Friday, 19 December 2025

सुवर्णदुर्ग - कनकदुर्ग - स्वर्गीय

सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग - स्वर्गीय 

साधारण २००७ ची गोष्ट असेल. पुरंदरे काकू एका ट्रिप ला जाऊन आल्या. आल्यावर भेट झाली तेव्हा त्यांनी त्या जागेचे खूप कौतुक केले. सुंदर आणि स्वछ समुद्र किनारा. एक दोनच मोजागी हॉटेल. आणि बीच वर कोणीही नाही. परत फक्त चार पाच तासांच्या अंतरावर. लहानपणी पासूनच त्या अथांग समुद्र चे अत्यंत आकर्षण. आणि बाबा सहज त्या मध्ये मला त्याच्या बरोबर पोहायला न्यायचे. श्रीवर्धन असो व अजून कुठे. समुद्र म्हणलं की 'चला लगेच'. तर काकूंनी सांगितलेल्या जागेवर जाऊन पाहून तर आलेच पाहिजे म्हणून मी आणि माझे मित्र सर्वात पहिल्यांदा दापोली जवळील लाडघर नावाच्या छोट्याशा शांत आणि टुमदार कोंकणातील निवांत गावात जाऊन पोहचलो. छोट्या वाटेवरून स्कॉर्पिओ घालत तिथे पोचलो. पहिल्याच नजरेत ते गाव मनात भरले. आणि त्या नंतर असंख्य वेळा आम्ही तिथे गेलो. एक हॉटेल ची  ५० हॉटेलं झालेली पहिली. शांत समुद्र किनारी आता उंट आले, घोडे आले, हत्ती नाही अजून पण येतील. वॉटर स्पोर्ट्स चालू झाले आणि बघता बघता बनियान गॅंग नी तिथे त्यांचे प्रस्थ स्थापन केले. लाडघर . भारतात अशी अनेक ठिकाणे संपली आहेत. आता केदारनाथ ची तयारी चालू आहे. रोपवे ची. शेवटी धंदा. असो. प्रलय येईल आणि वाहून नेईल. परत. 

मग हर्णे बंदरावर जाऊन मासे आणणे हा नित्याचा कार्यक्रम होत गेला. तिथे बंदरावर लिलाव करून मासे घेणे हा एक अनोखा अनुभव असायचा. आता कोळीण पण स्मार्ट फोन वापरून चाट GPT ला विचारून भाव ठरवतात. याच बंदरावर दोन दुर्ग आहेत. एक कनकदुर्ग आणि दुसरा फतेदुर्ग. एक वर अतिक्रमण करून फक्त 'हा किल्ला होता' अशा दशेत तो आहे. तटबंदी दिसते म्हणून तो किल्ला म्हणायचा. आणि त्या काळी  बांधलेली आहे म्हणून लोक पण निर्धास्त 'Sea facing' घरात राहतात. आत्ताचे सरकारी घर असते तर १०० लाटात भुईसपाट. तर इतक्या वेळेला तिथे गेलो तरी हे किल्ले काही कळले नाही. पण समोर एक भाला मोठा समुद्रातील किल्ला मात्र नजरेत सदैव पडायचा. 'तिथे जायला पाहिजे' असे अनेक वेळा ठरवून पण जाणे झाले नाही. २००९ च्या सुमारास खूप प्रयत्न केला होता. पण तिथल्या कोळी लोकांनी नेण्याचे टाळले. विनंती करून पण कोणी तिथे जायला तयार झाले नाही . मी त्याचा नाद सोडून दिला. तो किल्ला तसाच राहिला. आत्ता आत्ता पर्यन्त आम्ही लाडघरला गेलो पण सुवर्णदुर्ग हा विषय संपला होता. 

काही महिन्यांपूर्वी सचिन जोशी यांनी आमच्या पायलट ट्रेककरी ग्रुप वर सुवर्णदुर्ग ला जायचे ठरत आहे असे लिहिले. तर ज्यांना जमेल त्यांनी यावे. तिथे काही स्वयंसेवी संस्था दुर्ग संवर्धाचे कार्य करत आहेत आणि त्यांना काही मार्गदर्शन हवे आहे. पायलट ट्रेककरी ग्रुप मध्ये दिग्गज ट्रेकर्स आहेत. ४००+ किल्ले झालेले ३, ३००+ झालेले ५, २००+ झालेले १० आणि इतर सर्वांचे १००+ किल्ले एक एक वेळा नाही तर दोन वेळा पण झाले आहेत. त्यामध्ये फाटक काका आणि जोशी काकांसारखे साठी पार केलेले आणि तासंतास आकाश दर्शन घडवणारे, त्या न संपणाऱ्या  ब्रह्मांडाचे वर्णन करून हवेत चित्र काढून नक्षत्र तयार करणारे, इतिहास अगदी पुराव्या सकट सांगणारे सचिन सारखे आभासक आणि मग आम्ही सर्व महाराजांवर प्रेम करणारे मावळे. घरातले सांभाळून तर काही पळून असे २० जण या ट्रेक ला हाजिरी लावणार असे कळले आणि मिनी बस आणि काही गाड्या अशा दापोली दिशेला निघाल्या. या ग्रुप मध्ये शिस्त प्रिय लोक आहेत आणि कदाचित त्यामुळेच इतके ट्रेक गेले किती तरी वर्ष एकत्र करत आले आहेत. 

