Wednesday, 1 November 2023

विसापूर - पसरलेला


विसापूर - पसरलेला  

"काका आम्ही धर्मशाळेत राहणार आहोत. ट्रेक वगरे नसून ही एक ट्रिप आहे. अमोद ची काही काळजी करू नका." असे सांगून आम्ही पळ काढला. मी, आशुतोष भडभडे, अतुल वैद्य, कौस्तुभ देशमुख, भूषण घोरपडे आणि अमोद गद्रे. दुपारच्या लोकल नी निघायचे ठरले आणि तसे नियोजन झाले. डबे बांधले, हंटर शू, पिट्टू जुनाबाजार सॅक, कॅरी मॅट - मोठी शिट घेऊन कापून केलेली, चादर, आणि इतर आवश्यक सामग्री घेऊन आम्ही निघालो. एकत्र जमलो आणि एक एकाची वेष भूशा पाहून आज पण हसू येते. अमोद नी कामाची चे बूट, आणि एक ज्याला सुटकेस म्हणतात असे काही तरी घेऊन आल्याचे चांगले आठवते. भूषण फाटकी जीन्स आणि कमरेला कुठला तरी, हातानी पण वाकेल, असा रॅम्बो knife म्हणून घेऊन आला होता. आम्ही निघालो होतो भाजे, लोहगड आणि विसापूर ला. १९८९ मध्ये पहिल्यांदा इथे आलो होतो. त्या लेण्यांमध्ये रात्र काढली होती. जेवलो होतो. शाळातील ते दिवस आणि त्या आठवणी आज पण ताज्या आहेत. गद्रे काकांना मात्र आज तरी हे सांगितले पाहिजे की आम्ही कुठल्याश्या गुहेत राहिलो होतो, तिथे वट्वागुळांनी बाजार मंडल होता, विंचू आणि खेकडे दासमुंग्यां सारखे दिसत होते आणि एक अजगराने काही तरी खाऊन निपचित पडलेले दर्शन दिले होते. एक अजब ट्रेक होता पावसाळ्यातला. तेव्हा रस्ता नव्हता की काही. काल जाऊन आलो आणि सर्व आठवणींना उजाळा मिळाला. त्याच आठवणींच्या शिदोरी वर, वर्ष उलटून गेले एकमेकांना भेटून, तरी मैत्री तशीच. त्या विसापूर च्या तटबंदी इतकीच घट्ट. Miss You Atalya, हा मित्र सुखात आहे देवाकडे..... चला --------

पुण्यात थंडीची चाहूल लागली. पाऊस गेला. कोजागिरी चा चंद्र आला उत्तम प्रकाश पडला वगरे वगरे जे काही ते सुरस भाषेत, सर्व झाले आणि ट्रेक ठरला. खूप दिवसांच्या सुट्टी नंतर जायचे  पण झेपेल असा ट्रेक करू म्हणून विसापूर ठरले. मी पिंटू आणि बिडी तयार झालो. पुढच्या आठवड्यात सर्व मित्रांची एक सहल ठरली आहे ज्याच्या नियोजनाचा, भांडणांचा, कोण काय आणणार आणि कोण कसे आणि किती वाजता निघणार याच्या चर्चे चा सेशन ठरला आणि टेबले भरली. लोक पन्नाशीला आली तरी ट्रिप ठरली की लहान मुलांसारखे भांडतात. अहो प्रत्येकाच्या बुडाखाली गाडी अली तरी कोण काढणार याची चर्चा. आमच्या पोरांनी आम्हाला असे पहिले तर मला वाटते ओळख पण नाही दाखवणार. असो.  रात्री झोपायला थोडा उशिरच झाला. थोडी झाली पण होती. तरी ५ ला उठून पिंटू कडे पोचून आम्ही निघालो. बिडी नी त्याची गाडी काढल्याने आज समस्र मित्र परीवाला भरून आलेले मी माझा डोळ्यांनी पहिले. गहिवरून येते ना, तसेच काहीसे. 

विसापूर ला जायला आता रस्ता आहे.  पूर्वी मळवली स्टेशन वरून आम्ही भाजा ला जायचो आणि मग तिथून किल्ल्यावर. आता  घाट झाल्यामुळे गाडी लोहगड आणि विसापूर  मध्ये पर्यन्त जाते.  थोडक्यात भाजे आणि पाटण असे दोन मार्ग आहेत. आम्ही गायमुख खिंडीतून गडावर गेलो. धबधबा वाट म्हणायला हरकत नाही. 

