Monday, 1 March 2021

महिपतगड

महिपतगड 

वाडी बेलदार - एक सुंदर छोटेसे गाव, वाडी. गड किल्ल्यांच्या पोटात वसलेले. जगाशी काहीच संबंध नसलेले, पाच पंचवीस घरांची एक टुमदार वाडी. रसाळगड उतरून खाली आलो. थोडीशी पोटपूजा झाली आणि गाडी परत वाडी जैतापूरच्या दिशेने वळवली. खड्ड्या खुड्ड्यातुन रस्ता काढत थार पळवत आम्ही वाडी जैतापूर ला पोचलो. तिथून एक मळलेली वाट वाडी बेलदार ला पोचते जे किल्ल्याच्या पोटातले गाव आहे. वाडी जैतापूरहुन बेलदार ला पोचायला २ ते २.५ तास सहज लागू शकतात. वाट मळलेली आहे. काही काळापूर्वी रस्त्याचे काम चालू झाले.  डोंगर खोदून बेलदार वाडी पर्यन्त आता रस्ता झाला आहे. अर्थात खूप कच्चा रस्ता आहे आणि गाडी वर न्यायला चांगलेच skill लागते. छोटी गाडी पण वर जाऊ शकते हे आम्हाला दिसले. त्या गाडी चे नंतर काय होते हे माहित नाही. मी Thar  नेली होती त्यामुळे फारसा काही रस्त्याचा परिणाम आमच्यावर झाला नाही, आणि गाडी वर पण. 

धुळीचे लॉट अंगावर घेत, आणि उडवत Thar वाडी बेलदार ला पोचली. दुपारचे १२. ३० झाले असतील. सकाळ पासून थोडे थोडे खात असल्यानी किंवा उन्हामुळे असेल, आम्ही काही जेवलो नव्हतो. एका अर्थानी हे खूप चांगले झाले. वाडी मध्ये पोलीस पाटील यांच्या शी सचिन मार्फत चेतन नी संपर्क साधला होता. साहेबांनी आमच्या साठी त्यांचे घर उघडे ठेवले होते. त्याच्या मातोश्रींची प्रकृती ठीक नसल्याने ते मुंबई ला गेले होते असे कळाले. कोण येणार, काळे का गोरे, कसे आहेत, त्यांची सामाजिक स्तिथी, जात, धर्म काही कसलाही गंध नसतांना पोलीस पाटीलांनी त्याचे घर आम्हाला उघडे करून दिले होते. इतक्या दूर किल्ले बघायला येणार असलेली लोक म्हणजे आमचेच असा एक भाव इथे प्रत्येक माणसामध्ये अनुभवायला मिळाला. माणुसकी नामक काही तरी गोष्ट असते याचा भास इथे झाला. सकाळी भेटलेला विविध शहरी ग्रुप परत तिथे भेटला. जेवण करून येतांना त्यांनी आवाज दिला. गावातील एका ६० - ७० वर्षाच्या तरुण आजोबांना वाटाड्या म्हणून हा ग्रुप गडावर नेण्यासाठी सज्ज झाला. 

आजोबा सरळ तरतरीत नाकाचे, रापलेल्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांचे, टोपी, नेहरू शर्ट आणि धोतर मळलेले, हातात एक काठी आणि पायात सध्या चपला घालून आमच्या कडे येऊ लागले. "काय पोरांनो कुठून आलात". चड्डी पुढे सरसावला आणि त्यांनी पोलीस पाटीलांशी झालेली चर्चा आजोबांना सांगितली. त्यांनी होकार देऊन आम्हाला शांत केले. राहायची सोय छान झाली. आजोबांनी विचारले काही शिधा असेल तर जेवण बनवून देतोकी. आमच्याकडे काही नव्हते. ते म्हणाले की इथे काही आणलत तरच करून मिळते नाही तर न भाजी न काही, इथे बाजार नाही त्यामुळे काहीच मिळत नाही. मीठ आणि भाकर खाऊन राहतो आम्ही. वर मंदिरात पवार म्हणून भेटले ते म्हणाले ५० लोक कसे बसे गावात उरले आहेत. बाकी सर्व पुणे मुंबई ला. इथे त्यामुळे भात आणि भाकर इतकेच जेवायला. आजोबांना म्हणालो नको काही आम्ही येतो गडावर जाऊन. त्यांनी रस्ता दाखवला आणि आम्ही चौघे पाणी भरून तिथून निघालो. मित्रांनो जर कधी वाडी बेलदार ला जायचा योग् आला तर जातांना कांदे बटाटे काही भाजी पाला किंवा मनात येईल ते नक्की घेऊन जा. तिथे आजोबांना आणि इतर लोकांना द्या. त्यांच्या साठी ही मेजवानी असेल. सुमारगड राहिला आहे करायचा त्यामुळे मी परत जातांना thar भरून घेऊन जाणार आहे हे नक्की. 

