Monday, 7 November 2022

कोंकण दिवा - The Watch Tower


कोंकण दिवा - The Watch Tower 

कधी थांबतो असे झालेला पाऊस एकदाचा थांबला. या वर्षी एकंदरीतच विचित्र हवामान अनुभवायला मिळाले. बाबा भिडे पूल पाण्याखाली आणि वर इतके वेळा गेला, की पुणेकरांचे पाऊसाचे ते पण परिमाण काहीसे नष्ट झाले. आकाश कंदिलाला वर छत्री वगरे जोक्स इकडे तिकडे जाऊ येऊ लागले आणि अचानक पाऊस थांबला. दिवाळी आली आणि पुण्यनगरी परत काहीशी 'पूर्वीचे पुणे' या सदरात गेली. बाहेरची लोकं आपापल्या घरी दिवाळी साठी गेली. थंडीची चाहूल एकीकडे आणि डोगर दर्यांची हाक दुसरीकडे. मागील आठवड्यात शिंदोळा नावाचा न ऐकलेला किल्ला झाला. इतके हरवलो आणि पावसानी पण वाट नष्ट केली होती की वर पर्यन्त काही पोहचू नाही शकलो. त्यामुळे त्याचे लिखाण गड सर केल्यावरच. 

PC - Parag Mahajan


रायगड, सर्वांच्या आवडता गड. महाराज्यांचा आवडता गड. चहुबाजूनी अनेक डोंगर रांगांनी सौरक्षण केलेला गड. या गडाच्या उत्तरेला एक उंच छोटासा टूमदार असा किल्ला आहे. त्याला watch tower म्हणत. कावळे खिंड घाटमार्ग  आणि रायगड यावर नजर ठेवण्यासाठी याची स्थापना केली होती. पुण्यापासून ७८ km, पानशेत मार्गे रस्ता संपतो तिथे घोळ नावाचे गाव लागते. घोळ पासून गारजाईवाडी साधारण १-१.५ km आहे आणि आता तिथंपर्यंत गाडी जाते. पायथ्याशी गाडी लावता येते. सर्व प्रथम तिथे गावातून एक वाटाड्या घ्या आणि मगच जंगलात शिरा. नाही तर ट्रेक वगरे काही होणार नाही. वाट सापडणे अशक्य आहे. पावसाळ्या मुळे सर्व वाटा झाडांमध्ये लपल्या आहेत. काही वाहून गेल्या आहेत. 



मी, पिंटू, बिडी, उप्या आणि पर्या अशी ५ टाळकी सकाळी ५. १५ ला भेटलो आणि निघालो. वारजे पर्यन्त पोचलो ना पोचलो तर डावीकडे पोरांना गरम पोह्याचा वास आला. ५. ४५ am ला सकाळी पोहे, साबुदाणा वडा आणि चहा उरकून पानशेत च्या दिशेनी प्रवास चालू केला. खडकवासला आणि तिथे उगवलेली चौपाटी, आजूबाजूला बुट्ट्याची  घाण, आपण पूर्वी ज्याला कणीस म्हणत होतो, आणि इतर खंडीभर कचरा सर्व अजून झोपलेला होते. आकाशात केशरी रंग दिसायला लागला. पानशेत धरणाच्या backwater ला पोचलो तेव्हा डावीकडून सूर्योदय होतांना दिसत होता. थंडी मुळे धुके पाण्यावर तरंगत होते. त्यात तो रंग मिसळत होता. अशक्य वातावरण होते. आम्ही सर्व गाडी कडेला घेऊन याचा अनुभव घेतला आणि मोकळे झालो. थंडी होती ना. रस्ता MTDC पासून ८ KM पर्यन्त चांगला आहे. त्यानंतर २० KM कच्चा आहे. घोळ गावाच्या अलीकडे पाटी आहे. तिथे डावीकडे वळून १ ते १. ५ km वर गारजाईवाडी हे गाव लागते. रस्ता इथे संपतो. 

