हिमालय - रुद्रनाथ - अंतरीचा आणि प्रकृतीचा मौन संवाद
सहा महिने ज्याची वाट पाहत होतो त्याचा विषय अचानक रुपाली मध्ये, शेवटी निघाला आणि या वर्षी चे हे व्रत मार्गी लागेल याचा आनंद मला झाला. Unplanned Himalayas हा एक उपक्रम काही वर्षांपासून राबवला आहे. याचा थोडक्यात अर्थ म्हणजे काही न ठरवता निघायचे 'त्याच्या' दिशेनी आणि जे काही पदरात पडेल त्याचे मनमोकळे पणाने सुख आणि अनुभव घ्यायचा. जे मिळेल ते खायचे आणि जिथे छान वाटेल तिथे राहायचे. १९ साली मी निगडे आणि पप्या अशाच एका प्रवासावर निघालो होतो. पहिला दिवस या मध्ये खूपच कठीण असतो आणि स्वतःला बजावत राहावे लागते की पुढे काय याचा विचार नको. इथे कोणीही वाट पाहत नाहीये अन कोणालाही तुझे काय याची पडली नाहीये. ना काही बुकिंग च्या वेळा गाठायचा आहेत ना कुठल्या गाड्या. तेव्हा आम्ही असेच भटकत भटकत केदारनाथ ला पोचलो होतो. REELs प्रकार तेव्हा कमी असल्यानी तिथे गर्दी आणि घाण जरा कमी होती. आम्ही बाप्पा चे विसर्जन करून पितृ पंधरवड्यात जातो. भाविक लोक तेव्हा देवळात जात नाही असे म्हणण्यात. त्यामुळे का होईना आम्ही मोजके लोक तेव्हा तिथे पोचलो. मग तुंगनाथ आणि कल्पेश्वर झाले. त्रियुगी नारायण झाले आणि अशी अनेक ठिकाणे न माहिती असलेली झाली. तेव्हा तिथे कळाले, मला वाटतं औलीला असेल, की पंच केदार असे काही तरी असते आणि उरलेले दोन म्हणजे रुद्रनाथ आणि मदमहेश्वर असे आहेत . परत पुण्याला आलो आणि ठरले की हे पूर्ण करायचे.
माझा डोकयात इतर काही होते पण बाकी मंडळी या ना त्या कारणांनी यायला होकार देत नव्हती. एकेदिवशी दुपारी आम्ही कॉफी पीत असतांना, का कोणास ठाऊक अचानक निगडे म्हणाला की रंग्या रुद्रनाथ आणि मदमहेश्वर ला येतोस का. मी एक क्षण विचार न करता होकार दिला आणि माझा पुढचा प्रश्न फेकला. कधी ? चर्चा करून ठरले की २० Sept, विसर्जन झाल्यावर सकाळची flight पकडायची. पुढचे पुढे बघूया. विमानाची टिकेट्स आणि ट्रेक ठरला. पप्याला विचारण्यात आले आणि त्यांनी पण तिकीट काढले. या सर्व घटनेत भे भे म्हणजे माझा शाळेतील मित्र, त्यांनी ८ वी मध्ये असतांना पहिला आणि शेवटचा ट्रेक केला - लोहगड विसापूर, यायला होकार दिला आणि ३ चे ४ झाले. निशिकांत पुराणिक अजून एक NRI मित्र जो नीगडे चा घट्ट, तो पण येतो म्हणाला आणि आम्ही ५ जाणं तयारीला सुरुवात केली.
ठरल्या ठरल्या पहिले काम म्हणजे सिंहगड. तिथे जाऊन डोके न टेकता पुणेरी हिमालयात ट्रेक ला गेला तर तो फाऊल नाही तर गुन्हा धरला जातो. त्यामुळे मी आणि निगडे आमच्या सर्वांच्या वतीने डोके टेकून आलो. ट्रेक ची तयारी Or anticipation हा एक सर्वोत्तम भाग असतो. त्यामध्ये अशक्य मजा येते. चर्चा आणि वाद नाही झाले तर त्यात काय मजा. आणि ठरावा ठरावी साठी भेटी गाठी. अहो दिवाळी मध्ये पूर्वी जसे नवीन कपडे व इतर असायचे तसेच आमचा ट्रेक आला की असते. दुकानं फिरायची आणि ट्रेक ला लागणारी सामग्री गोळा करायची. आम्हाला ही दिवाळीच होय. म्हणजे आमच्या कडे म्हणतात की दिवाळीत कुल्ले उघडे पडले तरी चालेल पण ट्रेक ला नवीन हवे सर्व. तसेच काही झाले आणि सॅक माळ्यावरून उतरवली.
पुण्याचा पाऊस या वर्षी काही थांबत नव्हता. या यावर्षी इलेकशन्स जवळ आल्यामुळे सर्वच मंडळ श्रीमंतीचा आस्वाद घेत भिंती लावून बाप्पा चे आणि सर्व भक्तांचे कान फोडत होते. 'Oxyrich' असा मनाचा नवीन गणपती पुण्यात स्थापन झाल्याच्या बातम्या इकडे तिकडे पसरत होत्या. त्यामुळे कार्यकर्ते तत्सम सर्वांची दिवाळी या वर्षी गणपतीमध्येच साजरी झाली असे म्हणायला हरकत नाही. असो. बाप्पा जातांना या वर्षी पण बाबाची आठवण आणि तो जाणार म्हणून डोळ्यात दोन थेम्ब पाणी आल्यावाचून राहिले नाही.
