Friday, 19 February 2021

इंद्राई


इंद्राई 

सातमाळ डोंगर रांगेत हा अजून एक बलाढ्य किल्ला. इंद्राई. चांदवड करून आम्ही मारुती मंदिरात आसऱ्याला  आलो. रात्री मंदिरात छान झोप लागली. लोकांची इंजिन्स  चालू होती, घोरण्याची. मंदिरात मारुतीच्या पायाशी एक दिवा मिणमिणत होता. त्या प्रकाशात रात्र निघाली. चेतन ला घोरण्याचा आवाज काही सहन झाला नाही आणि तो परत गाडीत जाऊन झोपला. सकाळी मी उठलो तेव्हा ५.३० वाजले होते आणि शेजारची जागा रिकामी होती. इतर मंडळी पण जागी होऊ लागली आणि काही वेळातच तिथे आवराआवर चालू झाली. वाघ आणि जोशी यांनी पाणी तापवायला घेतले आणि सर्वांना आपापली भांडी आणायला सांगितली. 



सकाळ सकाळ फक्कड चहा मिळाला. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर आम्ही आलो तेव्हा जसा स्वछ होता  तसेच जातांना करून तिथून गडाकडे निघायचे ठरवले. पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. वाघ्या एकट्यानेच हा किल्ला केला असल्याने, पण वडबारे मार्गानी न केल्याने ही वाट सर्वानाच नवीन होती. गावाच्या डाव्याबाजजूनी टाकी च्या शेजारून एक छान मोठा रस्ता आहे, गाडी जाऊ शकेल इतका. खूप खडबडीत आहे अर्थात. हा रस्ता पकडून सरळ जावे. 



किल्ला दिसायला जरा वेळ लागतो. डावी कडे बांध दिसतात आणि वर साडेतीन ऱ्होडगं  नावाचा एक डोंगर आहे. त्या पठारावर धनगराचे एकमेव घर आहे. तिथल्या आजी बरोबर वार्तालाभ करून आम्ही पुढे निघालो. समोर लांब वर पठारावर एक मंदिर दिसते. गडावर जाण्याचा रस्ता उजवीकडून आहे. तसे अंदाजानी वर चढायला सुरु केलं. पण नंतर वाट सापडली. एका डोंगरावरून रस्ता गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. माची म्हणा हवं तर. तिथे एक सुंदर मारुतीची मूर्ती आहे. सोंडेवरून वर चढता कातळात कोरलेल्या पाहिर्यांपाशी जाऊन पोचतो. खूपच मोठा गड आहे, यात काही वाद नाही. 















पाहिर्यांच्या डावीकडे एक गुहा आणि पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. तिथे जाऊन थोडे फ्रेश होऊन आम्ही वर जाण्याची वाट पकडली. पाहिऱ्या चढू लागलो तेव्हा त्या कलेचे, इंजिनीरिंग चे कौतुक वाटते. त्या वेळी त्या लोकांनी हे अदभूत प्रकरण कसे काय कोरून काढले असेल याची कल्पना पण करणे अशक्य आहे. १०० - १५० फूट उंच काळ्याभोर दगडातून कोरीव अशा पाहिऱ्या पाहायला मिळतात. 






त्या वर चढून गेल्यावर गडमाथा. गडावर पाहण्या सारखे खूप काही आहे. पाण्याच्या टाक्या मोठ मोठ्या गुहा, महादेव मंदिर आणि इतिहास जमा वास्तूचे बरेच विखुरलेले अवशेष. 