गावात जाऊन आम्ही थोडी चौकशी करता पांडुरंग मामा आमच्या बरोबर वाट दाखवायला येण्याचे काबुल झाले. साधारण साठी मधला तरतरीत आणि ताठ जवान. एक काठी, एक कोयता, चप्पल आणि अंगावर एक कापड घेऊन मोती आणि सोनू नावाच्या दोन कुत्रांना हाक मारून आमच्या बरोबर निघाला. त्याच्या पाठोपाठ आम्ही ५ जण निघालो. इथून किल्ला कुठे आहे याची काहीही जाणीव नव्हती. दिसत पण नव्हता. घनदाट जंगलात शिरल्यावर सूर्याची किरणे पण खाली पोचू शकत नव्हती. पटापट पाऊले उचलत आम्ही जात होतो. एका खिंडीत पोचलो आणि समोर कोंकणदिव्याचे दर्शन झाले. लांबवर किल्ला दिसायला लागला होता. मस्त वाटले. 

PC Upendra 



Pandurang mama


खिड ओलांडून डावीकडून परत आम्ही जंगलात शिरलो. मी पुढे चालत होतो. अचानक पांडुरंगाने आपल्या चपला हाती घेतल्या आणि तो चालू लागला. मला काही कळले नाही असे का केले असावे पण मी न बोलता त्याच्या मागे जात राहिलो. १०० मी नाही चाललो तर समोर दगडात कोरलेलं एक मंदिर दिसले. तिथे जाऊन नमस्कार केला आणि मग लक्षात आले की त्यांनी चप्पल का काढली. पुढे काही पाऊले तसेच गेलो आणि त्यांनी परत चप्पल घातली. हा जो आपला अजब देश आहे ना, मला वाटते तो फक्त एकाच कारणाने चालतो आहे. श्रद्धा. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण नितांत श्रद्धा असल्यानी आयुष्याला कसे एक वळण मिळते. त्याच त्या मार्गावर पिढ्यान पिढ्या जात असतात आणि त्या श्रद्धेचे अभिमानात परिवर्तन होते. अशा छोट्या गावात ती एक रीत बनून जाते. मोठ्या शहरात त्याच श्रद्धेचा बाजार होऊन जातो. 

गडाच्या पायथ्याशी एका पठारावर पोचलो तेव्हा खाली कोकणचे दर्शन घडले. कोंकणदिव्या च्या मागे रायगड होता. पण इथून महाड दिसत होते. लांबवर असे काही तरी पांडुरंग मामा म्हणाले खरे. कावळे घाट परिसर दिसला. दुसरी वाट सांदोशी गावातून आहे. कावळे घाट मार्गे ती वाट इथेच येऊन मिळते. जरा लांबची वाट आहे. क्षणभर विश्रांती घेऊन गड चढायला सुरु केले. परत जंगलात नाहीसे झालो. आता मात्र पुढील चढाई अंगावर येणारी आहे. २०० - ३०० मी असेल कदाचित पण जबरी आहे. म्हणजे समोर चालणाऱ्यांचे पाय दिसतात, डोळ्याच्या लेवल ला. इथे स्टॅमिना नक्कीच कळतो. पण न काही थकता आम्ही वर पोचलो. मला, उप्या ला आणि पराग ला चिवाभंजन ची आठवण झाली. उत्तरे पासून तिथे पोचे पर्यन्त ६ ते ७ तास असाच चढ होता. 







वर एका गुहेपाशी पोचलो आणि निवांत बसलो. सर्वांनी आपापली पोटली उघडली आणि त्यातून खाण्याचे काही ना काही तरी काढले. सँडविच, चिक्की, अंडी, शंकपाळे असे बरेच काही निघाले आणि संपले. डोंगरमाथा इथून १० min आहे. पण रस्ता थोडासा कठीण आहे. वर जातांना नक्कीच काळजी घेणे गरजेचे आहे. उतरतांना तर खूप सावकाश उतरावे. गुहे पाशी काही पाण्याचे टाके आहे आणि ते पाणी पिण्या योग्य आहे. गडमाथा छोटासा आहे. वर पोचलो आणि जय शिवाजी जय भवानी च्या आरोळ्या ठोकल्या. प्रचंड आनंद होतो. कसे काय हे लिहिणे अशक्य आहे कारण शब्दत तो अनुभव अत्यंत तोटका होईल. समोर रायगड, लांब वर तोरणा, लिंगाणा आणि कावळे घाटाचे सुंदर दृश्य दिसते. तिथे बसून गप्पा झाल्या. लांबवर दिसणाऱ्या किल्ल्याचे दुर्बिणीतून बघणे झाले. फोटो झाले. आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. सावधपणे उतरत उतरत आम्ही परत पठारावर पोचलो. तिथून गाडी गाठली, आवरा आवर करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. 