दोन वेगळ्या Flights मध्ये बसून आम्ही दिल्ली ला पोचलो. टर्मिनल १ ला काही जाणं तर टर्मिनल ३ ला काही. इकडून तिकडे पोचलो आणि पुढे काय याची चर्चा केली. पप्यानी आणलेली चकली संपवली आणि मेट्रो च्या दिशेनी निघालो. खूपच जड झाली होती सॅक आणि माझे १०० आणि हे १५ चे ओझे कसे काय पाठीवर ओढता येईल याचा विचार मनात येऊन गेला. म्हणले बघू पुढचे पुढे. तिकीट काढायला उभे राहिलो आणि देणार्यानी विचारले की कुठे निघालात. त्यांनी चार सल्ले दिले आणि कळले की तो त्याच भागातला आहे. त्यामुळे आणि फक्त त्यामुळेच निदान आम्ही त्याचे बोलणे ऐकून तरी घेतले. पुणेरी ना आम्ही. दोन वेळा मोट्रो बदलून आम्ही काश्मिरी गेट ला पोचलो. इथे रस्त्याच्या कडेला छोले कुलचे, पराठे आणि मॅग्गी असे खाऊन लोकल बस मध्ये चढलो. ही बस होती ऋषिकेश ची. आज रात्री तिथे मुक्काम करून दुसऱ्यादिवशी सकाळी आम्ही सगर नावाच्या गावी जाणार होतो असे ठरले.
साधारण ७ च्या सुमारास आम्ही ऋषिकेश नावाच्या भयंकर ठिकाणी पोचलो. ६ वर्षांनी तिथे पाऊल ठेवले आणि बघितलेले ते आणि आताचे हे यामध्ये ५ वर्षांपूर्वीचा चांदणी चौक आणि आत्ताचा इतका फरक झाला आहे. एका सामान्य हॉटेल मध्ये राहून तिथे 'राजस्थानी' थाळी मिळते तिथे गेलो आणि पोटभर चेपले. रात्री परत चालत येतांना बरेच रस्ते दमून झोपले होते. शांत गल्ल्या आणि अंधारे बोळ मागे टाकत आम्ही परत हॉटेल मध्ये आलो. १२०० ला खोली आणि त्यात ३ असे गणित साधारण परवडत होते. खा खा खाऊन बिल सुमारे ७०० रुपये आलेले पाहून मला तर गहिवरून आले. पुण्यात ५ जणांना ७०० रुपया मध्ये फक्त एक भाजी मिळू शकेल हॉटेल मध्ये. सकाली ५. ३० ला निघायचे ठरले आणि त्याप्रमणे मी आणि निशिकांत तयार होऊन बसलो.
काही लोकांना 'वेळ' हा विषय अत्यंत फालतू वाटत असल्यानी बोलावलेल्या गाडीवाल्याचा पुतळा झाला होता. मला एकंदरीत कळले की पुढे काही खरे नाही. हे असेच होत राहिले तर ट्रेक मध्ये खूपच मजा येणार आहे. माझी होणारी चिडचिड लपवत मी निवांत जाऊन बसलो. साधारण ७ वगरे च्या सुमारास वाद उरकून आम्ही तिथून निघालो. ऋषिकेश मध्ये आणि या भागात रात्री ठरवतांना एक आकडा बोलतात आणि निघतांना एक. आम्ही याला सरावलेले आहोत. त्यामुळे त्यांनी ६ चे ७ केल्या केल्या टपावर टाकलेल्या सॅक आम्ही उतरवायला सुरुवात केली. न काही बोलता इतर फोन फिरवले आणि अभिनय करून पुढे निघालो. नवे लोक आता पुढे काय या गंभीर अविर्भावांनी सर्व पाहत होते. नंतर अर्थातच त्याच वाहन मध्ये बसून आम्ही सगर ला पोचलो.
सगर हे गोपेश्वर हुन ५ ते ७ km दूर असलेले एक छान गाव आहे. तिथून एक रस्ता रुद्रनाथ कडे जातो. ऋषिकेश हुन जातांना देवप्रयाग, श्रीनगर, रुद्रप्रयाग, नंदप्रयाग गोपेश्वर करत सगर ला पोचलो. एका लहानशा हॉटेल मध्ये जाऊन विश्रांती घेतली. मी तर लगेच काही तास झोपून गेलो. उठलो तेव्हा बाहेर अंधार पडला होता. पप्या सोडून बाकी लोक पाय मोकळे करायच्या दृष्टींनी पसार झाले होते. आम्ही दोघे शेजारच्या गच्चीवर समोर दिसणाऱ्या ऊंच उंच डोगरांकडे पाहत मानसिक आनंद घेत होतो. हिमालयाच्या जवळ आल्याची जाणीव होत होती. तिथेच दोन घास खालले आणि सकाळची तयारी करून आम्ही झोपी गेलो.
हिमालयातील सर्व ट्रेक हे सकाळी लवकर सुरु करणे हे गरजेचे असते हे अनुभवरून कळते. साधारण २ नंतर वातावरणात काहीही बदल होऊ शकतात. घातक बदल. हे काही लोकांना अमान्य असल्यानी तिथे पण निघायला उशीर झाला. ६ चे ६.४५ झाला. या ४५ मिनिटांचे महत्व नंतर कळले आणि दुसऱ्या दिवशी पासून वेळ काटेकोर पणे पाळणे सुरु झाले.
रुद्रनाथ - पंचकेदार मधले सर्वात अवघड स्थान. काही म्हणण्यात ४० तर काही ४४ KM चा जाऊन येऊन ट्रेक आहे. माझा अंदाजानी कुठेतरी ४० +km नक्कीच आहे. हर हर महादेव म्हणत आम्ही आमचा ट्रेक चालू केला. मळलेली व्यवस्तीत वाट आहे. त्यामुळे चुकायची तशी काही सोय नाही. इतर लोक पण खूप असतात त्यामुळे जातांना विविध प्रांतातील जनता भेटत होती.