विसापूर हा किल्ला एका नजरेत मावत नाही. गडाचा विस्तार अशक्य मोठा आहे. वर चढायला खडा चढ. ४० ते ४५ min मध्ये गडाच्या माथ्यावर पोचता येते. गडाच्या पायथ्याशी गाडी लावून आम्ही तिथे असलेल्या एका छोट्या हॉटेल मध्ये शिरले. आत एक काठमांडू नेपाळ चा नेपाळी होता. त्याला माणूस असे न म्हणता आपण सर्रास नेपलीच म्हणतो. त्याच्या हातचे उत्तम पोहे आणि मॅग्गी खाऊन तिथून निघालो. आजूबाजूला रिसॉर्ट्स तत्सम बरेच काही झाले आहे. गर्दी पण छान वाढली आहे. गडाच्या दिशेनं आम्ही निघालो. अगदी पायथ्याशी एक छोटेसे हॉटेल आहे. त्यांच्या कडे उत्तम सोय आहे. खाली नाव व फोन नंबर आहेत फोटो मध्ये. तिथून मळलेल्या वाटेनी आम्ही वर चढायला सुरुवात केली. सर्वत्र हिरवेगार होते. घनदाट जंगलातून ही वाट एका धबधबा मार्गाशी संपते. जंगातून जातांना माकडांचे आवाज आणि इतर पक्षांची आरडा ओरड जणू काही कोणी शत्रू आले आहेत, अशा तारेने चालू होती. हे संगीत ऐकत ऐकत आम्ही पहिल्या टाक्याशी पोचलो. 

तिथून खडा चढ आहे. दगडांची वाट आहे जी माथ्यावर जाऊन पोचते. वर पोचल्यावर कळते की काही शे acres चा हा किल्ला आहे. थोडे थांबून पाणी पिऊन आम्ही किल्ला बघायला सुरु केले. भूषण फोटो काढण्यात मग्न होता. पिंटू त्याचा त्याचा चालत होता. एकाच दिशेने आम्ही वेगवेगळे चालत हरवलो होतो. गार वारा आणि कडक ऊन याच्या मध्ये आम्ही निवांत भटकत होतो. 

पहिल्या बुरुजावर जाऊन आम्ही आमची प्रदक्षिणा चालू केली. अनेक टाके, अनेक बुरुज, मारुती, तटबंदी, मोडके वाडे, पडलेल्या वास्तू आणि एक महादेवाचे मंदिर - बघायला ३ तास हुन अधिक गेले असतील. इतिहासात हरवून गेलो आम्ही. गोल चक्कर मारून मंदिराच्या मागे क्षण भर विश्रांती साठी बसलो. तिथे बसलो असतांना एक गावकरी आमच्या पाशी आला. साधारण ५'५" उंची, ढगाळ कपडे, एक बरणी आणि गळ्यात GPAY चा कोड हारासारखा घालून, म्हणाला मस्त लस्सी देतो. घरची आहे. मी त्याला म्हणालो भाऊ लस्सी नाकी, असेल तर ताक द्या. आलोच म्हणाला. तिथून पळ काढता काढता मला विचारले, आहेत ना इथेच. नाही, लस्सी वर लक्ष ठेवा ताक घेऊन आलोच. त्याला माझे नाव श्रीरंग आहे हे माहित नव्हते. :-) धावत जाऊन सुमारे १० मिनिटांनी तो परत एक बरणी घेऊन आला. आम्ही तिघांनी मनसोक्त ताक पियाले. तहान भागवून उरलेला किल्ला  बघायला निघालो. दुसरी वाट म्हणजे पाहिर्यांची वाट. तिथे खाली उतरून मारुतीचे दर्शन घेतले. आत साधारण ५० लोक सहज राहू शकतील अशा गुहा दिसल्या. त्याचे कौतुक करून आम्ही परत गडमाथा गाठला. आता मात्र उन्हाचा तडाखा जाणवत होता. ज्या वाटेनी वर आलो तीच वाट शोधत आम्ही परत खाली उतरायला सुरु केले. वाटेत बरीच लहान मोठी पोरं आमच्या आजूबाजूला होती. आमच्या गप्पा ऐकून त्यातील एक पोर विचकले - 'मोठे झालो की आपण पण अशेच बोलणार की काय' त्याच्या बरोबर चे engineering  ला असलेले बाकी मित्र हसले. अजून पण काही बोलले पण ते मी इथे नाही लिहू शकणार. त्याला म्हणालो बेट्या आमच्या वयाचे झालात की इथेपर्यन्त पोचा म्हणजे झाले. बडबड काही का कराल. हीच पोरं आणि पिंटू यांचा एक खाली उतरतांना किस्सा झाला. 

