मळलेल्या वाटेनी हरगड च्या सुंदर पाहिऱ्या लागतात. वर प्रमुख दरवाजा दृष्टीस पडतो आणि त्यानंतर परत काही पाहिऱ्या चढून गडावर पोचता. गडमाथा मस्त प्रशस्त आहे. १२ च्या उन्हात आम्ही वर जात होतो. प्रमुख दरवाजा लागला आणि तिथेच काहीसा वेळ आम्ही शांत पणे विसावलो. जोशी काकांच्या नावाचा जयजयकार झाला. नाशिक आणि आजूबाजूचा त्यांचा शेवटचा किल्ला सर झाला. आम्हालाच त्याचा जास्त आनंद. कौतुक. मनात आले की बस यांच्या सारखे सातत्याने ट्रेकिंग करत राहायचे. थांबायचे नाही. माझे सुमारे ८० + किल्ले झाले असतील. कदाचित ९०. पण अजून ३०० बाकी आहेत आणि हे टार्गेट भारी आहे. गडमाथ्यावर समोर एक शंकराचे मंदिर आहे आणि त्याच्या डावीकडे खाली एक तलाव. मागच्या बाजूला काही वाड्याचे अवशेष पण आहेत. किल्ला बघायला तास दीड तास सहज जातो. किल्ल्यावर एक अशक्य मोठी तोफ आहे. प्रचंड मोठी आहे. ही इथे कशी आणली असेल, का इथंच घडवली असेल हे प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाहीत. गडावरुन मुल्हेर माची, मोरागड, न्हावीगड, मांगी तुंगी आणि साल्हेर चे छान दर्शन होते.
काही काळ इकडे तिकडे करून आम्ही परतीच्या वाटेला लागलो.
वर जात असतांना एक दोन वेळा माझा पाय घसरला. मी बूट तपासून पाहिले तेव्हा झिजलेले दिसले. माझा आत्मविश्वास थंडावला होता. पुढील सर्व ट्रेक हे असेच करायचे या विचारांनी मी त्रासलो. हरगड छान किल्ला आहे. मुल्हेर आणि मोरा हेमंत आणि जोशी काकांचा कधीच झाला होता. त्यामुळे मला इथे परत येणे आहे. हरगड चे दर्शन परत घडणे आहे. लवकरच.
No comments:
Post a Comment