रुद्रनाथ - हे आपल्या हिंदूंसाठी एक पवित्र स्थान मानले जाते. हिमालयात गेलो की अनेक प्रकारच्या आणि विलोभनीय गोष्टी ऐकायला मिळतात. रुद्रनाथ मंदिराची उत्पत्ती महाभारताशी संबंधित आहे. असे मानले जाते की महाभारताच्या युद्धानंतर पांडव आपल्या कर्मांपासून मुक्त होण्यासाठी शंभोचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करीत होते. महादेव त्यांना दर्शन देण्यास टाळाटाळ करीत होते आणि विविध स्वरूप धारण करीत होते. या वेळी, शंभो नी रुद्र रूप धारण करून होते. पांडवांनी त्यांच्या दर्शनासाठी तपश्चर्या केली आणि अखेर येथे शिवाचे आशीर्वाद मिळाले. असा म्हणतात की सर्व पंचकेदार जिथे बांधले आहेत तितेच शंभो ने धारण केलेल्या रूपाचे भाग आहेत.
शंभोचे calling असते असे म्हणतात. त्यांनी बोलावले तर तो दर्शन देतो आणि नाही तर आम्ही आमच्या डोळांनी पहिले आहे की लोक परत जात होते, पोचू शकले नाही म्हणून. कारण काही असो. CALLING हा पण एक विश्वास आहे. एक भावना आहे आणि श्रद्धा आहे. ज्यांना मानायची त्यांनी माना आणि ज्यांना नाही त्यांनी नको. तिथे गेलो की मी विश्वात हरवतो. पहिले पाऊल ठेवले की मी Surrender होतो. आणि नुसते बोलायला नाही तर कृतीत पण. सर्वात अवघड गोष्ट असते म्हणजे १००% संपर्पण. संपूर्ण विश्वास. या जगात आई सोडली तर हिमालय ही दुसरी जननी जिथे मोकळे वाटते. काही दडपण नाही. काही किंतु नाही आणि कुठलीच भीती नाही. एकदा कुशीत गेलं की झालं. जिथे तुमचे विचार, भावना आणि कृती या तिन्ही एकरूप होतात.
प्रवास सोपा नाही. आधी घनदाट जंगलातून वाट आहे. काही चढ अंगावर येणारे आहेत. पण खरं सांगू का, हा ट्रेक सर्वांना करण्यासारखा आहे. खूप चालायचे आहे पण कधी पोचतो हे कळतच नाही. उरतांना मात्र आपण, किती वर गेलो होतो, याची जाणीव होते. गुढग्यांना. जातांना धबधबे लागत होते. पाणी भरणे आणि पिणे चालू होते. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने चालत होते. आपल्याच ZONE मध्ये शांत होते. विचार करायला आणि इतर, काही नाही करायला, वेळच असा कुठे मिळतो. त्यामुळे काही काळ अड्जस्ट होण्यात जातो. एकदा का रिदम मिळाला मग काय ती मजा असते ते सांगून नाही कळणार. जातांना सर्व बाजूला विविध प्राण्यांचे आवाज ऐकू येत होते. पक्षी अशक्य किलबिल करत होते. त्यांच्या बरोबर आलेले बंगाली लोक बोलायचे थांबत नव्हते. का माहिती नाही पण इथे मराठी आणि बंगाली लोक भरपूर सापडतात. फारच बोलके असतात मात्र हे ...... पुंग भूगियाल नामक ठिकाणी पोचलो आणि तिथे खायचे ठरवले. अहो विचार करा - चार बाजूला उंच डोंगर, झाडी आणि इथे गरम पराठे आणि चहा ओरपत आम्ही ऊन खात पडलो होतो. हे असा काही नसतंच. इथेच पडावे असे सर्वांच्या मनात येऊन गेले पण जास्त सुस्त होण्याआधी तिथून आम्ही निघालो. इथून मात्रं वाट जी आहे ती पूर्ण चढ आहे. आज १२ - १४ km चा टप्पा गाठायचा ठरला होता. लुटी नावाच्या ठिकाणी राहायची सोया आहे असे वाचनात आलेले भे भे नी सांगितले. हा माणूस ट्रेक चा पूर्ण अभ्यास करून आला होता. त्याच्या साठी हा पहिलाच अनुभव. पुढे काय काय झाले ते कळेलच. छोट्या वाटा, येणारे जाणारे लोकं आणि खेचरं, असे आम्ही सर्व एकत्र होतो. मला पुढे काय याचा विचार करायची सवय नाही. आणि त्याची माहिती पण मी कधी घेण्याची तसदी घेत नाही. आयुष्यात याचे परिणाम मी खूप भागले आहेत. पण स्वभाव, आणि मला वाटतं की सर्वच जर का माहिती असेल आणि पाहिले असेल तर त्याचे काही कुतूहल उरात नाही. Picture चा शेवट माहिती असेल तर बघण्यात मजा उरत नाही. नाही तर तो आवडता चित्रपट असावा, परत परत बघण्यासारखा. लुटी च्या आधी काही km ला आम्ही विसावा घेत थांबलो. ४ वाजले असतील तिथे. आकाशात ढगांची दाटी आणि दूर वर पाऊस पडत असल्याची चाहूल लागत होती. वर चढायच्या आधी तिथे registration करावे लागते आणि फॉरेस्ट ची लोकं नाव नोंदणी आणि मोघम चेकिंग करतात. तिथल्याच एका माणसानी आमची वर राहायची सोय केली होती. विजांचा लांब वर आवाज येऊ लागताच आम्ही एकमेकांना घाई करायला सुरु केले. भेभे चा काही पत्ता नव्हता. हत्तीची चाल त्यात लाख विचार - अशामुळे तो मजा करत स्वतःबरोबरच रमला असायचा. साधारण अर्धातास गेला आणि मग हा उगवला. त्याला चहा पाजून ढकलत पुढे नेले. कधी पप्या तर कधी निगडे तर कधी मी असे त्याच्या बरोबर येत होतो. लुटी ला पोचलो आणि तिथे सौरभ नावाच्या इसमाच्या तंबूमध्ये आमची सोय झाली. साधारण १० एक मोठे तंबू आणि १५ एक छोटे तंबू अशी वस्ती मांडली होती. त्या वस्तीत शिरताच डावीकडे काही काकू आणि मावश्या गप्पा मारतांना ऐकू आल्या. १६ लोकांची गॅंग - तसे वयस्कर - मुंबई हुन आले होते. खेचरांवर बसून. त्यांचा तंबू मस्त आटोपशीर होता आणि सोय पण तशी बारी होती. समोरच्या बाजूला दोन टॉयलेट होती. एक लडीज आणि दुसरे सर्वांना. एकच काय ते सुख म्हणजे इथे पाण्याला कमी नाही. जिथे तिथे Pipe खेचलेले दिसतात - वरून कुठूनतरी डोंगरातून येतात आणि आयुष्यभर पाणी काही थांबत नाही.