धबधबा वाट संपली आणि परत आम्ही जंगलात शिरलो. पोरं पुढे गेली होती. आम्ही खाली उतरत असतांना ती परत पळत वर येतांना दिसली. म्हणाली की तीन मोठे हुप्पे आहेत आणि ते आम्हाला खाली काही जाऊ देत नाहीत. मी पुढे गेलो आणि काठी वाजवत माकडा पाशी थबकलो. खरंच मोठी होती आणि भीतीदायक. पिंटू आणि बिडी ला म्हणालो की जवळ राहा आणि घोळक्याने पुढे चला. मी बजरंगबली चे नाव घेतले आणि पाठ दाखवून हळू हळू पुढे गेलो. तेव्हड्यात मागच्या एका मुलावर हुप्प्याची उडी मारली आणि बॅग घेण्याचा प्रयत्न केला. गडबड उडाली आणि एकत्र असलेली सर्व पांगलो. आम्ही पुढे गेलो आणि पिंटू मात्र मागे राहिले. मला आणि बिडी ला याचा अंदाज आला नाही. खाली पोचलो आणि सरबत पितो तर पिंटू चा फोन आला की वर या मला माकडांनी घेरले आहे. धावत परत वर गेलो तेव्हा एका कोपऱ्यात पिंटू, डावीकडे एक आणि उजवीकडे एक माकड आणि तिसरे त्याच्या सॅक मध्ये काय काय आहे याची तपासणी करत काही मिलत आहे का बघत होते. आम्हाला पाहून मात्र त्यांनी पळ काढला आणि पिंटू बचावला. त्याला घेऊन आम्ही खाली उतरलो. हे सर्व चालू असतांना उरलेले engineering पोरं घाबरून जंगलात पसार झाली होती. काहीशा वेळानी परतले. 

सरबत पिऊन आम्ही परत गाडी पाशी आलो. ट्रेक छान झाला. हा किल्ला इतका अशक्यच मोठा आहे, की नीट पाहायचाच असेल तर एक दिवस पण कमी पडेल. किल्ल्यावर बरीच वस्ती असेल असा अंदाज आहे. 

इतिहास 

विसापूर किल्ल्याबाबत एतिहासिक कागदपत्रांमध्ये पुढिल माहिती मिळते,
मराठे १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहोचला. तेथे झालेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले , तो पाठलाग करत तेथे पोहोचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहोचले. १६८२ मध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता.
४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले. http://trekshitiz.com/marathi/Visapur-Trek-V-Alpha.html



































Tuesday, 9 May 2023

खांदेरी



खांदेरी 

ग्रुप वर सचिन चा मेसेज आला की शुक्रवार शनिवार कोणी खांदेरी ला येऊ इच्छित आहे का ? क्षण भर विचार करून आणि काही कामाच्या गोष्टी मार्गाला लावून मी त्याला होकार दिला. हा ग्रुप म्हणजे ट्रेककरी ग्रुप. नावच त्याचे ते. साधारण एक ते दीड वर्षांपूर्वी मला या ग्रुप मध्ये प्रवेश मिळाला. सहज नाही हे बरका. परिमाण मोठे आहे. High Altitude ट्रेकिंग मध्ये eight  thousanders ला विशेष आदर असतो. ते आमच्या साठी एक आदर्श असतात. आणि त्यांचे कौतुक असते. ट्रेकिंग मध्ये त्यांनी केला काय आणि मी केला काय आनंद तोच असतो. इथे चढाओढ, राग, द्वेष आणि EGO ला कुठेच जागा नसते. एकमेकांना धरून आणि प्रोत्साहन देऊन पुढे कसे जाता येईल हेच बघायचे असते. आणि शेवटी त्या निसर्गानी जर का कृपा केली तर आपण शिखरावर पोचतो. त्याच्यामुळेच. तर या ग्रुप मध्ये असेच दिग्गज लोक आहेत. लपलेले तारे आमच्या ट्रेकिंग चे. सर्वांना एकत्र केले तर साधारण १००० वर्षांचा अनुभव सहज गोळा होईल. हे सर्व Three Hundreders आहेत असे मी म्हणतो. त्यांना त्याचे काही फार नाही. Three hundreders म्हणजे काय ? यातील बरेच लोकांचे ३०० हुन अधिक किल्ले झाले आहेत. काही लोकांचे काही किल्ले दोन वेळा पण झाले आहेत. 

