मल्हारगड
शेवटचा किल्ला झाला तो मधू मकरंदगड. आणि त्या नंतर जणू जगबुडी झाली. त्या Virus नी जगाला झोपवले. एकंदरीत त्याचा खूप उदो उदो झाला आहे त्यामुळे इथे त्याची घाण नको. त्या काळात मात्र खूप काही घडले. खूप लोकांनी मदतीचा हात पुढे केला. सरकार ला पण हे नवीनच होते पण जे केले आणि शक्य झाले त्याचे कौतुक करावे असे वाटते. नाही झाले त्याचा त्रास करून घेणे सोपे आहे. आम्ही मित्र मंडळींनी एक लाख मास्क पुण्यात फुकट वाटले. खूप लोकांची मदत त्या कामा करता लाभली. पोलीस काय हे पण कळले कारण त्याच्या बरोबर काम करायची संधी मिळाली. एकंदरीत हा काळ शिक्षणाचा होता. निसर्गानी थोडेसे दाखवले की जमले तर मला जपा. या काळात खूप जवळची माणसे गमावली. त्यात माझे बाबा पण होते. अर्थात त्याचे जाण्याचे कारण हृदय विकार होता. पण कोण आपले कोण परके हे मात्र ते जातांना सांगून गेले. शिकवून गेले.
तर सुमारे १० महिने आमचे ट्रेक मात्र रखडले. या ना त्या कारणांनी पुढे जात गेले. सवय झाली होती गड किल्ल्याची. आम्ही सर्व शनिवार ची वाट पाहत आठवडा भर खूप काम करायचो. म्हणतात ना ' something to look forward to' असेच असायचे. जातानाच्या गप्पा, येतानाचे वाद आणि सुंदर इतिहास या मध्ये रमून जाणे आवडायचे.
सोमवारी मी ग्रुप वर टाकले की शनिवारी ट्रेक ला जायचे आहे. कुठे काय ते ऐत्यावेळी ठरवले जाईल. चड्डी आणि पिंटू चा ok असा reply आला. म्हणाले चला पानवती मेली. पुण्याचे जवळचे साधारण सर्व किल्ले पाहून झाले आहेत. तरी काही शोधकाम करतांना हा एक गड सापडला जो घराच्या मागे होता आणि इतकी वर्ष तिथे गेलो नव्हतो. मल्हारगड - सोनोरीचा किल्ला. हा किल्ला सर्वात शेवटी बांधलेला म्हणून प्रसिद्ध आहे. साधारण १७५७ - १७६० या काळात झालेले याचे बांधकाम आहे. त्यामुळे किल्ल्यावर बघायला बरेच काही आहे. तटबंदी शाबूत आहे. किल्ल्याचा विस्तार पण बऱ्यापैकी मोठा आहे. सासवड जवळ असलेला हा किल्ला इतका सुंदर आणि बघण्यासारखा आहे, की सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार जावे. गाडी वर पर्यन्त जाऊ शकते. पण किल्ला चढायला पण छान मजा येते. १५ ते २० मिनिटात डोंगरमाथा.
ट्रेक ची सुरुवात करतांना सोपं काही तरी शोधावे म्हणून इथे गेलो. येतांना नारायपूर ला दत्ताचे दर्शन तर घेतलेच पण त्याच्या शेजारी एक सुंदर पांडवकालीन मंदिर आहे नारायणेश्वरचे ते पण पहिले. इतके सुंदर मंदिर आहे पण खूप कमी लोकांना माहिती आहे. दत्त गुरूंचे दर्शन घेता घेता लोक आमच्या शम्भो ला मात्र विसरतात. तुम्ही विसरू नका. स्वयंभू अशी सुंदर पिंड तिथे आहे.
परतीच्या प्रवासाला पुरंदर ला जायचे नियोजन होते. वर गेलो तेव्हा कळले की मार्च पर्यन्त कोणालाही प्रवेश नाही. त्यामुळे छान छोटीशी सहल झाली आणि आम्ही परतलो. ट्रेकिंग परत चालू झाले याचा आनंद. नाशिक कडचे किल्ले चालू करायचे आहेत असे बोलणे तरी झाले आहे. बघू आता काय होते ते.
घरी लवकर पोचून आम्ही घरच्यांना धक्का दिला हे सांगायला नकोय.
इतिहास : | |
या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. मल्हारगडाचे बांधकाम १७५७ ते १७६० या काळात झाले. सन १७७१ - ७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या किल्ल्याचा उपयोग दिवेघाटावर आणि आजुबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. इंग्रजां विरुध्दच्या बंडात उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता. (ref - http://trekshitiz.com/) |
No comments:
Post a Comment