आम्ही चहा मागवला आणि मॅगी. बाहेरील एका बाकड्यावर बसून चहा आणि गप्पा चालू झाल्या तोच पाऊसाचे टपोरे थेम्ब आदळू लागले. चटकन उठलो आणि वाकून अंधाऱ्या तंबूत शिरलो. ८ जणांची सोय होती. सॅक कोपऱ्यात ठेऊन थोडेसे आडवे झालो. बाहेर अंधार पडायला सुरुवात झाली होती. आणि जणू बादलीने पाणी ओतावे असा पाऊस वाढला. आम्हाला येऊन फक्त १५ min झाली असतील. अशक्य मुसळधार पाऊस चालू झाला. खालून, वर येणारे, चिंब भिजलेले दिसत होते. वस्ती रिकामी झाली होती. बाहेर फक्त खेचरं दिसत होती. आम्ही तो पाऊस शांत पणे बघत होतो. तास दीड तास ओसरला आणि परत सर्व आभाळ साफ झाले. बाकी चौघे जण आपापल्या जागा धरून निपचित पडले होते. पाऊस संपला पाहून मी बाहेर पडलो. उजवीकडे गेलो आणि त्याच त्या मावश्यांच्या तंबूतून श्लोक ऐकू आले. रामरक्षा ऐकू आली आणि मी गपचूप तंबूच्या बाहेर उभे राहून त्यांच्या बरोबर म्हणत गेलो. तंबूचे कापडी दार वाऱ्यांनी मधून मधून हालत होते. ते एका बाजूला गेले की आत असलेल्या मिणमिणत्या समई चा प्रकाश क्षण भर बाहेर पडायचा. त्या काका काकूंचे एकत्र पठण इतके सुरात होते की 'मंत्रमुग्ध होणे ' कशाला म्हणतात हे मला आज कळले. शेवटी शिव स्तोत्र झाले. ओम शांती शांती शांतिः म्हणून शांतता पसरली. मी तिथून निघालो आणि परत आमच्या तंबूत आलो. जेवणाची वाट पाहत कधी डोळा लागला कळले नाही. काही वेळानी 'खाना तयार है' अशी आरोळी अली आणि आम्ही जेवायला बसलो. तीच ती सब्जी आणि भात. पराठे आणि लोणचे. इथले लोणचे मला फार आवडते. त्याची चव आणि यात असलेल्या भाज्या काही वेगळ्याच असतात. गाजर आणि लिंबू ओळखू येते. पानिपत ला पंचरंगा नावाचे लोणचे मिळते. कुठल्याही पंजाबी किंवा North Indian धाब्यावर गेलात ते नक्की मागा. त्यांच्या कडे ते असतेच. इथे पुण्यात पण. पोट भर जेवलो आणि झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी भे भे वेळेत जागा झाला आणि आवरून तयार झाला. चहा आणि पराठे चेपले आणि आम्ही परत ट्रेक ला सुरुवात केली. आजचा १० km चा पल्ला खूप चढण आणि नंतर उतार असा काही तरी होता. बुटांच्या नाड्या आवळून आम्ही पाच जण निघालो. थोड्या गप्पा एकदा एकाशी तर एकदा दुसऱ्याशी मारत मारत आम्ही चालत राहिलो. पहिला टप्पा पनार बुगीयाल होता. सुरवातीचा काही काळ जागे होण्यात जातो. पण एकदा का पाय settle झाले की मग पुढचा प्रवास मात्र खूपच छान जातो.
