रसाळगड
आला परत उन्हाळा. हे वर्ष त्या Virus मुळे सर्वांचेच वाईट गेले. म्हणजे आर्थिक दृष्ट्या इथे मी विचार करत नाही. पण भटकंती झाली नाही फार. ज्या MH १२ चा अभिमान बाळगून आम्ही पुणेकर हिंडत होतो, त्याच MH १२ ला लोक गावामध्ये येण्यापासून थांबवत होते. काय तर corona. त्यात पण पुण्यानं नाव कमावले. इकडे सापडला तिकडे सापडला करत लोकं दिवस काढत होतो. ज्या क्षणी लोकांची भीती गेली, किंवा बाहेर पाडण्याशिवाय पर्याय नाही उरला, त्या दिवशी पासून आमची भटकंती परत चालू झाली. मागच्या आठवड्यात दोन खूप उत्तम किल्ले पाहिले. तसेच या वेळी ३ किल्ल्यांची रांग म्हणजेच रसाळगड, महिपतगड आणि सुमारगड करायचे नियोजन झाले.
चार जाणं आम्ही साधारण ४. ३० ला सकाळी निघालो. सर्वजण वेळेत येऊन कमाल केली.
रत्नागिरी जिल्ह्यात खेड जवळ हे तीन किल्ले छान उठून दिसतात. लक्ष वेधून घेतात. उंच उंच हे किल्ले प्रतापगड आणि मधुमकरंदगडाच्या जवळ आहेत आणि उत्साही गिरीप्रेमी या पाच किल्ल्यांचा ट्रेक करतात.
महाबळेश्वर पोलादपूर करत खेड ला पोचलो. मौजे जैतापूर पासून रसाळवाडी कडे गाडी घेऊन गेलो. पुण्यातून तिथे पोचायला ५ तास लागले, अर्थात खुप सकाळी निघालो म्हणून. गाडी चा रस्ता झाला असल्यामुळे किल्ल्यावर चढणे अगदीच सोपे झाले आहे. खालपासून वर चालत आला तर मात्र २ तास कुठे गेले नाहीत. ऊन वाढत चालले होते. घाट उतरून समुद्र किनाऱ्या जवळ आहे याची जाणीव घामाच्या धारांनी होत होती. समुद्रा कडून येणाऱ्या वाऱ्या बरोबर एक अजब असा सुगंध म्हणा नाही तर वास म्हणा, आपण त्या लाटांच्या किती जवळ आहोत हे सांगत होता. रसाळगड, सुंदर नीट नेटका टापटीप गड आहे . पाहिर्यांनी वर जाताच पहिला दरवाजा दिसतो. गाडी मध्ये हिंदुस्थान चे पॅटीस आणि सँडविचेस खाऊन आम्ही वर जायला निघालो.
पहिला दरवाजा ओलांडून आत जाताच तिथे बजरंगबली चे दर्शन होते. आज पौर्णिमा होती आणि तिथे मारुती चे मस्त अंघोळ घालून छान पूजन झाले होते.
उदबत्ती अजून संपली नव्हती. धार्मिक वातावरण काही काळ अनुभवले. नमस्कार करून पुढे निघालो आणि दुसरा दरवाजा लागला. किल्ला मोठा नाही त्यामुळे तास भर खूप झाला बघायला. या किल्ल्या वर अनेक तोफा आहेत. आम्ही मोजल्या तेव्हा १२ - १५ तर नक्कीच दिसल्या. वर चढत असतांना अजून एक ट्रेकिंग चा ग्रुप भेटला. सांगली, रत्नागिरी, चिपळूण, पुणे आणि मुंबई असे वेगवेगळ्या ठिकाणची लोकं त्या ग्रुप मध्ये होती. साधारण ६ जण. कदाचित मुंबई चे दोघे असतील. त्यांनी खांबाचे टाके नक्की बघा असे सांगून तिथून पळ काढला. तिथून ते महीपत ला जाणार होते. आमच्या सारखेच.
थोडे पुढे चालत गेलो आणि झोलाई मातेचे मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. तिथे राहण्याची सोय होऊ शकते. मंदिरा समोर मस्त दीपमाळ उभी आहे.
हा सर्व परिसर अत्यंत स्वच्छ आहे. तिथे थोडीशी विश्रांती घेऊन बाकी किल्ला बघायला आम्ही निघालो. मंदिराच्या मागच्या बाजूला मोठे टाके आहे आणि तिथूनच मागे ज्याला गढी म्हणतात असे काही तरी उभे आहे. आत गेल्यावर समजते की इथे वर्षांपूर्वी काही तरी खुप मोठी वास्तू असणार. मोठा वाडा, आणि ऐश्वर्य खूप सारं. या बालेकिल्ल्या / गढी वरून खाली उतरून पठारावर एक वास्तू आहे.
धान्य कोठार असावे असे म्हणतात. पुजारी तिथेच पूजा करत होते. चालत गडाच्या टोकाला पोचलो. खाली एक नंदी आणि आत शंभो ची पिंड आहे. ठेवलेली वाटली. ती वास्तू पण नव्याने बांधलेली असावी. एकंदरीत या किल्ल्यावर असणाऱ्या वास्तू, पाणी आणि इतर बघता इथे लोकांचा वावर खूप जास्त असता. तास दोन तास उन्हात हिंडून ११ च्या सुमारास आम्ही खाली उतरलो. सूर्य डोक्यावर आला होता. उन्हाचा तडाखा जाणवत होता. मी आणि पिंटू खाली उतरून इलेकट्रोल पाण्यात घालून तयार केले. तोच तो आधार. भूषण खूप दिवसांनी आमच्या बरोबर ट्रेक ला आला होता. मधुमकरंदगड आणि प्रतापगड मागच्या वर्षी केला तेव्हा आम्ही बरोबर होतो. परत एक एक करत हरवलेली टाळकी जमा होत आहेत. गाडी काढून आम्ही बेलदारवाडी नावाच्या लहानशा गावाकडे निघालो. तिथूनच रस्ता महिपतगडावर जातो.
No comments:
Post a Comment