मी आणि चेतन, सर्वांचा निरोप घेऊन तिथून निघालो. खाली उतरतांना थोडेसे चुकलो. डोक्यावर ऊन येऊन पोचले होते. रस्ता चुकल्याने पायपीट जरा जास्तच झाली. गावात येऊन त्याच टाकी वर हाथ पाय धून आम्ही पुण्याकडे यायला निघालो. दोघेही तसे दमलो होतो. २२५ - २४० km  चा प्रवास करून आणि मंचर  राजगुरूनगर चाकण भोसरी सारख्या आत्यंतिक भयंकर ट्रॅफिक मधून जाण्याच्या कल्पनेनी अंगावर काटा आला. संगमनेर च्या अलीकडे वेगात असतांना एका वळणावर Harrier चे पुढचे tire burst  झाले. फुटले. सुदैवानी गाडी वर ताबा ठेऊन आम्ही कडेला आलो आणि पहिले तर Tire  च्या चिथड्या उडाल्या होत्या. दुसरे Tire काढून fit  करून तिथून आम्ही निघालो. हवा भरायला थांबलो तेव्हा तिथला मराठी अण्णा म्हणाला की तुम्ही जिवंत कसे ? अहो या वळणावर खूप सारे अपघात झाले आहेत आणि माणूस मारतोय की. मी त्याला म्हणालो आम्ही आहोत जिवंत. भूत नाही. हवा भर. तिथल्याच बारक्याला आवाज दिला आणि हवा भरून तिथून निघालो. मला वाटतं राजगुरूनगर हुन नाशिक ला जायला जितका वेळ लागतो तितकाच वेळ राजगुरूनगर हुन पुण्याला यायला लागतो. तुम्ही पाहिले आहे का नाही मला माहित नाही पण या रस्त्यावर तिथे Intersections आहेत त्याच्या अलीकडे नाही तर पलीकडे Flyover केले आहेत ज्याचा घसरगुंडी सोडून काहीच उपयोग नाहीये. Flyover उतरला की आला चौक. १. ३० pm  ला निघालेलो ५ च्या सुमारास मंचर ओलांडले. तिथून घरी पोचे पर्यन्त ८. ३०  वाजले होते. 

इंद्राई ला परत जाणे गरजेचे आहे. तिथे एक रात्र राहूनच तिथली मजा लुटली पाहिजे. नाशिक आजूबाजूचे किल्ले आणि त्यांच्या बद्दल मला असलेला कुतूहल दिवसेन दिवस वाढत चालेले आहे. या प्रवासाला आत्ताशी सुरुवात झाली आहे. इथे असलेले सर्व किल्ले एक एक करत पूर्ण करायचे स्वप्न आहे.  








Wednesday, 17 February 2021

चांदवड / ऐश्वरेश्वर



चांदवड / ऐश्वरेश्वर 

सातमाळ डोंगर रांगेत असलेला हा एक खूप सुंदर किल्ला. मागच्या आठवड्यात काही कारणांनी सचिन जोशी बरोबर जाणे जमले नाही. या आठवड्यात साधारण गुरुवार शुक्रवार दरम्यान त्याचा निरोप आला की चांदवड, जो अत्यंत्य कठीण किल्ला आहे आणि इंद्राई जो अत्यंत मोठा किल्ला आहे, बलाढ्य आहे, अशा किल्ल्यावर जाण्याचे ठरले आहे. अर्थात शनिवार रविवार असा ट्रेक असेल. मी आणि चेतन तयार झालो. या वेळेला खूप वर्षांनी एका ट्रेकिंग ग्रुप बरोबर जाण्याचा योग आला. सर्व नवीन माणसे, वेगवेगळ्या क्षेत्रातली, पण सर्वांना जोडणारा धागा म्हणजे ट्रेकिंग. भटकंती आणि नवनवीन ठिकाणे शोधून जाऊन सर करून परतणे. या मध्ये डॉक्टर, इंजिनीर, विद्यार्थी, इतिहास संशोधक आणि गिरियारोहणात छत्रपती पुरस्कार विजेते असे सर्व जण होते. १२ पासून ६३ वयापर्यन्त आम्ही साधारण १७ जण होतो. 


मी आणि चेतन गाडी घेऊन निघालो आणि नारायणगाव ला परिवार मिसळ पाशी इतर गॅंग ला भेटलो. तिथे ओळखी झाल्या. राजेश नावाच्या एका गृहस्थांनी मला विचारले " तू ट्रेकिंग सोडून अजून काय करतोस ?" या वाक्यांनी त्यांनी मला जिंकलं. या १७ मधील काही लोक वगळता सर्वांचे २०० हुन अधीक किल्ले पाहून झाले आहेत. नवनवीन डोंगर शोधत हिंडत असतात. त्यामध्ये ढवळे काका म्हणाले, अरे लांब वर डोंगरावर भगवा फडकतांना दिसला की मी निघतो आणि तिथे पोचतो. मंदिर पाहायला मिळते पण महत्वाचे म्हणजे एक नवीन ठिकाणाचा परिचय होतो. तो किल्लाच असला पाहिजे असे काहीच नाही. सर्व weekends ते बाहेर असतात. अशा अनेक मजा आणि आनंदी प्रसंग लुटत आम्ही सिन्नर ला पोचलो. सर्वांना जेवण करायचे होते आणि ते पण मिसळ. सिन्नर मध्ये पोहोचल्यावर तिथे एका मारुती मंदिर समोर गाडी उभी करून  एका धष्टपुष्ट दादा ला विचारले, "दादा मिसळ कुठे मिळेल चांगली" तो म्हणाला "मोहरं जाऊन right मारा. तिथे भारी मिसळ मिळते" तिथे पोचल्यावर कळले की हे मिसळीचे हॉटेल आहे आणि नुसती टपरी नाही. साधारण १५० लोकांची नीट बसायची सोय असलेलं ऐश्वर्या मिसळ नावाचे एक छान ठिकाण मिळाले. १७ मिसळ, अनेक दही आणि ताक, पापड चहा अशी पोटपूजा करून आम्ही तिथून निघालो.