जशी altitude वाढत जाते तसे तसे श्वास घेणे जाणवते. म्हणजेच काय प्रत्येक आणि प्रत्येक श्वास घेतांना आणि सोडतांना त्यावर लक्ष केंद्रित होते. खूप भारी अनुभव आहे. मनात काही विचार नाही. फक्त चालत राहायचे. हेच ते काय मेडिटेशन वगरे. खरं सांगू तर कधी कधी भीती वाटते या स्थिती मध्ये, कदाचित येणाऱ्या अनुभवांची असेल किंवा न कळणाऱ्या जाणिवांची असेल. त्यात देव धर्म बुवाबाजी आणि फालतुगिरी काही नसते. भीती वाटते की आपण आपल्यालाच इतके निरखून कसे पाहू शकतो. आणि जर का काही वेगळे कळले तर. मी असा मी तसा वाटणारे सर्व तुटणे काय आहे याचा पण साक्षात्कार होतो. असो. पण एक मात्र खरं आहे की एकाग्र चित्त काय आहे आणि असते ते तिथे समजायला वेळ लागत नाही. ती स्तिथी जर का सर्वत्र अनुभवायला मिळाली तर ?
पनार ला पोचलो आणि पहिल्यांदा डोळ्यासमोर हिमालयाचे दर्शन झाले. Green Meadows अथांग आणि त्याच्या बॅकग्राऊड ला पर्वत रांगा. याच्या साठी यायचे. अथांग समुद्र पहिला की, उंच उंच हिमालय पहिले की, एखाद्या अमावास्येच्या रात्री निरभ्र आकाशात रस्त्यावर आडवे पडून प्रम्हांड आणि त्या असंख्य चांदण्या पहिल्या की फक्त भरून येतं, मनात एकच विचार येतो की बाप्पा तुझा आभारी आहे की मला हे अनुभव मिळू दिलेस. तुमचे माहिती नाही, पण मला तर उडावेसे वाटते अशा वेळी. फोटो झाले आणि थोडासा अराम करून पुढचा पल्ला गाठायला आम्ही निघालो. इथून पित्रधार पर्यन्त अशक्य अंगावर येणारे चढण आहे. पाणी कुठेही नाही. त्यामुळे पाणी जपून वापरत आम्ही पुढे निघालो. निसर्ग at its best आहे. इतके भारी वाटते की काही विचारू नका.
रस्ता कठीण असल्यानी निवांत चालत होतो. तीन टेकड्या लांबवर भगवा झेंडा फडकतांना दिसला आणि हुशः झाले. कारण लोकांनी सांगितले होते की पित्रधार नंतर ४ km उतार आहे. आम्ही इथे काही थांबलो नाही. पटापट पुढे उतरायला सुरुवात केली. येणारे जाणारे हर हर महादेव च्या आरोळ्या ठोकत होतेच. त्या मावश्या आणि काका गॅंग कधीच पुढे निघून गेले होते. आम्ही २ km गेलो असू पित्रधार पासून आणि ते सर्व दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर होते. आमचा तिथे राहण्याचा बेत नक्की झाला होता. दूर दोन डोंगरांच्या मध्ये लांब वर मंदिराचे दर्शन झाले. डोळ्यातून पाणी आल्याशिवाय काही राहिले नाही. निगडे आणि निशिकांत तिथे बसले होते. निगडे नी उठून मला घट्ट मिठी मारली. दोघांचेही डोळे पाणावले होते. खूप ट्रेक एकत्र केले आहेत आणि खूप वेळा एकमेकांना सांभाळले आहे. तो मी आणि पप्या - अशी त्रिशूल गॅंग आहे. अर्थात बाकी खूप लोक येत जात असतात. ३० ३० वर्षे झाली आमची मैत्री घट्ट आहे. खूप लोकांनी काड्या केल्या, अजून करतात, पण तसा काही फरक नाही पडला. तो क्षण असतो, आणि त्यावेळी जे वाटत असते ते न सांगता कळते ते फक्त आणि फक्त एका खऱ्या मित्राला. किंवा ज्याला कळते तो तुमचा खरं मित्र असतो.
देवळापाशी पोचलो आणि वाटेवरच एका तंबू मध्ये आमची सोय झाली. सॅक टाकून चहा मॅग्गी खायला गेलो. इतर तरुणाई पण भाऊ गर्दी करून होती. त्यामुळे जरा आमची पण करमणूक झाली. पोरं तरतरीत झाली. आम्ही गप्पा मारत निवांत झालो होतो. मधून मधून घंटेचा आवाज कानी पडत होता. वातावरणातला गारवा जाणवला लागला होता. मी भे भे ला शोधायला इकडे तिकडे पाहू लागलो तेव्हा तो देवळाच्या दिशेनी चालत जातांना दिसला. त्याचे कौतुक करावे तितके थोडे. खूप स्वतःला push करून तो इथे पोचला होता. मला म्हणाला रंग्या अरे पहिल्या दोन तासातच मी थकलो होतो. बाकी जे आलो ते कसे काय मला माहिती नाही. Calling म्हणालो ना. ते हेच काही तरी असावे.