PC Upendra Walunjkar


PC Upendra Walunjkar




PC Hrishikesh Patil

PC Hrishikesh Patil

PC Hrishikesh Patil



सर्वांना मरणांतिक भूक लागली होती. पानशेत च्या इथे पुरुषोत्तम पूजा नावाचा अजब ढाबा शोधून काढला होता बिडी नी. तिथे गेलो आणि पोटभर भाकरी भाजी पिठलं खाऊन निघालो. गाडीत बसलो तेव्हा पराग शेजारी बसून कधीच घोरायला लागला होता. त्याच्या साथीला उपेंद्र आणि बिडी. मधून मधून सर्वांना हाक मारून उठवत होतो. पुण्यात पोचायला ४. ४५ झाले. खूप सुंदर असा ट्रेक झाला. वातावरणातील मजा म्हणा, नाही तर परत ट्रेकिंग चालू झाल्याचा आनंद. जो भी है उत्तम है. 


Saturday, 1 October 2022

चांदणी चौक पूल

चांदणी चौक पूल 

२ ऑक्टोबर ला पूल पडणार असे कळले आणि सोसिअल मीडिया वर धमाल चालू झाली. विविध पोस्ट यायला लागले. सर्व वाचले. पण अजून सुद्धा मला या ऐतिहासिक पुलाचे नाव मात्र कळले नाही. इतके वर्ष जो पुणे आणि पिरंगुट मधला धागा होता, त्याचे नाव काय. मुळशी ला पुण्याच्या जवळ आणले आणि एक पॅटर्न तयार केला. पण याचे नाव काय. भिडे झाला, लकडी आणि म्हात्रे झाला, दारीपूल झाला पण याला मात्र नामा निराळा ठेवला. 

आमच्या बरोबरच हा पूल वाढल्याचे मला आठवत आहे. नवीन नवीन झाला तेव्हा मी आणि माझे मित्र त्या पुलावर जाऊन पाय सोडून कट्ट्यावर बसायचो. तेव्हा highway चे अप्रुप होते आणि खालून जोरात जाणाऱ्या गाड्या, गप्पामारत बघत राहणे हा एक आनंदाचा कार्यक्रम असायचा. बरेच वेळा वेड चाळे पण केले आहेत. पान खाऊन येणाऱ्या जाणाऱ्या गंड्यावर बरोबर वरून थुंकायची शरियत वगरे. बाकी न लिहिणे योग्य. थोडक्यात हा निनावी पूल आयुष्याचा एक भाग बनत गेला. 

त्याकाळात बुनिंदा, डौलत असे काही धाबे तयार झाले होते. या पुलावरून तिथे नीट जाणे आणि हलेडुले येणे, यांनी बरेच पाहिले आहे. हिरवे गार होते सर्व. NDA रस्त्यावर गार्डन कोर्ट चे किस्से मला वाटते पुण्यातील प्रत्येक तरुणाकडे असतीलच. त्या रस्त्यावर जाता येता कोणी नाही तरी या पुला नी नकीच पहिले असेल. प्रेमाच्या गप्पा ऐकल्या असतील. कोकणात जाणे असेल नाही तर ट्रेक ला, पौड ला नाही तर मुळशी ला, अनेक सुंदर आठवणींना हा पूल साक्ष आहे. कुठेही जायचे झाले किंवा यायचे झाले की याला पार करणे गरजेचे. सायकलिंग करत असतांना हा नेकलेस चा एक अविभाज्य भाग होता. ती असतेना लिंक प्रत्येक साखळीला जोडायला, तसेच काही. 