तुम्हाला माहिती होते का, की आपल्या महाराष्ट्रात ३०० हुन अधिक किल्ले आहेत ? अहो ३५० किल्ले आहेत. नुसते किल्ले हिंडणारी जनता नाही ही. चालते बोलते encyclopedia आहेत. किल्ल्याचा इतिहास, त्याची बांधणी, झालेल्या लढाया, असलेली देऊळं आणि त्याचे महत्व. सर्व काही माहिती - त्या मध्ये सर्वात तज्ज्ञ आणि महितगार म्हणजे Dr. सचिन विद्याधर जोशी. डेक्कन कॉलेज - Post  Graduate and  Research Institute, मध्ये Archaeology डिपार्टमेंट मध्ये researcher आहे. अशक्य knowledge नी भरलेला हा माणूस आहे. सचिन नी पुस्तकं पण लिहिली आहेत, दुर्गवैभव, दुर्गा जिज्ञासा, दुर्गवेध. जमले तर नक्की वाचा. याच्या बरोबर ट्रेक ला जायचे म्हणजे एक वेगळेच सुख असते. दगडा दगडाची माहिती असलेला हा माणूस  "पुराव्यांनी शाबीत करिन" सारखा आहे. पण खरंच कुठलेली वाक्य पण संधर्भ न देता बोलत नाही. कधी कधी आमच्या भावनेंना टोचून पण जातो. कारण एकच - त्याचे अजून पुरावे मिळाले नाही - असे त्याचे म्हणणे असते. हेवा वाटतो त्याचा मला, त्याची passion बघून आणि त्याचे dedication पाहून. 

तर त्याच्या ग्रुप वर message आला आणि इथून २ गाड्या निघाल्या. वाघ्या उर्फ ऋषिकेश वाघ another ३०० + माणूस माझा कडे ६ ला पोचला. इथून मी भूषण केतकी आणि दोन ऋषिकेश अलिबाग च्या दिशेनी निघालो. वाटे मध्ये अजिंक्य भावे, राहुल घोलप, शशी, संतोष आणि काका असे पाच जण भेटले आणि आम्ही निघालो. वाटे मध्ये जातांना दोन ऋषिकेश एकाच कंपनी साठी पूर्वी काम करत होते असे कळले. त्यांची ओळख आणि इतर लोकांची ओळख झाली आणि गप्पा रंगायला सुरुवात झाली. या गप्पा रेकॉर्ड केल्या तर एखादा ग्रंथ बनेल. अर्थात त्यातील निरर्थक गोष्टी काढल्या तर त्याचा पण best seller बानू शकेल आज काल च्या self help आणि motivational पुस्तकांच्या दुनियेत. आमच्या साठी हेच ते जे काही आहे ते. Stress घालवण्याचे साधन, आला तर. आमच्या गप्पांचे रस्ते शिवकालीन घोडे मार्गांपाससून ते आत्ताच्या उभारलेल्या खरकट्या रस्त्यान पर्यन्त literally वळत होते. ब्रेकफास्ट झाला वडखळ नाक्या जवळ आणि आम्ही मांडवाच्या दिशेनी गेलो. वाटेत पेणच्या बाप्पाचे दर्शन घेतले. काही वर्षांपूर्वी मी आणि पप्या ( पुरुजीत) पुणे अलिबाग असे सायकल वर आलो होतो. तेव्हा आठवते मला की या मंदिरामध्ये काही काळ विसावले होतो. छोटेसे पण सुंदर मंदिर आहे. अर्थात गणू ची सर्वच मंदिरे भारीच असतात. 