तिथे सर्वसाधारण सर्व मंदिरे एक सारखी असतात. म्हणजे त्यांचे जे काही structure असते ते. मंदिरे इथे का ? पांडव कालीन मंदिरे अजून इथे उभी कशी ? हजारो वर्ष झाली आणि पूजा अर्चा चालू आहे अथक. हे कसे काय. तेव्हा काय असेल ? ज्यांना आपण महाभारतातले मुख्य कलाकार मानतो ते इथे येऊन गेले आहेत. ते इथे राहिले आहेत. काही तरी वेगळाच अनुभव असतो हा सर्व. पूजा आणि आरती संध्याकाळी ६.३० ला असते. आम्ही आवरून कानटोपी घालून देवळा कडे निघालो. उजवी कडे त्रिशूल, नंदादेवी, नंदाघुमटी आणि खूप सारे निनावी पर्वत सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात झळकत होते. मी देवळात जाऊन दर्शन घेतले. अदभूत आहे काही तरी हे. एका कोपऱ्यात जाऊन ध्यान लावून बसलो. आता हे लिहितांना पण डोळे मिटले तर ती जाणीव झाल्या शिवाय राहत नाही. हर हर महादेव. काय होते त्याचे वर्णन करणेच अशक्य आहे. पण मला वाटते की प्रत्येक माणसाचा अनुभव काही वेगळा असतो. काही लोक अमृत दिले तरी एरंडेल सारखे पितात. त्यांना त्या अनुभवाची पण allergy असते. त्यांना मला कसा काही अनुभव नाही आला सांगण्यात जास्त धन्यता वाटते आणि तोच त्यांचा अनुभव असतो. Surrender / समर्पण या क्षणी जाणवते. अहंकाराचे. मी कोणी नाही, कोणीच नाही. ज्यांना तिथे जाऊन पण याची जाणीव होत नाही ते जाऊदे JJVTTL. काही वेळात गुरुजींनी मला हाक मारली आणि मी जागा झालो. देवालयाच्या बाहेर जाण्यास सांगितले. बाहेर गर्दी जमली होती. सर्वांना बसायला सांगितलं आणि काही सूचना दिल्या. सर्वत्र शांतता पसरली. काही दाम्पत्यांमध्ये तरीही कशावरून तरी चर्चा चालूच होती. शेवटी त्या पुजाऱ्याबानी त्यांना हटकले. मी वरच्या पाहिरीवर बसलो होतो. डमरू आणि मोठे नगारे बाहेर निघाले. शंख नाद झाला आणि माझा डावीकडून एक उंच तेजस्वी माणूस भगवे कपडे आणि अंगावर गरम जाकीट घालून प्रगट झाला. पायात वहाणा, धोतर North इंडियन पद्धतीचे, गळ्यात रुद्राक्ष माळा, डोक्यावर पगडी सारखे काही तरी बांधलेले, ६ फूट किंवा अधिक उंची. हे मुख्य पुजारी. देवळात गेले. परत शंख नाद झाला आणि अचानक घंटा, डमरू आणि नगारे याचा एका तालात आवाज घुमू लागला. अशक्यच म्हणायचे हे जे एकही होते ते. It was magical, mystic. शिव असल्याची जाणीव. अर्धा तास आरती झाली आणि त्यानंतर मंत्र पुष्पांजली. परत आत गेलो तर भोलेबाबा चा मुखवटा बदललेला दिसला. खूप प्रसन्न वाटले. इथली ताकद काही वेगळीच आहे. आम्ही सर्व भाविक. आस्तिक आणि नास्तिक सर्व तिथे हरवून गेलो होतो.
बाहेर येऊन चप्पल शोधून परत टेन्ट कडे निघालो. एका टेबल वर आम्ही पाच जण बसलो आणि डाळ आणि भाताने पॉट भरले. डाळ खूप चविष्ठ होती. एकंदरीत दिवस उत्तम पार पडला आणि दर्शन पण मनासारखे झाले. टेन्ट मध्ये जाऊन आपल्या जागा पकडून आम्ही घोरायला लागलो. अधून मधून उंदीर अंगावर उद्या मारत होते आणि मी त्यांना भिरकावून लावत होतो. काही वेळानी झोप लागली आणि नंतर उंदरांनी काय केले हे मला कळले नाही. कोणालाच कळले नाही. सकाळी ५ ३० ला उठलो आणि उजाडायच्या आत सकाळी ची कामे उरकली. इथे काही कसलीही सोय नाही. मनात आले होते की एक दिवस अजून इथेच राहू पण एकंदरीत व्यवस्था बघता ते काही शक्य वाटले नाही.
आज मात्र २२ किमी चा पल्ला एका दिवसात गाठायचा होता. उतरतांना, माझे वजन जास्त असल्यानी, पायावर खूपच ताण पडतो. सावकाश उतरावे लागते कारण इथे पडलो तर फारसे काही वाचणे वगरे नसते. एक टप्पा आऊट असते. आम्ही परतीच्या प्रवासाला सुरु केले. ४ किमी चा खडा चढ चढून आम्ही परत पित्रधार ला पोचलो. आज भे भे दमला होता. खूप सावकाश येत होता. अर्धा पाऊण तास थांबून भे भे आला. इथून पुढे पुरुजीत त्याच्या बरोबर पुंग भुगयाल पर्यन्त बरोबर आला. ४ ३० वाजले तिथे पोचे पर्यन्त. वाटेत तसे फार काळ कुठे न थांबता आम्ही खाली उतरत होतो. वेळेत पोचणे गरजेचे होते कारण पाऊस आला तर काही खेर नाही. पुंग ला पोचलो आणि इथे पराठे मिळाले. आजूबाजूला बंगाली बाबू गॅंग चिवचिवाट करत होते. निगडे पुरुजीत आणि निशिकांत इथून पुढे निघाले. मी आणि भे भे दोघे गप्पा मारत मारत त्याच्या पेस नी खाली उतरायला लागलो. रस्ता काही संपत नव्हता. अंधार पडायला लागला होता. हळू हळू वर जाणाऱ्यांची आणि वरून खाली येणार्यांची पण गर्दी नाहीशी झाली होती. माकडे म्हणजे बिग size इकडून तिकडून उद्या मारत होती. जंगल जागे व्हायला लागले होते आणि त्यात आम्ही दोघे पाहुणे. जसे पुढे जात होते तसे तसे त्या त्या एरिया मधली झाडे जागी होत होती. रातकिड्याचा आवाज जोरानी चालू व्हायचा आणि आम्ही पुढे गेलो की कमी व्ह्याचा. पाऊस थोडा थोडा चालू झाला होता. लांब वर वीज चमकताना दिसत होती. भे भे ला थोडी घाई केली तर म्हणायचं की तू पुढे जा. जे शक्य नव्हते. नियम आहे. ४ तास आम्ही चालत होते हळू हळू. शेवटचा १ किमी मात्र किर्रर्र अंधार पडला आणि मी माझा मोबाइल च्या प्रकाशात आम्हा दोघांना खाली न्यायला लागलो. एकीकडे आधी रामरक्षा झाली, मग भीमरूपी आणि अथर्वशीर्ष झाले आणि नंतर मात्र मी मोठमोठ्याने गाणी म्हणत होतो. म्हणजे आम्ही मित्रांमध्ये तीन प्रकारची गाणी आहेत - एक ऐकायची म्हणजे ती गाणी आपण म्हणायचं प्रयत्न नाही करायचा - मूळव्याध होऊ शकतो. दुसरी म्हणजे म्हणायची गाणी जी आम्ही म्हणतोच - जी ऐकली कोणी तर बेसूर नाही वाटणार आणि तिसरी म्हणजे आमचे काही मित्र धार्थ सारखे जे गाणी सांगायचे. पेपर वाचल्या सारखे. ते ऐकून पण बरेच वर्ष उलटले आता. तर सांगायचा मुद्दा असा की जंगली प्राणी जवळपास येऊ नये या हेतूंनी असो वा काहीही मी आरडा ओरड करत गाणी म्हणत होतो. भे भे मधूनच हसायचा. या माझा बालपणीच्या मित्रानी ट्रेक मात्र पूर्ण केला. दुसऱ्या दिवशी पायाचे तुकडे पडले ते सोडा.