मुळशी ला जवळ आणले आणि पिरंगुटशी मैत्री झाली. इंडस्ट्रियल एरिया तयार झाली आणि इथली वर्दळ वाढली. या पुलाचा हजारो वाहनांनी दररोज उपयोग केला. या पुलानी गुंडगिरी, भांडणं, अपघात, प्रेम, मैत्री असे अनेक अनुभव घेतले. 

ज्या पुलाला कधी नावच मिळाले नाही त्याच्या नशिबी मात्र अनेकांना  जोडण्याची, जुळवण्याची आणि मिळवण्याची संधी आली. त्यांनी ती सुंदर पूर्ण केली. नशीबवान म्हणायचा की पुण्यात जन्म झाला आणि पुण्यातच अंत !!!

@JJVTTL 


Friday, 7 January 2022

सालोटा - साल्हेर चा सखा



सालोटा - साल्हेर चा सखा 

काल हरगड करून मांगी तुंगी च्या दिशेनी गाडी वळवली. सकाळी मिसळ खाऊन निघालेलो, हरगड उतरल्यावर मात्र पोटात कावळे कोकलायला लागले होते. ऊन होतेच. चर्चा करत असतांना असा विचार झाला की उद्या सालोटा आणि मांगी तुंगी हे दोन्ही होऊ शकले तर पर्वा न्हावी गड पण करता येईल. तीन दिवसांचे सार्थक होईल. सर्वांना हा विचार पटला आणि आम्ही मांगी तुंगी च्या दिशेनी गाडी वळवली. 

पायथ्याला जैन लोकांची एक धर्मशाळा आहे. तिथे यात्रींची छान सोय होऊ शकते, असे, पर्व भोजनालयात बसल्यावर समजले. गावातले हे एक चांगले हॉटेल असे म्हणायला  हरकत नाही. तिथे पोचलो तेव्हा ६ वाजले होते. एकंदरीत भुकेचा विचार करता आम्ही जेवणाची ऑर्डर द्यायचे ठरवले. जोशी काका आणि हेमंत चौकशी साठी धर्मशाळेत गेले. रुपये ५०० मध्ये आमची सर्वांची सोय झाली. शेव भाजी, डाळ, आलू मटर आणि असंख्य गरम फुलके भरपेट जेवलो आणि धर्मशाळेत सामान टाकून आडवे पडलो. सकाळी ५ ला उठून ६ ला बाहेर पडायचा आवाज काकांनी दिला. 

मारुती नी लवकर जाऊन, ५ नंतर कधीही चहा मिळेल ही चौकशी केली होती. लवकर उठून आवरून आम्ही  वाघाम्ब्याच्या दिशेनी निघालो. पहिले दर्शन महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्याचे होते. तो म्हणजे साल्हेर. त्याचा आवाका बघून धडकीच भरते. 



साल्हेर ला पूर्ण वळसा घालून साल्हेरवाडी गाव लागते. तिथे राजगड नावाचे एक चांगले हॉटेल आहे. सुनील त्याचा मालक. थोडीशी पोटपूजा करून आम्ही सालोटा च्या दिशेनी निघालो. महारघर नावाची छोटीशी वस्ती लागते. तिथेच खाली गाडी लावून आम्ही सालोटा चढायला सुरुवात केली. डावीकडे उंच साल्हेर आणि उजवीकडे सालोटा. सकाळच्या उगवत्या उन्हात हे गड झळकून उठतात. अवाढव्य कातळाच्या भिंती चमकतात त्या प्रकाशन आणि आपले डोळे दिपवून टाकतात. मस्त गारवा होता आणि नाळेतून वाट वर जाणारी, बरोबर साल्हेर आणि सालोटा यांच्या मधल्या खिंडीत नेणारी. वर चढतांना उजव्याबाजूनी जावे, नाळेपर्यन्त. नंतर सरळ मळलेली वाट आहे. 