आम्ही शनिवारी दुपारी निघालो आणि बस नी आसूद बागेत पोचलो. तिथल्या बीच चे नाव कर्दे असे आहे. तिथे एका वाडी मध्ये आमची रायाची सोया झाली होती. दापोली मधल्या श्रेयस नावाच्या व्हेज हॉटेल मध्ये थाळी जेऊन आम्ही वाडीत पोचलो. काही लोक दुसरी कडे जाणार होती आणि त्यांची सोय अमित जोशी यांच्या कडे झाली होती. असंख्य ट्रिप मधली पहिलीच असेल की जेव्हा मासे नाही खालले. नियम !!! बाकी वेळेला बंड झाला असता. पण या ग्रुप बरोबर आले की सचिन म्हणेल तसे. आपण मागे मागे जायचे. नियमात बसायचे. काही तासांचा प्रश्न असतो त्यामुळे चालते. अर्थात मजा येते आणि इतर गप्पा गोष्टी इतक्या चालू असतात की बाकी व्यसनाचा विसर पडतो. 

आज रात्री उल्का वर्षाव आहे. त्यामुळे लगेच बीच वर जाऊया असा ठराव मांडण्यात आला. असाधान १०३० च्या सुमारास आम्ही सर्व शुकशुकाट असलेल्या समुद्र किनारी, किर्रर्र अंधारात, मोबाइल च्या प्रकाशात वाट शोधत पोचलो. जसा बीच जवळ येत होता तसे लाटांचा आवाज मोठा होत होता. किनाऱ्यावर सर्व जण पोचलो आणि गोल करून सर्वांच्या माना, उभ्या च्या आडव्या झाल्या आणि आकाशातून काही पडतंय का बघायला डोळे फिरायला लागले. 'अरे हा बघ पडला' असे विविध दिशां मधून चालू झाले. जोवर तिथे पाहायचो तोवर दुसरी कडे तारा / उल्का पडलेली असायचा. त्यात काही लोक अत्यंत frustrate झाले कारण त्यांना एकही पडतांना तारा काही दिसत नव्हता. मला दिसले ६ / ८ पडलेले. त्याच त्या रात्री फाटक काकांनी आकाश दर्शन घडवले. क्या बात है. पूर्ण अंधारात त्या लाटांच्या आवाजात लखलखणाऱ्या चांदण्याच्या दुनियेत सर्वच हरवले होते. आपल्या दुनियेत होते. 'अरे हा बघ पडला' 'अरे हा बघ पडला' ..... 

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही हर्णे ला ST Stand च्या शेजारी असलेल्या एका टपरी मध्ये नाश्ता करायला गेलो. दोन batch मध्ये आत शिरलो. उसळ वडा, मिसळ, वडा पाव, सॅम्पल पाव पॉट भर खाऊन आम्ही समुद्र किनारी निघालो. तिथे एक Fishing  Boat आमची वाट पाहत उभी होती. दुर्ग संवर्धन म्हणून त्यांनी आमच्या कडून पैसे नाही घेतले. दोन बोटी मध्ये बसून आम्ही २० जाणं सुवर्णदूग च्या दिशेनी जायला लागलो. खूप दिवसाचं स्वप्न पूर्ण होणार या कल्पनेंनी आनंद होत होता. घरामध्ये काही तरी कार्यक्रम ठरलेला होता. केळवण. पण सुवर्णदुर्ग मिस करणे अशक्य होते. परत नाही वेळ अली तर काय करू? मी निघालो. आम्ही साधारण १५ मिनिटात दुर्गाच्या किनारी पोचलो. पाण्यात उड्या मारून बोटीतून उतरून आम्ही किल्ल्याच्या दिशेनी चालायला सुरु केले. 