मिसळ खात असतांना सचिन म्हणाला की इथे जवळच ऐश्वरेश्वर मंदिर आहे जे १००० हुन जास्त वर्ष जुने आहे. तिथे जाऊ आणि पाहू. बाहेर आलो तर कळले की ते मंदिर समोरच आहे. आम्ही सर्व जण त्या मंदिरात पोचलो. दर्शन घेतले. खूप खूप सुंदर मंदिर आहे. इतका इतिहास आणि इतके सुंदर मंदिर पण किती लोकांना माहित असेल याची कल्पना नाही. सचिन नी त्या मंदिराची उभारणी, त्याचे वैशिष्ठ्य, इतिहास आणि काही गोष्टी सांगून आम्हा सर्वांना भूतकाळात नेले. तिथे असलेलं यादवांचे ऐश्वर्य, म्हणूनच बांधलेले ते मंदिर. 









सिन्नर हुन लासलगाव मार्गे आम्ही चांदवड ला पोचलो. बऱ्यापैकी ऊन होते. चंद्रेश्वर मंदिरापर्यन्त रस्ता आहे. तिथे गाडी लावून देवळाच्या मागच्या बाजूनी किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. जाण्याच्या वाटेवर डावीकडे एक तलाव आणि तिथे काही थडगी आहेत. 






तारेचे कंपाऊंड शेजारून वाट वर जाते तसे जावे. किल्ल्याच्या उजव्या बाजूनी वर जाणाऱ्या पाहिऱ्या आहेत. चढण चढून जाऊन वर उजवीकडे जाणारी वाट धरावी. इंग्रजांनी सर्व पाहिऱ्या फोडून टाकल्यामुळे शेवटचा टप्पा करत असतांना रोप ची गरज लागतेच. आमच्या बरोबर एक ६३ वयाचे तरुण काका आले होते. छत्रपती पुरस्कार विजेते, महाराष्ट्र मधील पहिल्या  एव्हरेस्ट मोहीमे मध्ये ते होते. त्यानंतर साधारण १८ वेगवेगळ्या मोहीमा  त्यांनी केल्या आहेत. या माणसाचे कौतुक करावे तेव्हडे थोडे. सरसर करत काका त्या रॉक patch  वर चढून गेले. बघताच ते माथ्यावर होते. मी थक्क झालो होतो. वर जाऊन सर्व equipment काढून रोप लावून त्यांनी खाली सोडला. एक एक मावळा त्या दोरीच्या आधाराने पटापट वर चढू लागला. 





आम्ही सर्व गड माथ्यावर पोचलो. सुंदर अनुभव आणि अप्रतिम गॅंग भेटली होती. वर जातांना पडलेला दरवाजा आणि काही अवशेष दिसतात. पाण्याच्या टाक्या आहेत आणि गडाचा विस्तार मोठा आहे. नंदी मुख एका ठिकाणी ठेवलेलं आढळेल. तिथेच पिण्याच्या पाण्याचे टाकं आहे. ४ च्या सुमारास आम्ही परतीच्या वाटेवर लागलो. Rappelling करत उतरायचे होते. मला वाटतं  २० वर्ष तरी नक्की झाली असतील हे धाडस करून. पण आधी खूप वेळा Rappelling केले आहे. तेव्हा तर आपल्या गडावर पण रॉक climbing आणि इतर गोष्टी करायला जायचो. Basic Mountaineering ची शिबिरे तिथे भरायची. जमलं, पटकन पूर्वीचे दिवस आठवले आणि सर्व आपोआप अंगात शिरलं. खाली उतरून निघे निघे पर्यन्त अंधार पडायला सुरुवात झाली होती. 










