इरशाळगड - विलोभनीय किल्ला
पाय मोडला आणि या वर्षी चा ट्रेक season बोंबलला. चालायचेच म्हणा. कोंकण दिवा झाला आणि पोरं नवनवीन ट्रेक च्या शोधात लागली. त्या आणि या मध्ये साधारण ३ महिने गेले. आजारपणं झाली, ट्रिप झाल्या आणि ट्रेक सोडून इतर सर्व झालं. सरकार पण पडले. म्हणजे महाराष्ट्राला त्यात काही नवीन नाही. पूर्वी पासून ट्रेक ला येतांना नाही तर जातांना एक चर्चा म्हणजे राजकारण, ज्या मधले, गाडीत बसलेल्यांना 'मत' देणे सोडून काहीही कळत नाही, तरी आपले कसे बरोबर हे ठाम पणे पटवून देऊन चर्चा करायची. तिथे राजकारणी लोक सर्व मतदारांना विकून राष्ट्र विकत घेऊन मस्त घोरत पडले असत. आणि इथे हे. असो. सांगायचे म्हणजे असे, की खूप दिवसांनी परत ट्रेक चा योग् आला आणि आम्ही निघालो.
किती लोकांनी ऐकले आहे माहित नाही पण हा गड तसा लपलेला. बघायला गडावर काहीही नाही. एक टाके, गुहा आणि एक नेढे. पण तरी जावेसे वाटले. याचे कारण म्हणजे त्याच्या कडे पाहताच तो तुम्हाला बोलावून घेतो. कसला जबरी आहे हा गड. त्याचा एकंदरीत आकार बघता आणि चढ उतार बघता हा ट्रेक करायला नक्कीच धम्माल अली. त्या नेढ्या ला पोचे पर्यन्त मात्र वजनाचे ओझे तुडुंब जाणवले. इथे मला माझा CG सांभाळायला लागला नाही तर सिलेंडर सारखा खाली घरंगळत गेलो असतो.
रायगड जिल्ला आणि कर्जत विभागात येणारा हा किल्ला माथेरान डोंगर रांगेतला आहे. या भागा मध्ये अलीकडे पलीकडे बरेच किल्ले आहेत. पेब, प्रबळगड, माणिकगड, मलंग, म्हैसमाळ हे किल्ले लोह मार्गावरून सहज दिसतात. आम्ही रसायनी चा exit घेतला आणि गाडी कर्जत च्या दिशेने नेली. चौक नावाचे गाव शोधत गाडी तिथे नेली. हेच ते पायथ्याचे गाव. गाडी तिथे लावून साधणार ७.३० ला सकाळी आम्ही किल्ला चढायला सुरु केले. आमच्या आधी ६ ते ७ मुलांची एक टोळी मुंबई हुन अली होती. बाकी किल्ल्यावर शुकशुकाट होता. सकाळच्या वेळी अजून उन्हाचा तडाखा नसून थोडासा गारवाच होता. उजवीकडे मोरबे धरणाचे पाणी दिसत होते.
गावापासून साधारण ३० - ४० मी मध्ये तुम्ही गडावरील झेंड्या पाशी पोचता. तिथे एका टपरीवर मस्त सरबत केळी काही सँडविच नेलेले खालले. झेंड्या च्या डावीकडून एक निमुळती वाट गडमाथ्यावर नेते. लहान आहे वाट आणि काळजी घ्यावी. तिथूनच नेढ्या कडे जाणारी एक दगडी वाट लागेल. साधारण ८० deg वर ते नेढे लपलेले दिसते. वर जातांना शिड्या लावल्या आहेत पण जेमतेम आहेत. काही दोर पण आहेत. पण काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. खाली पडलात तर एक टप्पा आणि आऊट. त्यामुळे जमत नाही असा चुकून पण मनात विचार आला तर जाऊ नका. माझा मनात तो विचार नेढ्यात पोचल्यावर आला. त्यामुळे मला काही पर्याय नव्हता. अर्थात जमते सर्व. माझा तोच तो आनंद. जिवंत असण्याचा. तोंडाला कोरड पडणे काय हे अनुभवायचे असेल तर, चला की....
वर विशाळा मातेचे मंदिर आहे. कदाचित त्याच वरून या किल्ल्याला इरशाळ गड असे नाव पडले असावे. खरतर इथे पाण्याचे टाके आहे म्हणून याला गड म्हणायला हरकत नाही. नाही तर इथे तसे काहीही बघायला नाही. तटबंदी पण नाही आणि दरवाजे पण नाही. Watch tower असावा. प्रबळगडाचा सखा, भाऊ.