या किल्ल्याची तटबंदी खूपच शाबूत आहे. इतकि वर्ष समुद्राच्या लाटांनी आदळआपट केली तरी हा किल्ला उभा आहे. हे सर्व अशक्य आहे. याच्या भिंतींनी किती पर्व बदलतांना पहिली आहेत. किती लढाया पहिल्या आहेत आणि किती तरी गोष्टी आणि गुपित पोटात लपवले आहेत त्यालाच त्याच माहिती. या दरवाज्याचे एक वैशिष्ठ म्हणजे सरळ आत शिरता येत नाही. त्यामुळे कुठलेही मोठे व अवजड यंत्र / शश्त्र / सामान काही नेता येत नाही. दरवाज्यातून आत गेलो आणि तिथे अनेक कार्यकर्ते सचिन ची वाट पाहत होते. तो आल्यावर त्यांची चर्चा चालू झाली आणि आम्ही इकडे तिकडे करायला लागलो. तटबंदी वर चढून एका बुरुजावरून दुसऱ्यावर चालत रमत गमत समुद्र पाहत फोटो काढत आम्ही सर्व निवांत झालो होतो. गडावर पाण्याच्या अनेक टाक्या आहेत. पण पाणी खराब आहे. टाक्या स्वछ करण्याचे काम चालू आहे. त्यामुळं मला वाटते काही वर्षात इथे पिण्याचे पण पाणी मिळेल. किल्ला तसा मोठा आहे आणि दोन ते तीन तास सहज लागतात. काही वाड्यांचे पण अवशेष बघायला मिळाले. चोर दरवाज्याचे खोदकाम चालू होते. म्हणजे माती आणि दगडे जी अडकून तो दरवाजा बंद झाला होता त्याला खुले करणे चालू होते. सर्व कार्यकर्ते किल्ला चकाचक करण्यात मग्न होते. एका झाडाखाली आम्ही सर्व गप्पा मारत बसलो. ऊन वाढले होते. दापोलीला थंडीची सवय नाही पण रात्री मात्र चक्क १९ पर्यन्त तापमान गेले होते. तिथं सराफ नावाच्या एका मित्रांनी आणलेली चकली आणि चिवडा संपवला. शेवटचा टप्पा बघायला आम्ही उठलो. एकीकडे सचिन जोशी चे रील्स चे शूटिंग चालू होते. या मध्ये किल्ला आणि त्याची माहिती, घडण आणि इतर बऱ्याच काही गोष्टी ऐकायला मिळतात. एकंदरीत फार चढणे आणि उतरणे नसल्यामुळे इतर पण गर्दी तिथे होऊ लागली होती. आता रेगुलर या किल्ल्यावर येत येते आणि आणि बोट पण मिळतात. आधी इथे जंगले होते आणि त्यामुळे आत जाणे पण कठीण होते. आता ठीक आहे. मला वाटते कि युनेस्को की या किल्ल्याचा समावेश हेरिटेज यादीत मध्ये घातला आहे. 

समुद्रातील किल्ल्याची मजा काही वेगळीच असते. खांदेरी उंदेरी असेच किल्ले आहेत. कमाल मजा येते. अथांग, अनंत, वगरे चा अर्थ कळतो. दरवाज्याच्या पाहिऱ्यांवर बसून आम्ही बोट ची वाट पाहत होतो. येणाऱ्या जाणाऱ्या प्रेक्षणीय वाटणाऱ्यान कडे बघत वेळ काढत होतो. बोट आली तेव्हा २. ३० वाजून गेले होते. भुकेनी लोकं सैरभैर झाली होती. दापोली पोचलो आणि एकही हॉटेल जेवण द्यायला तयार झाले नाही, ३ ला बंद सर्व. फळं आणि सामोसा खाऊन आम्ही पुण्याचा दिशेनी निघालो. येतांना क्रिकेट आणि पॉलिटिक्स सर्व न संपणारे विषय chewing gum सारखे चावत रवंथ करत वेळ मारत नेट होतो. 

एकंदरीत जर का दापोली ला गेलात तर हर्णे वरून बोट करून हा किल्ला जरूर बघा. छान अर्धा दिवस ट्रिप होते. पाणी घेऊन जा आणि हो येतांना आपण केलेला कचरा तरी परत घेऊन या. किल्ल्यावर सोडून देऊ नका. जय शिवराय !!!

इतिहास 

----------शिलाहारांनी उभारलेला हा किल्ला, १६व्या शतकात आदिलशहाकडे होता. १६६० च्या सुमारास शिवरायांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला व त्याची फेरउभारणी करुन बळकट केला. किल्ल्याचे लपवलेले प्रवेशद्वार ह्याची साक्ष देत उभे आहे. राजाराम महाराजांच्या काळात कान्होजी आंग्रे यांनी सूवर्णदूर्गच्या किल्लेदाराची फितूरी मोडून काढली. पेशवे व तुळाजी आंग्रे ह्यांच्यात आलेल्या वितुष्टामुळे आंग्र्यांचा बिमोड करण्यासाठी इ.स. १७५५ मध्ये पेशवे व इंग्रजांच्या संयुक्त सैन्याने सुवर्णदुर्गावर हल्ला केला व सूवर्णदूर्ग जिंकून घेतला.

१८०२ साली यशवंतराव होळकरांच्या भीतीने सैरावैरा पळणारा दुसरा बाजीराव काही काळ सूवर्णदूर्गाच्या सुरक्षित आश्रयाला राहिला, नंतर स्वत:चा कुटुंबकबिला तिथेच सोडून वसईला इंग्रजांच्या आश्रयाला गेला. नोव्हेंबर १८१८ मध्ये कर्नल केनडी, कॅप्टन कॅपेल व लेफ्टनंट डॉमिनिसेट यांनी अवघ्या ५० शिपाई व ३० खलाशांनीशी हल्ला चढवून किल्ला ताब्यात घेतला --------( ट्रेक्षितिज )




















































सुवर्णदुर्ग - कनकदुर्ग - स्वर्गीय

सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग - स्वर्गीय  साधारण २००७ ची गोष्ट असेल. पुरंदरे काकू एका ट्रिप ला जाऊन आल्या. आल्यावर भेट झाली तेव्हा त्यांनी त्या जागे...