सुरुवातीच्या कमानीत पोचलो आणि हुश्श झाले. ८ वाजले असावेत. सगर ला ज्या हॉटेल मध्ये राहिलो होतो तिथे परत पोचलो. मस्त अंघोळ केली, कुठल्याश्या तरी rum चवीचे दोन घोट घेत आम्ही सर्व त्या हॉटेल च्या गच्चीत गप्पा मारत बसलो होतो. मी पटकन जाऊन बटाट्याच्या काचऱ्या केल्या. लखलखीत आकाशात आम्ही सर्व फिलॉसॉफिकल तारे तोडत होतो. कोणाला काय अनुभव आला याचे वर्णन करत होतो आणि ऐकत होतो. काही म्हणा आमच्या गप्पांमधून नेहमीच काही ना काही तरी नवीन शिकायला मिळते. निगडे चे योग वर्ग, पुरुजीत ची तत्वे, भेभे चे वाचन आणि त्यातून घेतलेले बोध याचा गोपाळ काला झाला तरी वाद नाही होत. जेवलो आणि झोपलो. दुसऱ्या दिवशीची वाहतुकीची सोय झाली होती. उखीमठ आणि तिथून रांसी असा प्रवास होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बोलेरो मध्ये सॅक चढवून तिथून निघालो. एक ट्रेक उत्तम झाला आणि रुद्रनाथ महाराजांचे दर्शन पण सुंदर झाले. बोलेरो मध्ये बसता उतरता सर्वांचे पाय बोलत होते. ६० ते ७० किमी चा प्रवास होता. हा प्रवास चोपता किंवा ज्याला mini swiss म्हणतात अशा प्रदेशातून होता. जातांना तुंगनाथ लागले. काही वर्षांपूर्वी आम्ही तुंगनाथ ला गेलो असतांना जेमतेम १०० लोक दिसली वर खाली करतांना. आज पाहिले तर चातृशृंगी ची कशी जत्रा असते तसे काही तरी होते. लोक कुठेही पार्किंग करत होते. कुठेही कचरा टाकत होते. भगवे कपडे आणि गाडी मध्ये दोन फिरंगी पाहुणे हे दृश्य कॉमन होते. खेचरांनी केलेली घाण आणि माणसांनी मांडलेली घाण दोन्ही तिथेच. आम्हा तिघांना मनात येऊन गेले की बरं झाले आपण इथे येऊन गेलो आहोत. Generally speaking मला असा वाटतं की जिथे ट्रेक आहे, आणि जिथे पोचणे कठीण आहे तिथेच गर्दी आणि घाण जरा कमी आहे. एव्हरेस्ट सोडून.
जाता जाता उजवीकडे मान खाली करून तुंगनाथाला नमस्कार केला आणि पुढे निघालो. बोलेरो चे, आम्हाला रांसी नावाच्या गावी सोडण्याचे ठरले होते. पण या बहाद्दूर नी उखीमठ पर्यन्त गाडी नेली आणि तिथून दुसरी सवारी करा असे म्हणाला. थोडी बाचाबाची झाली पण कळले की दुसरी सवारी चे पैसे काही द्याचे नाहीत. सॅक काढल्या आणि आम्ही दुसऱ्या बोलेरो मध्ये जाऊन बसलो. मागे एक माणूस लटकत होता आणि टपावर एक माणूस निवांत बसला होता. कदाचित हा जाड भिंगाचा माणूस आमचा पुढच्या वर्षीच्या ट्रेक चा गुइडे असू शकेल. रस्ता भयंकर होता कारण इथून आम्ही डोगरात उंच जाणार होतो. कैलास - या गाडीचा ड्राइवर. या माणसाबद्दल नकीच बोलले पाहिजे. लिहिले पाहिजे. एक तरतरीत आणि फिट साधारण २८ वर्षांचा माणूस अशक्य बोलका आणि अत्यंत मदत करणारा. ३ दिवस त्याच्या विविध गोष्टी ऐकण्यात आणि हिंडण्यात कसे गेले कळलेच नाही.