देवळापाशी येऊन हाथ पाय धून गाडी जवळ गेलो. घाट खाली उतरून उजवीकडे असलेल्या ढाब्या वर चहा पियालो. सर्व जण निवांत गप्पा मारत बसले होते. रात्रीच्या जेवणाची काय सोय करायची आणि कुठे जायचे हे ठरत होते. पुढे जाऊन एक चांगला ढाबा आहे तिथे जेवण घेण्याचे ठरले. मी सचिन आणि चेतन मात्र रात्री राहायची कुठे सोय होईल का हे बघायला निघालो. पलीकडे असलेलं सुंदर गणपती मंदिर नजरेस पडले. इच्छापूर्ती गणपती मंदिर. तिथे राहायची सोय, बाहेर मोठे पटांगण आणि श्रीमंत मंदिराचा वास सर्व कडे दरवळत होता. आत जाऊन विचारले की राहायची सोय काही होऊ शकेल का. खोल्या नकोत, पडवीत आम्ही झोपू आणि सकाळी लवकर उठून निघून जाऊ. इच्छापूर्ती मंदिरात बाप्पा नी आमची इतकी थोटीशी इच्छा पण पूर्ण नाही केली. ट्रस्ट आणि ट्रस्टी आणि त्याचे नियम आणि कायदे, बाहेरील माणसांना कसे नाही राहू देत वगरे वगरे सांगून तिथल्या माणसांनी आम्हाला चांगल्या भाषेत निघा असे सांगतिले. या बाप्पा च्या मंदिराच्या नावातच स्वार्थ भरला आहे हे कळले. पुढच्या वेळेला जाऊ तेव्हा आत पाऊल ठेवायचे पण VIP Rs ५०० असे तिकीट काढून जावे लागेल. असो. परत त्याच धाब्यावर आलो आणि एक गावकरी भेटला. म्हणाला की आमच्या गावात मस्त मारुती मंदिर आहे. तिथे चला. तिथे तुमची सोय करतो. त्या मंदिराचा अजून बाजार झाला नव्हता. वडबारे नावाच्या गावी आम्ही पोचलो. दुसऱ्या दिवशी याच गावातून इंद्राई चा किल्ला सर करायचा होता. गावात पोहोचलो आणि मारुती मंदिर जवळ गाडी लावली. मंदिरात गावकरी काहीतरी गोल करून बसून खेळत होते. आमच्या बरोबर आलेला जाधव आत जाऊन त्या इतर गावकऱ्यांना म्हणाला  की साहेब आले आहेत. हे वाक्य बोलून तो तिथून निसटला. मी सचिन आणि चेतन मंदिराबाहेर उभे. आतील गावकरी, जेहर्यावर अत्यंत गंभीर भाव, काहीसा घाबरलेला भाव घेऊन चटकन उठून दरवाज्या पाशी आले आणि उभे राहिले. २ मिनिटे गेली कोणी काही बोलले नाही. त्यानंतर सचिन नी  विचारले. "दादा उद्या इंद्राई ला जायचे आहे तर आज रात्र इथे काढू का ?" असा प्रश्न येताच सर्व लोक खो खो करून हसायला लागले. म्हणाले की आम्हाला वाटले की साहेब आता उचलून नेणार. ते सर्व लोक आत पत्ते खेळात होते. 

जरून राहा की, काय हवे नको सांगा. पाणी हवे तरी सांगा आणि चहा हवा तरी सांगा. निवांत झोपा. आमचा जीव भांड्यात पडला. आम्ही गाडी काढून परत त्या धाब्यावर गेलो आणि खूप जेवलो. ताक छान होते. सर्वांना घेऊन मारुती मंदिरात आलो आणि आपापली जागा शोधून तिथे स्थिरावलो. सकाळी ५ ला निघालेलो २६० km drive करून ट्रेक करून रात्री १० च्या सुमारास पाठ टेकली आणि डोळे मिटले. क्षणात झोप. एक सुंदर दिवसाचा शेवट झाला. उद्याची काळजी न करता आणि कालचा विचार न मनात येता जेव्हा अशी गाढ झोप लागते तेव्हा ...... 