नेढयात खूप वेळ हवा खात आम्ही बसलो. जगाच्या वर सर्वत्र पाहत, थंडगार वारा खात त्या नेढ्यातला अनुभव लिहिणे शक्य नाही. आत्ता लिहितांना पण अंगावर काटा येतो आहे. लांब लांब हुन दिसणारे नेढे, आता आपण त्यात पोचलो आहे. लहान मुलांसारखे ओरडावेसे वाटले. ओरडलो पण. आमच्या साठी हे छोटे प्रसंग खूप मोठे अनुभव, आनंद आणि आठवणी सोडून जातात. यावर वारंवार चर्चा होते आणि तोच अनुभव पुन्हा घेता येतो. उतरतांना मात्र फाटली होती. डायरेक्ट तळ दिसत होता. मी आणि बिडी असेच दोघे गोरखगडावर गेलो होतो. माथ्यावर पोचायला तिथे पाहिऱ्या आहेत खरं पण उतरतांना ८० deg उतरावे लागते आणि तिथे पण एक टप्पा आऊट विषय आहे. इथे मला उतरतांना त्याची आठवण झाली. पण किंचितसे ट्रेकिंग येत असल्यामुळे ही वेळ निभावून नेली. वजन २० kg तरी कमी असावे असा विचार मनाला चाटून गेला इतकेच.
तिथून थेट खाली उतरायला सुरु केले. उप्या ला दर वेळी दिसतो तसा त्याचा eagle भेटला. मग आवाज काढून त्याच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न. हे काही नवीन नाही. तो सांगत असतो आणि आम्ही ऐकत असतो. पक्षी तज्ज्ञ तो. आणि फोटो पण छान काढतो पक्षांचे. त्यामुळे काही नवीन माहिती मिळत असते. उतरतांना शीळ ठोकत आमचा मित्र शेवट पर्यन्त प्रयत्न करत होता. त्याचा तोच तो आनंद.
खाली उतरलो आणि गाडी पाशी आलो. इथे गावातली पोरं क्रिकेट खेळत होती. पलीकडेच एक छोटेसे घर होते आणि तिथे एक आजी बसली होती. वय साधारण ८० असेल. पूर्ण वाकलेली. लांबून हाक मारली आणि म्हणाली "तिकीट हाय.पैशे द्याव" म्हणाले आजी या, देतो. आजी आल्या आणि गाडीच्या सावलीत सुखावल्या. तिथेच गप्पा मारत बसल्या. तो क्रिकेट खेळणारा त्यांचा नातू, म्हातारी समोर आहे याचे काही भान न ठेवता अर्वाच्च शिव्या घालत चेंडू फेकणाऱ्या मित्र शी बोलत होता. लहान लहान मुलांच्या तोंडून मोठ्यांच्या शिव्या ऐकून आम्हाला तर हसायला यायला लागले. आमचे आम्ही आवरून १०० रुपये देऊन तिथून निघालो. अप्रतिम ट्रेक झाला. येतांना तळेगाव ला थांबून बब्बी ढाबा गाठला आणि जितक्या म्हणून calories गेल्या असतील त्याच्या दुप्पट ओढल्या. जेवण झाले आणि मनात परत विचार येऊन गेला कीं 'वजन कमी असते तर काय' . . . . .
इतिहास - (Ref - http://trekshitiz.com/)
ईरशाळला गड म्हणणे अयोग्य आहे, कारण ईरशाळ हा एक सुळका आहे. त्यामुळे इतिहासात त्याचा कुठे उल्लेख नाही.गडावरील पाण्याच्या टाक्यांचे अत्सित्व पाहाता याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला असावा असे वाटते. मे १६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी रायरी पर्यंतचा सारा मुलूख घेतला तेव्हा हा गडदेखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. ईरशाळ म्हणजे प्रबळगडचा सख्खा शेजारी. २३ जानेवारी १९७२ रोजी याच सुळक्यावर एक दु :खद घटना घडली ती म्हणजे, कुमार प्रकाश दुर्वे याचा किल्ल्यावरून पडून दु :खद अंत झाला. त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारीला मुंबई - ठाण्याचे गिर्यारोहक येथे जमतात.
No comments:
Post a Comment