गाडीत बसलो आणि मी कैलास ला म्हणालो भाई मटण का कूच जुगाड हो सक्त है ? त्याच्या चेहेऱ्यावर हास्य उमटले. तो म्हणाला भाई सब हो जायेगा. इथे या एरिया मध्ये जास्त नॉन veg मिळत नाही. सर्रास तर नाहीच नाही. पण पहाडी भागात अजून आत आत गेलात की बरेच काही होऊ शकते. कैलास नी सांगितले की माझे हॉटेल आहे आणि तुम्ही तिथेच राहू शकता. रांसी ला पोचे पर्यन्त त्यांनी आम्हाला दोन तीन ठिकाणे दाखवली. एका सुंदर धबधब्या च्या बाजूला आम्ही जाऊन निवांत पडलो. सर्व शीण नाहीसा झाला. कोणी एका दगडावर तर कोणी दुसऱ्या. आपापल्या विश्वात हरवून गेले होते. मग तिथून गेलो एका तलावा पाशी. तिथे अर्जुना नी अंघोळ केली असे म्हणतात. अप्रतिम जागा होती. आता हा कैलास नसता तर हे काही झाले नसते हे नक्की.
रांसी ला पोचलो आणि त्याच्या हॉटेल मध्ये गेलो. ४ खोल्याचे सुंदर टुमदार हॉटेल दरी च्या टोकाला आहे. तिथून थेट समोर हिमशिखरांचे दर्शन आणि दोन्ही बाजूला उंच उंच हिरवेगार पर्वत. अहाहा. दोन खोल्या घेतल्या आणि आम्ही निवांत झालो. रात्रीची मटण ची तयारी झाली होती. आज जेवायला काही तरी वेगळे मिळणार याच्या आनंदात होतो.
आज आमचा रेस्ट डे असल्यामुळे आम्ही समोर च्या बाकड्यावर बसून चहा ओरपत निवांत गप्पा मारत बसलो होतो. आजूबाजूची चिल्ली पिल्ली खेळायला येत होती आणि पप्या आणि निशिकांत त्यांच्या शी खेळण्यात मग्न झाले होते. तो दिवस संपला. प्लॅनच नाही करायचा त्यामुळे काही वेगळे घडले तर त्याचे सोयर सुतक आम्हाला नव्हते. मी पप्या आणि निगडे बोलता बोलता म्हणालो की इथे परत यायला हवे. मग आपण इथेच ३ दिवस राहू आणि इथली सर्व न माहिती असलेली ठिकाणे झाडून काढू. मदमहेश्वर साठी परत येऊ. ओक ओक ओक. विषय संपला. या मागचे कारण अजून पण काही होते पण ते इथे लिहिणे बरोबर नाही.
पुढचे तीन दिवस कैलास नी आम्हाला जंगलात, धबधब्यात, धरणात, डोंगरवर आणि FB आणि INSTA वर रील्स मध्ये न सापडणाऱ्या अनेक ठिकाणी हिंडावले. अवर्णनीय निसर्गाचे, तिथल्या Local अन्नाचे आणि इतर बरेच काही नवनवीन अनुभव आम्हाला मिळाले. आजूबाजूला तिथे गांजा म्हणजे Purest Form काय असेल अशी शेती होती सर्व घरांच्या भोवती. डोगरात जाऊन तिथला फ्रेश माल आणि मळून मळून केलेली गोळी म्हणजे शम्भोचा प्रसादच म्हणायचं. या गावामध्ये एक मंदिर आहे देवीचे. गूढ सर्व. एके संध्याकाळी आम्ही चालत त्या मंदिरात गेलो कारण आरती असते. काहीतरी अदभूत अनुभव आहे. हे पण मंदिर पांडव कालीन - गुरुजी तर म्हणाले त्यापण आधी चे आहे. मंदिराच्या आवारात एक स्वयंभू पंचकेदाराचे मंदिर आहे. हे म्हणजे जरा अति होते विश्वास ठेवायला पण. पण आहे हे खरे. ५ केदार जसे आहेत तसे च्या तसे इथे या छोटासा मंदिरात साक्षात दिसले. मदमाहेश्वराचे दर्शन इथे झाले. आरती झाली आणि आम्ही परत हॉटेल कडे यायला निघालो. चालायची सवय झाली होती त्यामुळे लांबच्या रस्त्यानी गप्पा मारत मारत काही किमी चा फेरफटका सहज मारला.
तीन दिवस राहून आमची जायची वेळ झाली. कैलास ला आश्वासन दिले की आम्ही पुन्हा येऊ आम्ही पुन्हा येऊ, गुगल वर review लिहून तिथून निघालो. सकाळची ६ ची गाडी उखीमठ वरून आम्हाला परत ऋषिकेश ला नेणार होती.
ऋषिकेश चा अनुभव काही फारसा चांगला नव्हता आणि लिहिण्यासारखे काहीही नाही.
अजून एक हिमालयातील प्रवास म्हणा ट्रेक म्हणा किंवा अनुभव म्हणा पूर्ण झाला. कैलासालाच आश्वासन देऊन आलो आहे त्यामुळे परत जायची वाट पाहायला सुरुवात झाली आहे. पानपटीया, कालिंदी, मदमहेश्वर, देवारीया ताल, कागभूसंदी असे तिचे आसपास असणारे ट्रेक - कठीण ट्रेक याची माहिती साठवून ठेवली आहे. फक्त प्रॅक्टिस चालू कधी करायची या साठी बसावे लागणार आहे !!!
हर हर महादेव !!!