इतिहास :
पौराणिक कथेनुसार अगस्ती मुनींचा आश्रम चांदवड गावाजवळील डोंगरावर होता एकदा त्यांना भूक लागली असता त्यांनी चार रोडगे भाजले आणि त्यावर लावण्यासाठी तूप मागण्यासाठी ते गावात गेले. पण गावात त्यांना कोणीही तूप दिले नाही. त्यामुळे त्यांनी या नगरीला चांडाळ नगरी असे नाव ठेवले. त्याचाच पुढे अपभ्रंश होऊन चांदवड हे नाव पडले. अगस्ती मुनींनी आपल्या जवळील चार रोडग्या पैकी अर्धा रोडगा गाईला दिला आणि उर्वरित रोडगे तेथेच सोडून दिले. चांदवड किल्ल्यासमोर असलेल्या डोंगराला त्यामुळे साडे तीन रोडग्यांच्या डोंगर असे नाव पडले आहे .

चांदवड किल्ला कोणी बांधला व केव्हा बांधला हे ज्ञात नाही पण नांदगाव येथे सापडलेल्या चालुक्य नरेश चांद्रदित्य उर्फ नागवर्धन (इसवीसन ६५०) यांच्या ताम्रपटात चंद्रादित्यपूर म्हणजेच चांदवडचा उल्लेख आढळतो म्हणजे त्याकाळी हा किल्ला अस्तित्वात होता .
इसवीसनाच्या अकराव्या शतकात यादवांच्या ताम्रपटात चांद्रादित्यपूरचा उल्लेख आढळतो. निजामशहाच्या काळात मुघल बादशहा शहाजहान याने शाहिस्तेखानाला महाराष्ट्रातपाठवले होते. शाहिस्तेखानाने आपला अधिकारी अलीवर्दीखानाकडे चांदवड परिसरातील किल्ले घेण्याची जबाबदारी सोपवली होती. इसवीसन १६३६ मध्ये अलीवर्दीखानाने चांदवड किल्ला आणि गाव जिंकून घेतले.

दुसऱ्या सुरत लूटी नंतर छत्रपती शिवाजी महाराज बागलाणातून राजगडावर जात होते. त्यासुमारास औरंगजेबाला सूरत लुटीची बातमी कळली आणि त्याने खानदेशचा सुभेदार दाऊदखान कुरेशी याला आदेश दिले की शिवाजी महाराजांकडून खजिना हस्तगत करावा. त्यानुसार दाऊदखान पाच हजार सैन्यानिशी चांदवड किल्ल्यावर पोहोचला. त्याने याठिकाणी कांचनाच्या लढाईची तयारी केली.

छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात इसवीसन १६८२ मध्ये मराठ्यांची एक तुकडी चांदवड वर चालून गेली होती.

पहिल्या बाजीरावाच्या काळात चांदवड किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. पुढे नानासाहेब पेशव्यांनी चांदवडचा किल्ला मल्हाराव होळकर यांच्या ताब्यात दिला. पेशव्यांच्या काळात चांदवड किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असे. तुकोजी होळकर यांच्या कारकिर्दीत थोरल्या माधवराव पेशवे यांच्या परवानगीने किल्ल्यावर चांदोरी रुपयांची टांकसाळ चालू केली. इसवीसन अठराशे पर्यंत ही टांकसाळ किल्ल्यात होती व या टाकसाळीत चांदीची नाणी पाडली जात असत. इसवीसन अठराशे मध्ये किल्लेदार आणि टाकसाळ अधिकारी यांच्यातील तंट्यामुळे ही टाकसाळ चांदवड गावात हलवली गेली. याच वर्षी यशवंतराव होळकरांच्या सैन्यातील अहमद खान व आमिर खानाने मालेगाव व चांदवड लुटले. इसवीसन १८०४ मध्ये कर्नल वॉलेस याने चांदवडचा किल्ला जिंकून घेतला, परंतु तो किल्ला लगेचच होळकरांच्या ताब्यात देण्यात आला. इसवीसन १८१८ मध्ये थॉमस हिस्लॉप याने हा किल्ला जिंकून घेतला. इसवीसन १८२९ मध्ये चांदवड टांकसाळीतील चांदीच्या रुपयाची नाणी पाडण्याचे काम बंद करण्यात आले. १८३० मध्ये तांब्याची नाणी पाडण्याचे काम थांबवण्यात आले आणि त्यानंतर टांकसाळ बंद करण्यात आली. (Ref http://trekshitiz.com/marathi/Chandwad-Trek-C-Alpha.html)



महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...