वाडी बेलदार ते गडमाथा साधारण ४५ मिनिट अंतर आहे. सर्व चढ आहे. वर जात असतानाच अर्ध्यानंतर डावीकडे एक बुरुज दिसतो. हा किल्ला इतका मोठा आहे की मला वाटत नाही तिथल्या गावकऱ्यांनी पण पूर्ण किल्ला हिंडून पहिला असेल. १२० एकरी याचा पसार आहे. आणि संपूर्ण जंगल आहे. इथे वर गेल्यावर उगाच इकडे तिकडे डांग डिंग करायला जाऊ नये. नाही तर उर्वरित आयुष्य तिथल्या जंगलात काढावे लागेल. चकवा लागतो म्हणतात. 

गडावर पोचताच समोर तटबंदी दिसते. नक्की माहित नाही पण बऱ्याच गोष्टी इथे मातीत बुजलेल्या वाटतात. अर्धवट डोके वर काढत आहेत असे वाटते.

 सचिन ला नीट विचारले पाहिजे. भयंकर ऊन असल्यानी dehydration चा त्रास हा काही नवीन नाही. त्यामुळे सारखे पाणी पीत राहणे याला पर्याय नाही. पिंटू ला त्रास झाला. त्याला खूप push करायचा प्रयत्न केला पण नंतर तो गडावर थांबला. बिडी त्याच्या बरोबर थांबला आणि नंतर एकटाच हिंडून आला. मी आणि चड्डी एक वाट धरून जंगलात शिरलो. आम्हाला मंदिर गाठायचे होते. विजेचे खांब बघत आम्ही पुढे पुढे जात होतो. जंगल घनदाट आहे. आणि आश्चर्य म्हणजे जायच्या वाटेवर उजवीकडे डावीकडे अनेक अवशेष बघायला मिळतात. ते कसेल आहेत काय आहे काही कळत नाही. असं वाटतं की या किल्ल्यावर एक छोटे से गाव तर नसेल. एकंदरीत अदभूत अनुभव आहे. रणरणत्या, भाजत असलेल्या उन्हातून A C जंगलात प्रवेश करताच जीव सुखावतो. १ ते १.५ कि मी पायपिटीनंतर अचानक आम्ही पारेश्वराच्या मोठ्या मंदिरात पोचलो. छान मंदिर आहे. २० ते २५ लोकांची झोपायची सोय मस्त होऊ शकते. समोरच पिण्याच्या पाण्याची मोठी विहीर आहे. आम्ही तिथे पोचलो आणि पडवीवर पसरलो. पाणी काढले आणि सॅक मध्ये असलेले सँडविच मोकळे केले. आतमध्ये एक म्हातारबुवा आणि पवार नावाचे गृहस्थ होते. निवांत पडलेले. नुकतेच जेवण झाले, म्हणाले. त्यांच्या शी गप्पा चालू झाल्या. त्यांनी शिजवलेले थोडेसे तांदूळ आम्हाला खायला दिले. कोरडा भात, कोरडे सँडविच आणि पाणी असे उत्तम पोटभरणी चे जेवण झाले. गप्पा मारता मारत कळले की बुवा बहिरे आहेत त्यामुळे भात खूप चविष्ठ आहे हे सांगून त्यांना काहीच कळले नव्हते. मग हातवारे करून त्यांच्या पर्यन्त धन्यवाद पोचवले. त्या दोघांनी एक एक सँडविच गोड मानून खालला. पाणी भरून दिले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. 



या किल्ल्याला एकूण ६ दरवाजे आहेत. खरं तर काय बघायला आहे आणि काय नाही हे नक्की कोणाला ठाऊक आहे हे मला पण माहित नाही. जंगल आणि विस्तार इतका मोठा आहे की नक्की कुठे जायचे आणि दिशा काय हे पण कळत नाही. परत येतांना मला आणि चड्डी ला अचानक एक दुसरा रस्ता सापडला जो जंगल मधून नसून एका मोठ्या विहिरी जवळच्या पठारावरून होता. इथून आम्ही बुरुजा  पाशी १० मिनिटात पोचलो आणि खाली उतरायला सुरु केले. एका वेगळ्या किल्ल्याचा अनुभव आला. मला वाटतं हा पहिलाच किल्ला असेल, मी पाहिलेला जो अजून पूर्ण explore झालेला नाही. नसावा. 

THAR पाशी पोचलो तेव्हा अजून कुठेही सावली न मिळाल्याने पिंटू THAR  च्या सावलीत निपचित पडला होता. बिडी नजरेस पडला नव्हता पण बूट काढे पर्यन्त तो पण उगवला. चौघांनी बसून चर्चा केली आणि ठरवले की सुमारगडाला परत यावे लागेल. सर्व सामानाची आवराआवर करून थोडेसे हाथ पाय ओले करून आम्ही चौघांनी  परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. 

खाली परत येत असतांना डावीकडे सुमारगड दिसत होता आणि त्याच्या कडे नेणारी मळलेली वाट पण नजरेस पडली. पुढे जाऊन जंगलामध्ये ती कुठे तरी ती हरवली...... 





































No comments:

Post a Comment

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...