पाडव्याला पोचल्यावर बरेच वेळा अग्निपथ चा dialogue झाला - ' हवा तेज चलती है दिनकर राव, टोपी सांभाळो नाही तो उड जायेगी'. आमच्या साठी बोट वाट पाहत उभी होती. ३ दिवस सुट्टी असल्यानी रस्त्यावर गर्दी होती. 

सर्वांनी आपापल्या सॅक बोटीवर चढवून प्रस्थान केले. लांबवर Bombay High आणि त्याच्या मागे मुंबई ची सुंदर Skyline दृष्टीस पडत होती. स्पीड बोट मध्ये उड्या मारत कसे बसे मोबाइल मधून फोटो काढत आम्ही गोल चक्कर मारून खांदेरी च्या दिशेनी जायला लागलो. खांदेरी समोर आणि त्याच्या डाव्या हाताला उंदेरी असे दोन बेटांवर दोन किल्ले दृष्टीस पडले. लांबवरून दोन गोष्टी चुकू शकत नाही - एक म्हणजे Light House  आणि दुसरे म्हणजे २६/११ नंतर बांधलेले अत्याधुनिक रडार. बोट खांदेरी ला टेकली आणि तिथे इतर कोळी लोकांनी दोर ओढून बोटीला बोट लावली. एका वरून दुसऱ्या बोटीवर उड्या मारत आम्ही खांदेरीवर पाऊल ठेवले. सर्व सामान काढून आम्ही निघालो. सचिन  आणि अजून काही मंडळी आधीच तिथे पोचले होते. त्यात संदीप परांजपे नावाचा एक गृहस्थ भेटला. तो माझा आधीच्या परिचयाचा होता. एकंदरीत आम्ही १४ लोक तिथे पोचलो होतो. 

किल्ल्या वर जातांना उजवीकडे काही ख्रिती कोळी लोक नव्या क्रॉस ची बांधणी करतांना दिसले. इथे तुम्हाला मंदिर, चर्च तत्सम, बुद्ध मूर्ती आणि एक कबर असे सर्व बघायला मिळते. सर्व धर्म समभाव असा हा किल्ला आहे. 

ऊन बरेच होते आणि आम्ही वर Light House  च्या परिसरात सुखावलो. सचिन नी जेवायची सोया केली होती. थोडे निवांत बसून गप्पा झाल्या. त्यानी सांगितले की जेवण उरकून थोडा वेळ विश्रांती घेऊन किल्ला बघायला सुरु करू. खांदेरी एक बेट आहे. २१ बुरुजांनी त्याला सर्व बाजूनी सौरक्षण दिले आहे. किल्ल्याची तटबंदी अजून शाबूत आहे. थोडीशी विश्रांती झाली आणि आम्ही एक दगड बघायला गेलो. त्या दगडावर अजून एका दगडानी मारल्यास धातू वर जसा आवाज येईल तास आवाज येतो. काही तरी नवीन.












आत्ता पर्यन्त पाहिलेल्या किल्ल्यामध्ये सर्वात घाण केलेला किल्ला म्हणून याचा नंबर १ आहे. असंख्य दारूच्या बाटल्या आणि इतर घाण यांनी कोपरा ना कोपरा व्यापलेला होता. जिथे दगड दिसेल तिथे लोकांनी आपली नावे लिहिली होती. कदाचित या नावाचे मूर्ख इथे येऊन गेले हे त्यांना लोकांना सांगायचे असावे. बघून खरंच राग येतो आणि हताश होतो. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. असो. 

दगड बघून आम्ही sea peer वर गेलो. तिथून किल्ल्याची तटबंदी खूपच भारी दिसत होती. वाऱ्यात गप्पा मारून आम्ही वेताळ बाबा चे दर्शन घेण्यासाठी पोचलो. काय काय अजब प्रथा असतात. इथली म्हणजे सर्व कोळी लोक Swordfish ची sword इथल्या वेताळाला अर्पण करतात. वर्षातून एक उत्सव असतो तेव्हा हा कार्यक्रम होतो. त्यावर लोकांनी आपली नवे लिहून तिथे ठेवल्या होत्या. 

चार पाच टाके आणि सर्व बुरुज बघत आम्ही खांदेरी प्रदक्षिणा मारली. काही बुरुजांवर अजूनही चाकं असलेल्या तोफा आहेत. जबरदस्त आहेत. यांच्या बद्दल तिथेच बसून सचिन नी खूप माहिती दिली. तोफ या बद्दल आपण त्याच्या कडून ऐकूच. 