खिंडीत पोचलो तेव्हा तिथे काहीशी माणसे बसली होती. आज रविवार असल्यानी थोडीशी गर्दी होती. उत्साही ट्रेकर्स शी गप्पा मारत, कुठून आला कुठे जाणार सर्व विचारपूस करत आम्ही खिंडीतून पुढे जायला सुरु केले. रस्ता डावीकडून आहे. वाघाम्ब्यातून जी वाट वर येते त्या वाटेनी २० पाऊले चालल्यावर उजवीकडे वर जाणारी वाट दिसेल. ती वाट थेट पाहिर्यांशी पोचवेल. घसारा आहे आणि वाट तशी अव्ह्गड आहे. त्यामुळे सावधगिरी नी वर चढावे. थोडासा ट्रॅव्हर्स मारून सालोटा डावीकडे ठेऊन आपण किल्ल्यावर जायच्या वाटेल लागतो. काताळातल्या कोरलेल्या पाहिर्या दिसतात आणि त्याच्या मुळाशी पोचायचे असते. 

आम्ही चौघे जण मस्त जोशात गप्पा मारत मारत त्या पाहिर्यांशी पोचलो. १५० ऑड आहेत. असंख्य फोटो झाले. तिथून वर गेल्यावर दरवाजा लागतो आणि मग कातळात खोदलेली वाट. हे सर्व अशक्य अदभूत आणि काही तरी वेगळाच प्रकार आहे. इथून साल्हेर समोर दिसतो. सरळ कोरलेल्या कातळातील वाटा दिसतात आणि त्या वाटेनी खाली उतरणारे छोटे छोटे माणसाचे 'थेम्ब' दिसतात. 







सालोट्या वरून साल्हेर चे काही फोटो काढले आहेत. मी त्या उंच पर्वताकडे पाहत असतांना त्याचे रूप कैलास  पर्वतासारखे दिसले. तोच तो आकार. महाराजांमध्ये पण शिव आहेच ना. कसे काय केले असेल हे सर्व उभे, काय परिस्थिती असेल, ना जीवाची भीती आणि ना कसली. फक्त स्वराज्य एकच ध्येय. इथे पंचेचाळीस झालो तरी घंटा कळत नाही काय करायला जन्म घेतला आहे. असे काहीच नाही ज्या मागे वेड लागल्यासारखा धावें. छंद जोपासणे म्हणजे वेड नाही. असो. शोध घेत राहणे आणि मिळेल तेव्हा वेड्यासारखे त्या मागे धावणे हे नक्की. बाकी काही असो, थांबायचे नाही हे मात्र आयुष्यभर श्रद्धेने पळाले आहे. 




सालोट्यावर काही पाण्याचा टाक्या, त्यातील उजवीकडे जी टाकी आहे त्याचे पाणी पिण्याचे आहे. म्हणजे आम्ही तरी पियालो आणि अजून जिवंत आहोत. डावीकडे लांबवर एक शेंडा दसतो. तिथे उघड्यावरचा मारुती आहे. मी काका आणि हेमंत तिथे जाऊन आलो. मारुती आणि बिडी टाक्यांपाशी फोटो काढण्यात होते. 











खाली उतरायला सुरु केले आणि वर येणाऱ्यांची गर्दी वाढू लागली. काकांना पाहून येता जाता या साठीच्या तरुणाला लोक नमस्कार करत होती. आणि खरे आहे. त्यांचा फिटनेस पाहता आपल्याला लाज वाटेल. हा माणूस थकत नाही. काका अएरोमॉडेलिंग करतात आणि वीकएंड ला पिरंगुट ला विमान उडवायला जातात. त्यांच्या बरोबर एक रविवार जायचे आहे. 

सालोटा खाली उतरून आम्ही मांगी तुंगी च्या दिशेनी परत  प्रवास चालू केला. राजगड हॉटेल ला येऊन मस्त भाकरी पिठलं हापसले आणि मांगी वर जायला निघालो. 

साल्हेर राहिला आहे त्यामुळे परत येणे आहेच. साल्हेर करायला खूप ताकद पाहिजे राव. आणि पुढच्या वेळी साल्हेर वर येऊन राहण्याचे प्रयोजन केले आहे. बघू काय होते ते. 









महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...