सर्व किल्ला फिरून आम्ही Light House बघण्यासाठी पोचलो. १८६७ साली एका इटालियन कंपनी नी बांधलेले Light House आहे. अजूनही उभे आहे. अर्थातच तेव्हा लाच, पैसे खाणे, undertable वगरे काही नसल्यानी अजूनही कडक उभे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचे Mechanical construction हे इतके अशक्य आहे की काही विचारू नका. ४ th second आणि ६ th second ला दिवा, गोल फिरतांना एका पॉईंट ला दिसतो. त्यावरून हे कुठले Light House आहे हे बोटींना कळते. आम्ही चप्पल बूट काढून light house बघण्यासाठी प्रवेश केला. वर गेल्यावर संपूर्ण किल्ल्याचे दर्शन होते. हे दृश्य आयुष्यात मी पहिल्यांदा पहिले. सर्व बाजूनी लाटा आदळतांना दिसतात. लांब लांब वर क्षितिजावर बोटी तरंगतांना दिसतात. इथून सचिन नी आम्हाला आजूबाजूला असणारे किल्ले दाखवले. उंदेरी, सागरगड, कुणकेश्वर मंदिर आणि काय काय. थोडा वेळ तिथे थांबून दुर्बिणीतून काही दिसते का पाहून आम्ही खाली उतरलो. 

सूर्यास्त जवळ येऊ लागला होता. Navy चे हेलिकॉप्टर उतरायला छोटीशी जागा केली आहे. तिथे सर्व जाऊन बसलो. पिंटू आणि बिडी काही अंतरावर एका बुरुजावर जाऊन टेकले. २० मिनिटे शांतपणे त्या, न टोपीवाल्या दिनकरावांना झोपी जातांना पहिले. अगदी शेवटच्या क्षणापर्यन्त. चला दिवस मावळला. 

















दुसरीकडे ते ख्रिस्ती कोळी तो त्यांचा क्रॉस वर चढवून बसवण्यात व्यस्त होते. दिवस भर काम करून त्यांनी तो क्रॉस उभा केला आणि मग जल्लोष चालू झाला. खालच्या एका बांधलेल्या शेड मध्ये काही काळातच गाणी चालू झाली. सध्या ती गाणी Live नव्हती. मला वाटतं  जशी जशी त्यांची बोट हवेत उडायला लागली तशी तशी कोळी मंडळी नाचायला लागली आणि काही काळात Live Band नी जोरदार असा परफॉर्मन्स चालू केला. फुल कोळी गीते. धम्माल चालू होती आणि आम्ही लांबवरून ते सर्व ऐकत गप्पा मारत होतो. सचिन नी या किल्ल्याचा इतिहास सांगितला  आणि बरेच काही अजून उलगडे केले. आपण त्याच्या बरोबर गप्पा मारू तेव्हा तो सांगेलच सर्व. तिथून निघून आम्ही परत मांडव्याला आलो आणि तिथेच मुक्कामी राहिलो. रात्री लोक काही टेन्ट मध्ये तर काही चक्क  लांबलचक पुलावर - Peer वर वाऱ्यात आणि चंद्राच्या लक्ख प्रकाशात कधीच घोरायला लागली होते. 

सकाळी उठून समुद्र काठी बर्फाचा गोळा खाणे झाले. शहाळी आणि ताडगोळे झाले. परत येतांना संदीप आमच्या गाडीत होता. या माणसानी अनेक किल्ले केले आहेतच पण त्याच बरोबर अनेक सुळक्यावर क्लाइंबिंग केले आहे. Rescue mission मध्ये भाग घेतला आहे. येतांना त्याचे किस्से आणि अनुभव ऐकत ४ तास कसे गेले याचे भानच उरले नाही. तसे झाले नसते तर मी तर अशक्य बोर झालो असतो गाडी चालवून. Long Weekend ची गर्दी काही केल्या संपत नव्हती. १ मे ची सुट्टी होती त्यामुळे अलिबाग कडे येणाऱ्या हजारो गाड्यांनी रस्ता भरलेला होता. हटके ट्रेक / ट्रिप झाली होती. 

खांदेरीतून निघालो तेव्हा,आम्ही इथे आलो होतो, याची तिळमात्र खूण न सोडता सुखरूप पुण्य नगरीत परत आलो. 












महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...